शाळेत असताना अभ्यास केलेला विसरायला व्हायचं, अभ्यासात लक्ष लागायचं नाही, शिक्षकांनी रागवलं की मन दुखावलं जायचं, या समस्यांशी सामना करतानाच तिला प्रश्न पडायचा की मी शिकतेय, पण मला ज्ञान मिळत आहे का? अभ्यासाची, शिकण्याची नेहमीची पद्धत पटत नव्हती. शालेय जीवन संपून, कॉलेजची काही वर्षे उलटली तरी तिचा या प्रश्नांवर विचार सुरूच होता आणि तिला तिची अभ्यासाची, शिकण्याची पद्धत सापडली. आता अभ्यास लक्षात राहू लागला, शिकता शिकता तिने एम.एस्सी. करून पीएच.डी. ची पदवी मिळवली आणि डॉ. वीणा सावजी प्राध्यापक म्हणून रुजू झाल्या. डी.एम.एल.टी.च्या विद्यार्थ्यांना शिकवतानाही त्यांनी शिकवण्याच्या पद्धतीत प्रयोग करणे सुरू ठेवले होते. उद्देश हाच की, विद्यार्थ्यांना नुसती माहिती न मिळता ज्ञान मिळावे व त्यांना शिकण्याची प्रक्रिया आनंददायक वाटावी.
शिक्षण म्हणजे नक्की काय, यावर त्यांचं विचारमंथन सुरू होतच आणि त्यांनी नोकरी सोडून शाळा काढायचं ठरवलं. अशी शाळा, ज्यात विद्यार्थ्यांना ‘ज्ञान’ मिळेल. स्वकीय, परिचितांनी त्यांना शाळा काढण्यापासून परावृत्त केलं, पण वीणा मॅडम आपल्या विचारावर ठाम होत्या आणि ‘दप्तराशिवाय शाळा’ हा आगळावेगळा उपक्रम सुरू झाला. आपण शिकतो, डिग्री घेतो, पण शाळा-कॉलेजात आपल्याला मिळते ती ‘माहिती’. ज्ञान आणि माहिती यातली तफावतच आपल्या लक्षात येत नाही. हा फरक आपण समजून घेतला पाहिजे. आज ‘माहिती’ मिळविण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. विद्यार्थी त्यांचा उपयोग करतात. म्हणूनच शाळा-कॉलेजेसमध्ये शिकताना त्यांचं लक्ष नसतं. कॉलेजमध्ये जाणंही त्यांना आवश्यक वाटत नाही, असं वीणा मॅडम म्हणतात. शिक्षण, शिक्षण पद्धती, अभ्यासाची पद्धत याबद्दल वीणा मॅडमना प्रश्न पडत, तसेच त्यांना मन:शांतीबद्दलही प्रश्न पडत. एकदा सहजच ‘ध्यान’ या विषयावरची पुस्तकं वाचनात आल्यावर त्यांनी पुस्तकातील माहितीच्या आधारे ‘ध्यान’ म्हणजे मेडिटेशन (हा शब्द पटकन कळतो) करायला सुरुवात केली. ध्यानाची नियमित बैठक सुरू झाली आणि या विषयातली रुची वाढत गेली. विपश्यना शिबिराचा पहिल्यांदा अनुभव मॅडमनी घेतला आणि त्यांना या प्रश्नांची उत्तरं मिळाली. त्यानंतर त्या अनेकदा विपश्यना शिबिरात सहभागी झाल्या. ध्यानामुळे मनाची स्थिरता कशी साधता येते, मन शांत झाल्यावर होणारे मानसिक व शारीरिक फायदे स्वत: अनुभवल्यावर मॅडमचा मुलांच्या दृष्टीने याचा कसा उपयोग करून घेता येईल, हा विचार सुरू झाला.
