धुळवडीच्या दिवशी वाकाच्या उसळी खेळपट्टीवर टीम इंडियाने विश्वचषक स्पर्धेत वेस्ट इंडिज संघाला नमवून सलग चौथा विजयी रंगोत्सव साजरा केला. या विजयासह भारतीय संघाने विश्वचषकातील उपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थान पक्के केले आहे. पर्थवरील टीम इंडियाच्या विजयाची कारणे पुढीलप्रमाणे.भन्नाट गोलंदाजी-पर्थवरील विंडीजविरुद्धच्या विजयात टीम इंडियाच्या गोलंदाजांचा मोठा वाटा आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा वेस्ट इंडिजचा निर्णय यावेळी टीम इंडियाच्या गोलंदाजांनी चुकीचा ठरवून दाखवला. सुरूवातीच्या षटकात मोहम्मद शमी आणि उमेश यादवने कॅरेबियन्स फलंदाजांना अक्षरश: जखडून ठेवले. धावांवर अंकुश ठेवण्यात भारताला यश येत असल्याने वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी मोठे फटके मारण्याच्या नादात विकेट्स गमावण्यास सुरूवात केली. मोहम्मद शमीने ख्रिस गेलच्या फलंदाजीची दुखती नस ओळखून योग्य टप्प्यात केलेला भेदक मारा आठवणीत ठेवण्यासारखा होता. शमीला उमेश यादवने देखील जबरदस्त साथ दिली आणि दोन महत्त्वपूर्ण विकेट्स मिळवल्या.फिरकी गोलंदाजांचा कॅरेबियन्सवर अंकुश-शमी आणि उमेशच्या यशस्वी गोलंदाजीला फिरकीपटू आर.अश्विन आणि रविंद्र जडेजानेही उत्तम साथ देत विंडीजच्या धावसंख्येवर अंकुश ठेवला. अश्विनने ९ षटकांत ३८ धावा देऊन एका फलंदाजाला तर, जडेजाने ८.२ षटकांत केवळ २७ धावा देऊन दोघांना माघारी धाडले.धोनीची जबाबदारी संयमी फलंदाजी-वेस्ट इंडिजच्या १८३ धावांच्या कमकुवत आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियालाही परिश्रम करावे लागले. जेरॉम टेलने टीम इंडियाच्या सलामीवीरांना स्वस्तात माघारी धाडले होते. त्यानंतर विराट कोहलीने ३३ धावांची खेळी साकारून संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. विराट बाद झाल्यानंतर टीम इंडियाची पडझड होण्यास सुरूवात झाली होती. अखेर धोनीने कर्णधारी जबाबदारीने संयमी फलंदाजी करत मैदानात जम बसवला आणि ५६ चेंडूत नाबाद ४५ धावांची खेळी केली. एका बाजूला मागोमाग विकेट्स पडत असताना मैदानात उभे राहून टीचून फलंदाजी करणे महत्त्वाचे होते आणि तेच धोनीने केले.