एखादा विद्युत अभियंता जागतिक पातळीवर नाव कमावू शकतो यावर आपला विश्वास बसणार नाही, पण पश्चिम बंगालमधील जादवपूर विद्यापीठाचे विद्युत अभियंता शांतिपद गोन चौधुरी यांचे सौर ऊर्जा अभियांत्रिकीत जगात नाव आहे, हे त्याचे उदाहरण. त्यामुळेच त्यांना ‘द इंटरनॅशनल सोलर इनोव्हेशन्स कौन्सिल’ या जागतिक संस्थेच्या अध्यक्षपदी नेमण्यात आले आहे. ही संस्था नवीनच असून तिचे मुख्यालय फिनलंडमधील हेलसिंकी येथे आहे. जगातील गरीब देशांचे ऊर्जा प्रश्न अभिनव उत्तरांच्या माध्यमातून सोडवण्याचा स्तुत्य असा हेतू या संस्थेने ठेवला आहे. सौर ऊर्जातज्ज्ञ असलेले चौधरी हे जादवपूर विद्यापीठातून विद्युत अभियंता बनले. त्यांनी गेली २७ वर्षे पुनर्नवीकरणीय (अक्षय) ऊर्जा क्षेत्रात काम केले आहे. अनेक शैक्षणिक व व्यावसायिक सरकारी संस्थात त्यांनी ऊर्जा तज्ज्ञ काम केले असून त्यात त्रिपुरा व पश्चिम बंगालमधील प्रकल्पांचा प्रामुख्याने समावेश आहे.

भारतात पुनर्नवीकरणीय ऊर्जा स्र्रोतांच्या क्षेत्रात त्यांनी मोठे काम केले असून बिजली- क्लीअर एनर्जी फॉर ऑल या प्रकल्पाच्या सल्लागार मंडळावर त्यांनी काम केले. त्रिपुरा सरकारच्या ऊर्जा धोरण विभागात त्यांनी काम केले असून पश्चिम बंगाल हरित ऊर्जा विकास महामंडळाचे ते व्यवस्थापकीय संचालक होते. पश्चिम बंगाल सरकारचे विशेष ऊर्जा सचिव म्हणून त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. बंगाल इंजिनीअिरग अ‍ॅण्ड सायन्स युनिव्हर्सिटीचे संलग्न प्राध्यापक म्हणून त्यांनी अध्यापनातही भूमिका निभावली. ऊर्जा क्षेत्रातील ऑस्कर मानला जाणारा शाश्वत ऊर्जेसाठीचा ब्रिटनमधील अ‍ॅशडेन पुरस्कार त्यांना २००३ मध्ये मिळाला होता.

डॉ. चौधरी यांनी दोनशेहून अधिक शोधनिबंध लिहिले असून सौरऊर्जा निर्मितीची अनेक प्रारूपे त्यांनी तयार केली आहेत. त्यात मायक्रो सोलर डोम, कॅनल टॉप सोलर पॅनेल यासह अनेक सौरऊर्जा साधन संकल्पनांचा समावेश आहे. आशिया व आफ्रिकेत सौरऊर्जेवर लक्ष केंद्रित करून तेथील ऊर्जा समस्या सोडवण्यावर त्यांचा भर आहे. उद्योजकांनी गरिबांसाठी सौरऊर्जा साधने तयार करण्यात स्वारस्य दाखवायला हवे, असे डॉ. चौधरी यांचे मत आहे. अलीकडे आपल्याकडे प्रसाधनगृहे नाहीत म्हणून बरीच ओरड होते आहे, पण त्याच्या जोडीला वीज नसेल तर या सुविधांचा फारसा उपयोग नाही; कारण वीज नसेल तर सांडपाणी व इतर अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. सौर ऊर्जा व सांडपाणी व्यवस्थापन यांची सांगड घालण्याच्या विचारातून डॉ. चौधरी यांनी काही नवीन संकल्पना सादर केल्या आहेत त्या निश्चितच अमलात आणण्यासारख्या आहेत. जैवभार स्वयंपाक शेगडय़ा ( बायोमास कुक स्टोव्ह) लहान पंख्यासह निर्माण करण्याचा प्रकल्प त्यांनी राबवला आहे. १९९० मध्ये ऑफ-ग्रिड कार्यक्रमात त्यांचा मोठा वाटा होता. त्यात केरोसिन कंदिलांची जागा सौर कंदिलांनी घेतली. आता घरांमधील सर्व विद्युत व्यवस्था सौरऊर्जेवर आणण्याचे उद्दिष्ट आहे. प्रकाशसंचालित सौरघटांच्या मदतीने ग्रामीण लोकांना एसी विद्युत प्रवाह दिला तरच त्यांच्या समस्या सुटणार आहेत व  त्या दिशेने त्यांचे प्रयत्न आहेत. देशातील पहिली सौर मीटर वीज दरप्रणाली तयार करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. १९९० मध्ये किमान ८० टक्के खेडय़ात वीज नव्हती. आता ९० टक्के खेडय़ात संजालातील वीज उपलब्ध आहे. देशातील सर्व गावांत वीज पोहोचवण्याच्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमात चौधरी यांच्यासारखे वैज्ञानिक अभिमानास्पद ठरतात.