एव्हाना मॅडमची शाळा सुरू झालेली होती आणि मॅडमनं शाळेत रोज मुलांना ‘आनापान’ म्हणजे ध्यान करणं अनिवार्य केलं. शाळेत आल्यावर, नियमित केलेल्या ध्यानाचे फायदे शिक्षक, पालक व विद्यार्थीही अनुभवतात. आजची जीवनशैली, करमणुकीची साधनं यांनी मुलं खूप चंचल झाली आहेत. पालकांना आज मुलांकडे योग्य तऱ्हेनं लक्ष देण्यास वेळ नसतो. त्यामुळेही मुलांच्या मानसिक समस्या वाढल्या आहेत. ‘नियमित ध्यान करणं म्हणजे एकाग्रता वाढवणं एवढाच उद्देश नसावा. ‘ Cleaning of the mind daily’८ हा भागच आजच्या शिक्षणात नाही. तो आम्ही ठामपणे राबवितो’ असं मॅडम आवर्जून सांगतात. सरकारनं ८ व्या वर्गापर्यंत परीक्षा रद्द केल्यावर मॅडमनं तत्कालीन शिक्षणमंत्र्यांचे जाहीर अभिनंदन केले. आपली शिक्षण पद्धती चुकीची आहे. त्यामुळे नापास होणारे विद्यार्थी भरडले जातात व आत्मविश्वास गमावून बसतात; परंतु शिक्षणात रूढ अर्थानं अपयशी ठरलेले अनेक जण आयुष्यात यशस्वीही झाले आहेत. यशस्वी विद्यार्थी घडण्यासाठी विद्यार्थ्यांच्या मनाची क्षमता वाढवून त्यांची चंचलता कमी करणं गरजेचं आहे, तसंच शिक्षकांनीही स्वत:वर मेहनत घेणं आवश्यक आहे, असं मॅडम म्हणतात. शिक्षणात मागं पडणाऱ्या मुलांना रागवून, धाकदपटशा दाखवून ते शाळेत जाणार नाही किंवा लक्ष घेऊन शिकणार नाही; परंतु त्यांना प्रेमानं समजावून सांगण्यासाठी, पालक व शिक्षकांनी आधी शांतपणे, प्रेमानं व धीर-संयमानं वागायला शिकलं पाहिजे आणि असं वागलं तर अशी मुलं सुधारतात, हे आम्ही केलं आहे, असं मॅडम सांगतात. शालेय विद्यार्थ्यांना सेक्स एज्युकेशनची गरज नाही. या निसर्गसुलभ भावना असतात, पण या वयातील मुलांना ध्यान व खेळाचं महत्त्व पटवून संयम शिकवणं, भावना आवरता येणं यावर जोर दिला पाहिजे, तसंच त्यांना ‘सेल्फ काऊन्सेलिंग’, स्वत:चं समुपदेशन शिकविलं जावं, यावर मॅडम ठाम आहेत. त्यांनी या विषयावर लेखन व भाषणंही दिली आहेत. शिक्षकांनीही मुलांशी वागताना स्वत: शांत राहणं व रागावर ताबा ठेवणं अत्यावश्यक आहे, असं त्यांना वाटतं. कारण, यामुळे शिक्षकाची मानसिकता गढूळ होऊन त्याचे परिणाम घरी त्यांच्या मुलांवर होतात. त्यामुळे शिक्षकांनी थोडं ‘स्वार्थी’ व्हावं म्हणजे शाळेत व घरी, सर्वाचं मानसिक आरोग्य चांगलं राहील. आज शाळेत शिक्षक रागवल्यानं, शिक्षा केल्यानं शाळकरी लहान मुलं आत्महत्या करीत आहेत. अशा परिस्थितीत वीणा मॅडमचे हे विचार सर्वानीच आचरणात आणावेत. ‘जन्मापासून शेवटपर्यंत आपल्याला सोबत असते ती आपल्या श्वासाची. या श्वासावर लक्ष केंद्रित केले तर सूर्यकिरणांना एकत्रित करून सौरऊर्जा निर्माण होते, तशी आपण ‘आत्म ऊर्जा’ निर्माण करून स्थिर, शांत मनानं वापरू शकतो. अर्थात, हे साध्य होतं ध्यानानंच’ असं ‘ध्यान’ अनुभवणाऱ्या व त्यात खोल बुडलेल्या वीणा मॅडम म्हणतात.    

जाणिजे जे यज्ञकर्म ’
शिक्षण म्हणजे नक्की काय, यावर त्यांचं विचारमंथन सुरू होतच आणि त्यांनी नोकरी सोडून शाळा काढायचं ठरवलं. अशी शाळा, ज्यात विद्यार्थ्यांना ‘ज्ञान’ मिळेल. स्वकीय, परिचितांनी त्यांना शाळा काढण्यापासून परावृत्त केलं, पण वीणा मॅडम आपल्या विचारावर ठाम होत्या आणि ‘दप्तराशिवाय शाळा’ हा आगळावेगळा उपक्रम सुरू झाला. आपण शिकतो, डिग्री घेतो, पण शाळा-कॉलेजात आपल्याला मिळते ती ‘माहिती’. ज्ञान आणि माहिती यातली तफावतच आपल्या लक्षात येत नाही. हा फरक आपण समजून घेतला पाहिजे. आज ‘माहिती’ मिळविण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. विद्यार्थी त्यांचा उपयोग करतात. म्हणूनच शाळा-कॉलेजेसमध्ये शिकताना त्यांचं लक्ष नसतं. कॉलेजमध्ये जाणंही त्यांना आवश्यक वाटत नाही.