१९४९ मध्ये अयोध्येतील विवादास्पदस्थळी रामाची मूर्ती आणून ठेवल्यानंतर घोषणाबाजी करणाऱ्या ज्या काही लोकांना अटक झाली त्यात होते हाशिम अन्सारी. विवादास्पद जागी मशीद होती की ती रामजन्मभूमी होती, यासाठी मग जी कायदेशीर लढाई सुरू झाली त्यातही अन्सारी होते. दोन्ही समाजात कोणतीही कटुता येणार नाही याची दक्षता घेत ते ही लढाई धर्मासाठी लढत राहिले. अयोध्येत १९२१ साली त्यांचा जन्म झाला. वडिलांचे निधन झाल्यानंतर त्यांनी टेलरिंगचा पिढीजात व्यवसाय सांभाळला. १९५२ मध्ये विवादास्पद जागेवर ‘अजमन’ दिल्याच्या आरोपावरून फैजाबाद न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. पुढे १९६१ मध्ये सुन्नी वक्फ मंडळाने याप्रकरणी न्यायालयात दावा दाखल केल्यानंतर त्यांनाही एक पक्षकार करण्यात आले. यामुळे पोलिसांची त्यांच्यावर कायम नजर असे. या खटल्याशी संबंधित असल्याने मग आणीबाणीत त्यांनाही स्थानबद्ध करण्यात आले. आठ महिने त्यांना बरेलीच्या तुरुंगात ठेवण्यात आले. याच कारणामुळे ते कायम काँग्रेसचे कट्टर विरोधक राहिले. वादग्रस्त जागेपासून अवघ्या ४०० मीटर अंतरावर ते राहात असत. वादग्रस्त जागा मशिदीचीच आहे असा त्यांचा दावा असला तरी आपल्या स्वार्थासाठी याप्रकरणी राजकारण करणाऱ्या मुस्लीम नेत्यांवरही ते वेळोवेळी टीकाच करीत. हा मुद्दा शांततेनेच सोडवला जावा हीच त्यांची भूमिका होती. ‘न्यायालयाने आमच्या बाजूने निकाल दिला तरी जोपर्यंत अयोध्येतील बहुसंख्य हिंदू मान्यता देणार नाहीत तोपर्यंत मशिदीचे काम सुरू करणार नाही’ इतकी त्यांची भूमिका स्पष्ट होती. १९९२ मध्ये बाबरी जमीनदोस्त झाल्यानंतर दंगेखोरांनी त्यांचे घरही पेटवून दिले. पण शेजारी राहणाऱ्या हिंदू कुटुंबांनी त्यांना व त्यांच्या परिवाराला आश्रय दिला. नंतर सरकारकडून जी भरपाई मिळाली त्यातून त्यांनी पुन्हा घर उभारले. उरलेल्या पैशातून एक जुनी गाडी खरेदी केली. त्यांचा मुलगा इक्बाल ती गाडी पर्यटकांसाठी वापरायचा. त्यातही आजूबाजूच्या हिंदू तीर्थस्थळांना जाण्यासाठीच ती वापरली जात असे हे विशेष. खटला चालू राहील पण त्याही पलीकडे माणुसकी महत्त्वाची, असे ते मानत. गावातील हिंदू मुस्लीम कुटुंबांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. निर्मोही आखाडय़ाचे रामकेवल दास आणि दिगंबर आखाडय़ाचे रामचंद्र परमहंस यांच्याशी शेवटपपर्यंत त्यांची मैत्री होती. गावातही सर्वधर्मीय लोक त्यांना चाचा म्हणूनच संबोधत. बाहेरून येणाऱ्या लोकांनीयेथील वातावरण कलुषित केले याची त्यांना खंत होती. गेल्या वर्षी ते मक्का येथे गेले असताना ‘इतर अनेक देशांच्या तुलनेत भारतात मुस्लिमांना भरपूर स्वातंत्र्य आहे,’ असे प्रशंसोद्गार त्यांनी काढले होते. गेली काही वर्षे ते याप्रकरणी न्यायालयाबाहेर समझोता व्हावा, यासाठीही प्रयत्न करीत होते. मात्र सहा दशकांहून अधिक काळ लढा देऊनही त्याचा निवाडा येण्याआधीच ते पैगंबरवासी झाले आणि अयोध्येतील हिंदू-मुस्लीम मैत्रीचे प्रतीक बनलेले आणखी एक पिकले पान गळाले..