स्वातंत्र्य चळवळीत सर्वस्वाचा त्याग करून पुढे देश संपन्न व्हावा म्हणून जनतेच्या हितासाठी काम करणाऱ्यांपैकी भिकू दाजी भिलारे (भि. दा.) हे एक. महाबळेश्वरजवळील छोटय़ाशा भिलार या गावात जन्मलेल्या भिलारे यांनी १९३७ ते ४३ या काळात प्राथमिक शिक्षक म्हणून सेवा केल्याने ते गुरुजी या नावाने लोकप्रिय झाले. त्यानंतर नोकरीचा त्याग करून राष्ट्र सेवा दलाच्या कार्याकडे आकर्षित होऊन स्वातंत्र्य चळवळीत झोकून दिले. प्रतिसरकारच्या काळात भूमिगत राहून त्यांनी काम केले. अगदी पत्रके आणण्यासाठी मुंबईपर्यंत सायकलने प्रवास केला. कर्मवीर भाऊराव पाटील, किसन वीर यांच्या संपर्कात ते आले. १९४३ मध्ये ग्रामोन्नती संघाची स्थापना करून अंधश्रद्धा निर्मूलनाचे महत्त्वाचे काम केले. १९४४ ते ४६ या दरम्यान महात्मा गांधी हे पाचगणी व महाबळेश्वर येथे आले असता, प्रार्थना व सेवा कार्यात सहभाग त्यांनी दिला. नथुराम गोडसे व त्याच्या सहकाऱ्यांनी महात्मा गांधी यांच्यावर केलेला खुनी हल्ला धीरोदात्तपणे भिलारे गुरुजींनी परतवून लावला. देश स्वतंत्र झाल्यावर काँग्रेसच्या कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. तालुका काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदापासून त्यांची कारकीर्द सुरू झाली. महाबळेश्वरच्या सवरेदय योजनेचे संचालक या नात्याने परिसरातील गावांचा कायापालट केला. विशेष म्हणजे हा दुर्गम भाग. त्यामुळे गावागावात मूलभूत सुविधा हव्यात यासाठी त्यांनी प्रयत्न केले. ३० नोव्हेंबर १९५७ रोजी प्रतापगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झाले. त्याच्या नियोजनात गुरुजींचे मोलाचे योगदान होते. या कार्यक्रमाला मोठा विरोध होता. मात्र यशवंतराव चव्हाण व किसन वीर यांच्याबरोबरीने भिलारे गुरुजींनी हा कार्यक्रम यशस्वी केला. १९६२ ते ८० या काळात जावळी मतदारसंघातून ते विधानसभेवर निवडून आले. नंतर विधान परिषदेवरही ते निवडून गेले. महाबळेश्वर येथे प्रदेश काँग्रेसच्या शिबिरांचे नियोजन त्यांनी यशस्वीपणे केले. जबाबदार लोकप्रतिनिधी या नात्याने डोंगराळ भागाचे प्रश्न, कोयना धरणग्रस्तांच्या समस्या त्यांनी मांडल्या. या परिसरात मोठय़ा संख्येने असलेल्या माथाडी कामगारांच्या संघटना बांधणीतही त्यांचे योगदान आहे. परिसरातील सहकारी संस्थांच्या उभारणीतही त्यांचे योगदान होते. साधी राहणी, कुठलाही बडेजाव नाही, विशेष म्हणजे इतकी पदे मिळवूनही घराणेशाहीला त्यांनी थारा दिला नाही. स्वत:साठी काही त्यांनी केले नाही. जे काही करायचे ते समाजासाठी हीच त्यांची धारणा होती. काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी म्हणून चार दशके त्यांनी काम केले. त्यांच्या कामाची दखल घेऊन स्वातंत्र्यसैनिक उच्चाधिकार समितीचे सदस्य सचिवपद त्यांना देण्यात आले होते. आज अनेक जिल्हा मध्यवर्ती बँकांची अवस्था बिकट असताना, सातारा जिल्हा बँक प्रगतिपथावर आहे. भिलारे गुरुजींनी या बँकेचे संचालकपद व नंतर अध्यक्षपदही भूषवले. सातारा जिल्हा काँग्रेस समितीची धुराही त्यांनी प्रदीर्घ काळ सांभाळली. महात्मा गांधी, यशवंतराव चव्हाण यांचे सच्चे अनुयायी असलेल्या भिलारे यांचा शरद पवार यांच्याशीही विशेष स्नेह होता. त्यामुळे पवारांच्या पाठीशी गुरुजी अखेपर्यंत ठामपणे होते. भिलारला आता पुस्तकाचे गाव अशी नवी ओळख मिळाली असली तरी इतकी वर्षे ते गुरुजींचे गाव म्हणूनच प्रसिद्ध होते. भिलारे गुरुजींच्या निधनाने समाजाला विचारांनी दिशा देणारा स्वातंत्र्य चळवळीतील शिलेदार हरपला आहे.