मराठी साहित्यात श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनी सुरू केलेली विनोदी साहित्याची परंपरा पुढे समृद्ध होत गेली. राम गणेश गडकरी, आचार्य अत्रे, चिं. वि. जोशी, पु. ल. देशपांडे, द. मा. मिरासदार, सुभाष भेंडे, गंगाधर गाडगीळ आदी अनेक दिग्गजांनी साहित्यातील हे दालन गाजवले. यात आणखी एक नाव येते चतुरस्र प्रतिभेचे साहित्यिक जयवंत दळवी ऊर्फ ठणठणपाळ यांचे. मॅजेस्टिक प्रकाशनचा ‘जयवंत दळवी स्मृती पुरस्कार’ यंदा विनोदी लेखसंग्रहासाठी ठेवण्यात आला होता. हा पुरस्कार कथा, कादंबरी, नाटक, एकांकिका, बालसाहित्य आणि विनोदी लेखन अशा विविध साहित्य प्रकारांत मुशाफिरी करणाऱ्या प्रा. अनिल सोनार यांना जाहीर झाला असून त्यांच्या ‘उडाला तर कावळा, बुडाला तर बेडूक’ या विनोदी लेखसंग्रहाला तो देण्यात येणार आहे. मराठी साहित्यातील प्रतिष्ठेच्या या पुरस्काराचे यंदाचे २०वे वर्ष आहे. ७२ वर्षीय प्रा. अनिल सोनार यांची आतापर्यंत ७२ पुस्तके प्रकाशित झाली असून मराठीतील मान्यवर प्रकाशकांनी त्यांची विविध पुस्तके प्रकाशित केली आहेत. ‘सारे प्रवासी तिमिराचे’ (नाटक) हे सोनार यांचे प्रकाशित झालेले पहिले पुस्तक. पुढे ‘कलावैभव’ नाटय़ संस्थेने ‘सारे प्रवासी तिमिराचे’ हे व्यावसायिक रंगभूमीवर सादर केले. त्यांची इतरही चार ते पाच नाटके ‘कलावैभव’ने सादर केली आहेत. सोनार यांनी लिहिलेले ‘मालकीण मालकीण दार उघड’ हे नाटक खूप गाजले. आत्माराम भेंडे, बबन प्रभू, किशोर प्रधान या दिग्गज अभिनेत्यांनी त्यात काम केले होते. ‘बिनपराचा कावळा’ (कादंबरी), ‘विश्वसुंदरी सुलभ हप्त्यावर’, ‘फुलपाखराचा दंश’ (कथासंग्रह), ‘द्वंद्व’, ‘प्रतिकार’, ‘अग्निवेश’, ‘चंद्रहास’, ‘गणपतवाणी’ (नाटके), ‘तोपर्यंत नमस्कार’ (एकांकिका) ‘कविता सच्ची कच्ची आणि लुच्ची’ आदी त्यांची गाजलेली पुस्तके. ‘गणपत वाणी’ या नाटकास महाराष्ट्र राज्य शासनाचा ‘राम गणेश गडकरी’ पुरस्कार मिळाला होता. ‘मालकीण मालकीण दार उघड’ या नाटकासाठी सोनार यांना आचार्य अत्रे फाऊंडेशनच्या ‘आचार्य अत्रे’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते, तर त्यांनी लिहिलेल्या ‘द्वंद्व’ नाटकाला नवी दिल्ली येथे झालेल्या अखिल भारतीय स्तरावरील स्पर्धेत पहिले पारितोषिक मिळाले होते. सोनार यांच्या ‘फुलपाखराचा दंश’ या कथासंग्रहातील ‘संन्यासिनी’ ही कथा १४ भारतीय भाषांमध्ये अनुवादित झाली आहे. मराठीबरोबरच सोनार यांनी हिंदीतही काही नाटकांचे लेखन केले आहे. ‘वर्षां विडंबन’ या पुस्तकात सोनार यांनी एक वेगळा प्रयोग केला. मराठीतील विविध मान्यवर कवींच्या लेखनशैलीचे विडंबन त्यांनी या पुस्तकात केले. ‘पाऊस’ या विषयावर हे कवी त्यांच्या शैलीत कविता कशी लिहितील ते त्यांनी या पुस्तकात सादर केले आहे. आपल्या आजूबाजूला जे घडते त्याची प्रतिक्रिया त्यांच्या लेखनातून व्यक्त होत असते. हे लेखन कधी विसंगती स्वरूपात विनोदी व मिस्कीलपणे तर कधी गंभीरतेने व परखडपणे व्यक्त होते.