भारतीय राज्यघटनेनुसार अॅटर्नी जनरल हे केंद्र सरकारचे सर्वोच्च विधि अधिकारी असतात. आता मुकुल रोहतगी यांच्या जागी पंधरावे अॅटर्नी जनरल म्हणून के. के. वेणुगोपाल यांची नियुक्ती झाली आहे. कायदा क्षेत्रात त्यांची कारकीर्द फार मोठी आहे, वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली असून त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा सरकारला ‘आधार’सारख्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडताना फायदा होणार आहे. गेली पन्नास वर्षे ते सर्वोच्च न्यायालयात वकिली करीत असून ते आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कायदेतज्ज्ञ आहेत. त्यांचे वडील एम. के. नंबियार यांचा वकिलीचा वारसा त्यांना लाभला आहे. कोट्टायम कटनकोट वेणुगोपाल यांचा जन्म केरळात १९३१ मध्ये नायर कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांनी वेगवेगळ्या ठिकाणी वकिली केली असल्याने त्यांचे बालपण मंगलोर येथे गेले. वेणुगोपाल यांचे कायद्याचे शिक्षण बेळगावच्या आर. एल. लॉ कॉलेजमधून झाले. त्यांनी १९५४ मध्ये मद्रास उच्च न्यायालयात वकिली सुरू केली. के. के. व्ही. हे त्यांच्या वडिलांप्रमाणेच कठोर परिश्रम करणारे आहेत. १९६३ मध्ये वेणुगोपाल यांनी सर्वोच्च न्यायालयात वकिली सुरू केली. १९७२ मध्ये तेथे ते वरिष्ठ वकील बनले, नंतर जनता पक्षाच्या कारकीर्दीत मोरारजी देसाई यांनी त्यांची अॅडिशनल सॉलिसिटर जनरलपदी नियुक्ती केली होती. २०१५ मध्ये त्यांना ‘पद्मविभूषण’ हा मानाचा नागरी किताब मिळाला. मंडल, अयोध्या, न्यायाधीश नियुक्ती प्रकरण, जयललिता प्रकरण यात त्यांनी युक्तिवाद केले. त्यांची युक्तिवादाची वेगळी शैली व राज्यघटनेचे ज्ञान अजोड आहे. अयोध्या प्रकरणात त्यांनी अलीकडे लालकृष्ण अडवाणी यांची बाजू मांडली होती. टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात त्यांनी ‘न्यायमित्र’ म्हणून काम केले. ते उत्तम वकील तर आहेतच, पण मानवतेशी त्यांचे नाते अतूट आहे. त्यांनी त्यांच्या उत्पन्नातून बराच पैसा केरळातील आदिवासी मुलांचे शिक्षण व वैद्यकीय सुविधा तसेच धर्मादाय संस्था यासाठी दिला आहे. सर्वोच्च न्यायालयातील पन्नास वर्षांच्या वकिलीत त्यांनी अनेक वादळी युक्तिवाद पाहिले आणि लढले, पण प्रत्येक वेळी त्यांनी संयम सोडला नाही. सर्वोच्च न्यायालय ही न्यायव्यवस्थेतील शेवटची पायरी असते, त्यामुळे तेथे वकिली करताना मी नेहमी सत्तर टक्के भर खटल्याच्या तयारीवर दिला व ३० टक्के भाग न्यायालयीन मांडणीचा होता, असा अनुभवाचा सल्ला ते देतात. व्यावसायिक जीवनात त्यांनी नीतिमूल्यांचे नेहमीच पालन केले, त्यामुळे त्यांच्याविषयी सर्वानाच आदर आहे. त्यांच्या युक्तिवाद शैलीची सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांनीही वेळोवेळी प्रशंसाच केली. केवळ आपल्या व्यवसायात अडकून जीवनाचा आनंद गमावणाऱ्यांपैकी ते नाहीत. त्यांना प्रवासाची तर आवड आहेच, पण वेगवेगळ्या खाद्यपद्धतीतील पदार्थाचा आस्वादही ते मनमुरादपणे घेतात. अंटाक्र्टिका ते आक्र्टिक सर्कल असा प्रवास त्यांनी केला आहे. तिबेटमधील मानसरोवर व केरळातील सायलेंट व्हॅलीत त्यांनी भटकंती केली. अशा छंदांमधूनच त्यांना जीवनाची खरी ऊर्जा मिळत गेली. पुरातत्त्वशास्त्रातील पुस्तकांचा मोठा संग्रह त्यांच्या व्यक्तिगत ग्रंथालयात असून त्यात सतराव्या व अठराव्या शतकातील पुस्तकांचा समावेश आहे. मुंबई, कोलकाता व चेन्नई येथे सर्वोच्च न्यायालयाची अपील पीठे असावीत म्हणजे कार्यपद्धतीत सुसूत्रता येईल, असे त्यांचे मत आहे. त्यांच्या नियुक्तीने या पदाचाच मान राखला गेला आहे असे म्हणायला हरकत नाही.