जलतरण, अॅथलेटिक्स यांसारख्या वैयक्तिक क्रीडा प्रकारांमध्ये ऑलिम्पिक पदकांची लयलूट करता येत असते, याचे महत्त्व भारतीय क्रीडा संघटकांना अद्यापही मनापासून कळलेले नाही. त्यामुळेच समशेर खान यांच्यासारख्या गुणवंत जलतरणपटूंची आपल्या देशात उपेक्षाच केली गेली. प्रसिद्धीपासून खूप दूर असलेल्या समशेर खान यांनी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेतील जलतरणात पात्रता फेरीत पाचव्या क्रमांकापर्यंत धडक मारली होती, असे आज कोणाला सांगूनही पटणार नाही. त्यांनी ब्रेस्टस्ट्रोक व बटरफ्लाय या दोन्ही शर्यतींमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. दीर्घकालीन आजारामुळे त्यांचे नुकतेच निधन झाले. आजकाल ऑलिम्पिकसाठी निवड झालेल्या खेळाडूंवर बक्षिसांचा वर्षांव होतो. मात्र समशेर खान यांना १९५६च्या ऑलिम्पिकसाठी अतिशय संघर्ष करावा लागला याचीही कुणाला फारशी कल्पना नसेल. त्याआधी १९५४ मध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत समशेर यांनी दोनशे मीटर बटरफ्लाय शर्यतीत राष्ट्रीय विक्रम नोंदविला. हे यश चमत्कार नाही याचा प्रत्यय घडवीत त्यांनी १९५५च्या राष्ट्रीय स्पर्धेत अनेक शर्यतींमध्ये विक्रम नोंदविले. या कामगिरीमुळेच त्यांना मेलबर्न येथील १९५६च्या ऑलिम्पिकमध्ये भाग घेण्याचा मान मिळाला. ऑलिम्पिकच्या पात्रता फेरीत त्यांना पाचवे स्थान मिळाले; मात्र तशी कामगिरी आजतागायत एकाही भारतीय जलतरणपटूला करता आलेली नाही. समशेर यांच्या वेळी हल्लीच्या खेळाडूंना मिळतात तशा कोणत्याच सुविधा व सवलती नव्हत्या. मार्गदर्शनासाठी अनुभवी व परदेशी प्रशिक्षकही नव्हते. ऑलिम्पिकला जाण्यासाठी शासनाने त्यांचा विमानखर्च केला, मात्र प्रत्यक्ष स्पर्धेसाठी होणारा अन्य खर्च त्यांनाच करावा लागला होता. ते सैन्यदलात नोकरी करीत होते. ऑलिम्पिकसाठी होणाऱ्या अन्य खर्चाची तजवीज करण्यासाठी त्यांना तीनशे रुपये कर्ज घ्यावे लागले होते. ऑलिम्पिकमध्ये चांगली कामगिरी करून मायदेशी परतल्यानंतर त्यांच्या यशाचे फारसे कौतुक झाले नाही. त्यांच्या वेळी खेळाडूंना खेळात करिअर करणे शक्य नव्हते. त्यामुळेच त्यांच्या नैपुण्यास अपेक्षेइतकी संधी मिळाली नाही. सैन्यदलात असल्यामुळे त्यांना १९६२, १९७१ व १९७३च्या युद्धांमध्ये भाग घेता आला. क्रीडा-कारकीर्द मात्र झाकोळलीच. निवृत्तीनंतर आंध्र प्रदेशात गुंटूर जिल्ह्य़ातील एका खेडेगावात ते राहात. त्यांच्या घराचे चक्रीवादळात व पुरात अनेक वेळा नुकसान झाले आहे. मात्र त्याबद्दल त्यांना अत्यंत तुटपुंजी नुकसानभरपाईच काय ती मिळत राहिली. आंध्र प्रदेश सरकारने अखेर २०१६ साली -म्हणजे नव्वदी पूर्ण केल्यावर- त्यांना २५ लाख रुपयांचा विशेष पुरस्कार दिला. आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये भाग घेतलेल्या खेळाडूंना निवृत्तिवेतन किंवा गौरवनिधी देण्याची योजना आखण्यात आली आहे. मात्र समशेर यांना त्याचा कधीच लाभ मिळाला नाही. ऑलिम्पिकमध्ये भाग घेतल्याबद्दल त्यांचा फारसा सन्मानही झाला नाही. त्यामुळेच की काय आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात त्यांना अतिशय हलाखीच्या जीवनास सामोरे जावे लागले. त्यांना वैद्यकीय उपचारासाठी काही जणांनी आर्थिक मदत देऊ केली, मात्र आपण राष्ट्रीय विजेते खेळाडू आहोत, आपल्याला सन्मानानेच वागविले गेले पाहिजे, अशी त्यांची भूमिका असे व त्या भूमिकेशी ठाम राहून त्यांनी ही मदत नाकारली होती. अन्य खेळांमधील आंतरराष्ट्रीय खेळाडूंना ज्याप्रमाणे सन्मान व मानमरातब मिळतात, त्याप्रमाणे पूर्वीच्या काळातील ऑलिम्पिक जलतरणपटूंना सन्मान दिला पाहिजे, असेच त्यांना या कृतीमधून सुचवायचे असावे. क्रिकेटचा एक आंतरराष्ट्रीय सामना खेळलेल्या माजी खेळाडूलाही भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे भरपूर निवृत्तिवेतन दिले जाते. खेदाची बाब अशी की, अन्य खेळांमधील खेळाडूंचा तसा क्वचितच गौरव केला जातो. यामुळेच समशेर यांच्यासारख्या अव्वल दर्जाच्या खेळाडूंना काळाच्या पडद्याआड जाण्याआधीच स्मृतिपटलाच्या आड राहावे लागते.