परवा एक रुग्ण दवाखान्यात आले होते, त्यांना पित्ताशयात पित्ताचा खडा झाला होता. रुग्ण तपासणी करताना लक्षात आले की ते गेली कित्येक वर्षे पित्त झाले की अ‍ॅण्टासिडच्या गोळ्या घेत असत. आजकाल जाहिरातीमध्येसुद्धा एका हातात वडापाव व दुसऱ्या हातात अ‍ॅण्टासिड असलेली जाहिरात पाहायला मिळते. खरंच अ‍ॅण्टासिडमुळे पित्त कमी होते का? पित्त म्हणजे नक्की काय आहे? या पित्ताचे खडे होतात म्हणजे नक्की काय? आणि याचे काही प्रकार असतात का? या पित्तावर काही घरगुती आज्जीबाईच्या बटव्यातील औषध आहे का? हे आज आपण पाहू.

आयुर्वेदात वात, पित्त आणि कफ असे त्रिदोष आहेत. जे प्राकृत अवस्थेत उपयोगी व शरीराचे धारण करणारे आहेत तर विकृत झाले की हेच शरीरातील इतर घटकांना बिघडवून आजार निर्माण करतात. पैकी पित्त हे अन्नपचन प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाचा घटक त्यामुळे त्याचे प्राकृत असणे फारच महत्त्वाचे. हे ज्याप्रमाणे पित्ताशयातून येत असते त्याचप्रमाणे घेतलेल्या आहारातूनही तयार होत असते. त्यामुळे पित्ताशय जरी काढून टाकला तरी त्याचे काम आपल्या आमशयामध्ये चालू असते. ज्याप्रमाणे आपण तुपाचा दिवा लावल्यानंतर तूप जळून त्यातून अग्नी तयार होतो त्याचप्रमाणे आपल्या शरीरातसुद्धा घेतलेला आहार जळतो आणि त्यातून अग्नी म्हणजेच जठराग्नी तयार होतो. म्हणून तर आपण जेवणामध्ये तिखट, तेलकट पदार्थ खाल्ले की आपली भूक उलट वाढते, अजून अन्न खावेसे वाटते व पर्यायाने पित्तही वाढते. मात्र आपण गोड पदार्थ खाल्ले की आपली लगेच भूक शमते व आपले पित्तही कमी होते. पण आपण जास्त व अधिक मात्रेत गोड पदार्थ खाल्ले की भूकच मंदावते व अग्निमांद्य होते. म्हणजे आपण जे खातो त्याचे अगोदर पित्तात व पर्यायाने अग्नीत रूपांतर होते. म्हणून पित्त वाढू द्यायचे नसेल तर आपण काय खातो हे पाहणे जास्त महत्त्वाचे असते. आपण पित्तवर्धक आहार करत असू आणि वरून अ‍ॅण्टासिडच्या गोळ्या खात असू तर पित्त वाढलेले असतेच, आपण फक्त गोळीने त्याचे तात्पुरते शमन करतो. त्यामुळे ते घट्ट होते आणि हळूहळू त्याचे खडे बनू लागतात. या पित्ताचा प्रत्येकाला होणारा त्रास वेगवेगळा असतो. जसे की- काहींना घशात, छातीत जळजळ-मळमळ होते, काहींना जेवणानंतर करपट ढेकरा येतात, पोटात जळजळ होते, तर काहींना अपचन, मूळव्याध मागे लागते. काहींचे पित्त वाढले की डोके दुखू लागते. काहींना त्वचाविकार मागे लागतात तर काहींच्या अंगाला फक्त खाज सुटते. अंग नेहमी गरम वाटते, डोळ्यातून आग आग होते तर काहींना केस गळणे-पिकणे, मासिकपाळीच्या तक्रारी, चेहऱ्यावर तरुण्यापीटिका किंवा अंगावर बारीक बारीक फोड येऊ  लागतात. हे सर्व वेगवेगळी लक्षणे दिसत असली तरी हे होण्यामागचे कारण मात्र वाढलेले पित्तच असते. आणि हे तात्पुरते शमविण्यासाठी आपण जेवढे अ‍ॅण्टासिडच्या गोळ्या घेणार तेवढा हा त्रास भविष्यात वाढणार अथवा पुढे जाऊन पित्ताशयात पित्ताचे खडे होणार. म्हणून सततच्या अशा गोळ्या खाणे योग्य नाही. हे वाढलेले पित्त उलटी किंवा जुलाब म्हणजेच वमन किंवा विरेचनाने काढून टाकणे हाच त्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. त्यामुळे अजूनही गावाकडे काही लोकांचा रोज सकाळी मोठा आवाज करत पित्त काढण्याचा उपक्रम चालू असतो. पण हेसुद्धा रोज रोज करणे योग्य नव्हे.
वसंत ऋतूमध्ये म्हणजे साधारण मार्च-एप्रिलमध्ये एकदा शास्त्रोक्त वमन घेतल्यास व शरद ऋतूमध्ये म्हणजे साधारण ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये विरेचन घेतल्यास या पित्ताच्या त्रासापासून कायमची मुक्ती मिळते. मात्र या पित्ताचा त्रास तात्पुरता कमी करायचा असेल तर प्रथमत: पित्तकारक पदार्थ खाणे टाळा. तसेच घरच्या घरी एक चमचा धणे व एक चमचा जिरे कुटून बारीक करून एक ग्लास कोमट पाण्यात १० मिनिटे भिजत ठेवा व नंतर गाळून प्या. आहारात गाईच्या तुपाचे प्रमाण वाढवा. गुलकंद, मनुके, खडीसाखर असे पदार्थ पित्त वाढल्यास तात्पुरत्या शमनासाठी उपयोगी ठरू शकतात.
लक्षात ठेवा पित्त वाढले की चिडचिड वाढणार, चिडचिड वाढली की काम बिघडणार की मग परत चिडचिड वाढून पित्त वाढणार. या दुष्टचक्रातून बाहेर यायचे असेल तर आयुर्वेदाशिवाय पर्याय नाही.

AAP MP Sanjay Singh
“केजरीवालांचा तुरुंगात छळ होतोय”, आप खासदार संजय सिंहांचा आरोप; म्हणाले, “त्यांच्या पत्नीलाही…”
gangster mukhtar ansari family
स्वातंत्र्यसैनिक ते कुख्यात गुंड; एका कुटुंबाचा सुरस व चमत्कारिक प्रवास
death of Uttar Pradesh gangster Mukhtar Ansari
अन्सारीच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी, उपचारादरम्यान मृत्यू; तुरुंगात विषप्रयोग केल्याचा कुटुंबीयांचा आरोप
Mukhtar Ansari death
कुख्यात गुंड मुख्तार अन्सारीच्या तुरुंगात मृत्यूनंतर न्यायालयीन चौकशीचे आदेश

– वैद्य हरीश पाटणकर