१९६४ मध्ये मित्रांकडूनच ६०० रुपये त्यांनी जमा केले.. जोडीला होती जिद्द आणि आत्मविश्वास .. या भांडवलावर कोल्हापूरमध्ये त्यांनी सरोज आयर्न इण्डस्ट्रीज सुरू केली. सिलिंडर कास्टिंगसारखे आव्हानात्मक काम त्यांनी हाती घेतले आणि काही वर्षांतच त्यांची कीर्ती सातासमुद्रापार गेली. शून्यातून विश्व उभे करून फौण्ड्री उद्योगजगतात आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या या उद्योजकाचे नाव होते परशुराम शंकररराव ऊर्फ बापूसाहेब जाधव! कोल्हापूरमध्ये १० एप्रिल १९३७ रोजी एका सर्वसाधारण कुटुंबात त्यांचा जन्म झाला. ते लहान असतानाच वडिलांचे निधन झाल्याने घरची जबाबदरी त्यांच्यावरच आली. मग एका छोटय़ा कंपनीत त्यांनी नोकरी पत्करली. मालकांचे डबे आणण्यापासून त्यांच्या मुलांना शाळेतून आणण्यापर्यंत सर्व प्रकारची कामे ते करू लागले. पुढे वाढत्या महागाईमुळे ते अन्य कामांच्या शोधात फिरले आणि शेवटी फौण्ड्री उद्योगात स्थिरावले. १९६३ साली या उद्योगात सिलिंडर हेडचे अत्यंत क्लिष्ट काम करण्याचे आव्हान त्यांनी स्वीकारले व त्यात ते यशस्वी ठरले. बराच अनुभव गाठीशी आल्यानंतर स्वत:चा एखाद्या उद्योग सुरू करावा, असा विचार त्यांच्या मनात घोळू लागला. काही मित्र आणि नातेवाईकांशी त्यांनी चर्चा केली. त्यांचा प्रामाणिकपणा आणि जिद्द बघून काही मित्रांनी आर्थिक मदत करण्याचे मान्यही केले. मग १९६४ च्या प्रजासत्ताक दिनी त्यांनी सरोज आयर्न इण्डस्ट्रीजची स्थापना केली. आपल्या कौशल्याच्या बळावर मग बापूंनी सिलिंडर हेडच्या निर्मितीत स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले. किलरेस्कर, हिंदुस्तान ट्रॅक्टर्स, एटीसी अशा नामांकित कंपन्यांशी त्यांनी संपर्क साधला. तेथील व्यवस्थापनालाही त्यांचे उत्पादन दर्जेदार वाटल्याने मग त्यांना मागे वळून पाहावेच लागले नाही. सर्व ठिकाणांहून त्यांच्या उत्पादनाला मागणी वाढू लागली. कर्मचारी आणि कामगाराांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला मिळावा याचीही ते काळजी घेत. या कामातील कौशल्यामुळे अमेरिका, इंग्लंडसारख्या विकसित देशांत त्यांचे नाव पोहोचले. जगभरात फौण्ड्री उद्योगात नवनवीन तंत्रज्ञान येत असल्याने ते ज्ञान आत्मसात करण्यासाठी बापूंनी वेगवेगळ्या देशांना भेटी दिल्या. भारतातील पहिल्या सँड रिक्लमेशन प्रकल्पासाठी कॅनडा येथून यंत्रसामग्री आणून तो सुरू करण्याचा मान त्यांच्या कंपनीला मिळाला. पुढे शिरोली औद्योगिक वसाहतीत चार कंपन्या त्यांनी स्थापन केल्या. अनेक तरुण उद्योजकांना त्यांनी मार्गदर्शनही केले. उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल बापूंना फाय फाउंडेशन, कोल्हापूर भूषण, बेस्ट फौण्ड्रीमन, जेम ऑफ न्यू मिलेनियम अशा विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले. अनेक कामगार त्यांच्या कंपनीत असले तरी बापू जुन्या कामगारांना प्रत्यक्ष नावाने ओळखत आणि वेळोवेळी त्यांच्या अडचणी सोडवत असत. अशा या ज्येष्ठ उद्योजकाने मंगळवारी या जगाचा निरोप घेतला, तेव्हा त्यांच्या कर्मचाऱ्यांना आपल्यात घरातील सदस्य गेल्याचे दु:ख झाले..