‘माझ्या चित्रपटात प्रत्येक अभिनेत्याने वेगळ्या शैलीने काम केले म्हणून माझे चित्रपट यशस्वी ठरले’, ‘द्रौपदीला पाच पती, पण आजच्या काळात दिग्दर्शकाला शंभर नवरे असतात, त्यामुळे त्याला अनेकांच्या मर्जीप्रमाणे काम करावे लागते- तरीही मी ही बंधने कधी स्वीकारली नाहीत,’ हे अनुभवाचे बोल आहेत, नुकताच चित्रपट क्षेत्रातील ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ हा भारत सरकारचा सर्वोच्च पुरस्कार प्राप्त करणारे प्रसिद्ध दिग्दर्शक कासिनाथनि विश्वनाथ यांचे. ते तेलगू दिग्दर्शक असले, तरी त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतही तेवढीच मोठी भूमिका पार पाडली आहे.

समर्पण वृत्ती व शिस्तीने मी जे काम केले त्याचा हा सन्मान आहे, असे ते सांगतात. कमल हसन व चिरंजीवी यांच्यासारखे अभिनेतेही त्यांच्यापुढे सुपरस्टारसारखे कधी वागले नाहीत, असे त्यांचे व्यक्तिमत्त्व. कलातपस्वी म्हणूनच ते ओळखले जातात. त्यांच्या ‘स्वातीमुटय़म्’वरून हिंदीत अनिल कपूर अभिनीत ‘ईश्वर’ हा चित्रपट आला. ‘शंकराभरणम्’, ‘सागर संगमम्’ (कमल हसन व जयाप्रदा), ‘स्वातीमुटय़म्’, ‘सप्तपदी’, हिंदीतील ‘कामचोर’, ‘संजोग’ व ‘जाग उठा इन्सान’ या चित्रपटांना पाच राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. १९६५ पासून त्यांनी पन्नासवर चित्रपट केले. त्यात तामिळ व हिंदूी चित्रपटांचाही समावेश होता. अपंगत्व, अस्पृश्यता व हुंडा यांसारख्या सामाजिक प्रश्नांवरचे त्यांचे चित्रपट विशेष गाजले. पद्मश्री किताब १९९२ मध्ये, तर आंध्र प्रदेश सरकारचा नंदी पुरस्कार त्यांना वीस वेळा मिळाला. दहा फिल्मफेअर पुरस्कारांचे ते मानकरी आहेत. ज्या काळात आंध्र प्रदेशातील रसिक अभिजात चित्रपट विसरून चालले होते, केवळ अचकटविचकट नृत्ये, अश्लील व द्वय़र्थी संवाद यावर टाळ्या पिटून सवंग दाद देत होते, त्याच वेळी कलातपस्वी विश्वनाथ यांनी रसिकांचे आत्मभान जागे करून त्यांना पुन्हा अभिजाततेकडे नेले. त्यांच्या चित्रपटातील नृत्य व संगीत यामुळे अनेकांनी मुलांना या वेगळ्या वाटेने जाण्यास प्रेरित केले.

आंध्रात पेडापुलीवारु येथे १९३० साली जन्मलेल्या विश्वनाथ यांचे वडील मद्रासच्या चित्रपट-स्टुडिओत तंत्रज्ञ. त्यांनी प्रशासन या विषयात पदवी घेतल्यानंतर विश्वनाथ यांनीही त्याच स्टुडिओत ध्वनिमुद्रकाची नोकरी धरली. तंत्रज्ञ म्हणून चित्रपट निर्माते अदुर्थी सुब्बाराव यांच्यासमवेत काम सुरू केले. चेन्नई स्टुडिओत त्यांनी ‘आत्मगौरवम्’ या चित्रपटाचे दिग्दर्शन पहिल्यांदा केले. त्यानंतर त्यांनी ‘चेलेली कापुरम्’, ‘ओ सीता कथा’, ‘जीवन ज्योती’ व ‘सारदा’ यांसारखे चित्रपट केले. ‘स्वराभिषेकम्’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करताना त्यांनी त्यात भूमिकाही केली. ‘पांडुरंगाडु’, ‘नरसिंहा नायडू’, ‘लक्ष्मी नरसिंहा’, ‘सीमासिंहम्’, ‘कुरुथीपुनाल’, ‘काक्काई श्रीरंगीनिले’, ‘बागवथी’ यांसारख्या चित्रपटांत त्यांच्या भूमिका होत्या. त्यांचे चित्रपट हे अगदी ओघवत्या कथनशैलीचे आहेत, त्यात गुंतागुंत नाही, त्यामुळे थेट व आल्हाददायक असा अनुभव रसिकांना दिला.

‘शंकराभरणम्’ (१९७९) या त्यांच्या चित्रपटाने नायक व नायिका यांच्यात केवळ एकच नाते दाखवले.. संगीताचे नाते! नर्म विनोद, आशयघन कथा, निसर्गसौंदर्याची जोड, अविस्मरणीय संगीत, सशक्त पात्रे या वैशिष्टय़ांमुळे हा चित्रपट अजूनही सर्वाना आठवतो. त्यांनी हिंदीत ‘सरगम’, ‘कामचोर’, ‘शुभकामना’, ‘जाग उठा इन्सान’, ‘सूरसंगम’, ‘संजोग’, ‘ईश्वर’, ‘संगीत’, ‘धनवान’ हे चित्रपट दिग्दर्शित केले. लोकांना जे आवडते तेच द्यायचे, ही चाकोरी सोडूनही चांगले चित्रपट करता येतात व ते तिकीटबारीवर यशस्वी होऊ शकतात, हे विश्वनाथ यांनी त्यांच्या आशयघन चित्रपटांतून दाखवून दिले.