वाघांची संख्या वाढली म्हणून अलीकडे बरीच हाकाटी करण्यात आली असली तरी त्यातील सर्वेक्षण पद्धती या वैज्ञानिक आधारावर तकलादू आहेत. भारतातील वाघ ज्यांना आपण बेंगाल टायगर्स म्हणून सामान्यपणे ओळखतो त्यांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे, त्यांच्यातील पूर्वीचे जनुकीय द्रव्य ९३ टक्के प्रमाणात नष्ट झाले आहे. भारतातील वाघ या एकाच विषयाचा ध्यास एका तरुणीने घेतला आहे, ती शिकलेली किती आहे हे पुढे सांगणारच आहे त्यामुळे एवढे शिक्षण घेतल्यानंतर ज्याला एरवी फालतू म्हणून काही जण निकालात काढतील अशा व्याघ्र संवर्धनाच्या विषयात तिने स्वत:ला झोकून दिले. आजच्या केवळ पशाच्या मागे धावणाऱ्या दुनियेत करिअरचा तिचा हा मार्ग हटकेच आहे यात शंका नाही. अलीकडेच द फिल्ड म्युझियम इन शिकागो या संस्थेचा प्रतिष्ठेचा पार्कर गेंट्री पुरस्कार मिळवणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे. तिचे नाव आहे उमा रामकृष्णन. वय अवघे ४३. वाघांचा मागोवा घेताना या व्याघ्र गुप्तहेर महिलेला (सकारात्मक अर्थाने) वाघाची विष्ठा अभ्यासण्यात काहीच कमीपणा वाटत नाही कारण तिच्यामते दोनशे वर्षांपूर्वीच्या वाघांच्या जनुकांची आताच्या वाघांच्या जनुकांशी तुलना करायची असेल तर असे वेडाचार करावेच लागतील. एकदा ठरवलं ते करायचंच मग कष्टाचे, सहनशीलतेचे कितीही डोंगर उपसावे लागोत ही उमाची पहिल्यापासूनची सवय. उमा ही भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व गणित या पारंपरिक विषयातून विज्ञान पदवीधर झाली व तिने जैवतंत्रज्ञानात पदव्युत्तर पदवी घेतली, तिला खगोलभौतिकीत रमायचे होते पण नंतर रेणवीय परिसंस्था या विषयात तिला रस वाटला. कॅलिफोíनया विद्यापीठातून परिसंस्था विषयात पीएचडी केल्यानंतर १४ वर्षांनी तिला मिळालेला पुरस्कार रूढ शिक्षणाचा वेगळा वापर केल्याचा परिपाक आहे. सध्या उमाला स्टॅनफर्ड विद्यापीठाची फुलब्राईट शिष्यवृत्ती मिळालेली असून, ती बंगळुरू येथील नॅशनल सेंटर फॉर बायॉलॉजिकल सायन्सेस या संस्थेत सहायक प्राध्यापक आहे. शहरीकरणामुळे जमिनीच्या वापराची पद्धत बदलली आहे. वाघांचे अधिवास नष्ट झाले आहेत. भारतात जगातील ६० टक्के वाघ आहेत पण त्यांचे संवर्धन गरजेचे आहे असे त्या सांगतात. रामकृष्णन यांनी वाघांची संख्या मोजण्यासाठी जनुकीय साधने विकसित केली आहेत. त्यांच्या चमूने वाघांची संख्या व काळ्याबाजाराने होणारी त्यांच्या शरीराच्या भागांची विक्री यांचा संबंध जोडून दाखवला आहे. उमाने पश्चिम घाटातील पक्ष्यांचा शास्त्रीय अभ्यासही केला आहे. वाघांच्या संख्येबाबत ज्यांनी आक्षेप घेतले आहेत त्यांच्यापकी एक असलेले वाइल्डलाइफ कॉन्झर्वेशन सोसायटीचे विज्ञान संचालक उल्हास कारंथ यांनी उमाचे कौतुक केले आहे. त्यांच्या मते ती स्वतंत्र विचाराने काम करते व नवे काहीतरी करण्याची उमेद तिच्यात आहे. जगातील नाणावलेल्या प्राणी संवर्धन जनुकवैज्ञानिकांत तिचा वरचा क्रमांक आहे.