बिहारमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी भाजपचा चेहरा न दिल्याने अकारण ही निवडणूक नरेंद्र मोदी विरुद्ध नितीश कुमार अशी झाली. त्यातच, सरसंघचालकांच्या आरक्षण-वक्तव्यामागील हेतू समजून घेण्याची हिंमत भाजपने दाखविली नाही. पुरस्कार परत करणाऱ्यांतील सत्शील आणि प्रामाणिकांच्या भावनांची कदरही न करता, प्रचाराची पातळी मात्र बिहारात भाजपने खाली आणली. त्यामुळे भाजपच्या पराभवाचे कारण भाजपच..

कोणताही विजय अंतिम नसतो. राजकीय निवडणुकीतील तर नाहीच नाही. परंतु ही साधी बाब पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी ध्यानात घेतली नाही आणि परिणामी हे बिहारी पानिपत घडले. लोकसभा निवडणुका जिंकल्या म्हणजे आपण अजेय आहोत, असा समज या दुकलीचा झाला होता. वास्तविक दिल्ली निवडणुकांनी जनमताचे वारे किती चंचल असतात याची जाणीव करून दिली होती. लोकसभा निवडणुकांनंतर अवघ्या काही महिन्यांत झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकांत भाजप पार धुळीस मिळाली. तरीही या दोघांनी काहीही बोध घेतला नाही. नंतर महाराष्ट्रानेही काही प्रमाणात तसाच इशारा दिला. आपण आता इतके मोठे झालो आहोत की आपण म्हणू तीच पूर्वदिशा असेल आणि आपलाच प्रचार निर्णायक ठरेल अशी मोदी यांची घमेंड होती. ती आधी दिल्लीने आणि नंतर महाराष्ट्राने उतरवली. तरीही हे गृहस्थ शिकावयास तयार नाहीत. या दोन्ही निवडणुकांतील साम्य म्हणजे या दोन्ही निवडणुका भाजपने मोदी यांच्या नावाने लढल्या. दोन्ही ठिकाणी कोणताही स्थानिक चेहरा मुख्यमंत्री म्हणून भाजपने दिला नाही. त्याचा फटका या दोन्ही राज्यांत भाजपला कमीअधिक प्रमाणात बसला. केवळ मोदी म्हणजे भाजपसाठी सर्वस्व असतीलही. परंतु मतदारांनी ते मानले नाही. दिल्लीने तर भाजपस लाथाडले आणि महाराष्ट्राने त्या पक्षास वाकावयास लावले. कोणीही किमान शहाण्याने जे काही झाले त्यावरून बोध घेत आपल्या मार्गात बदल केला असता. मोदी आणि शहा यांनी ते केले नाही. दिल्ली निकाल ही जर चपराक होती, महाराष्ट्र निवडणूक ही त्या चपराकीची जाणीव करून देणारी होती तर बिहार विधानसभा निवडणूक ही मतदारांनी त्या पक्षाच्या कंबरडय़ात घातलेली लाथ आहे. कारण हा केवळ आकडय़ांतून समजावा इतका साधा पराभव नाही. एकहाती सत्ता मिळवू पाहणारा भाजप त्या राज्यात थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला आहे. चारा-चौर्यातील आरोपी लालूप्रसाद यादव यांच्या राजदनेही भाजपला मागे टाकले आहे. आता मोदीभक्त चाराचोरास निवडून दिले म्हणून बिहारी जनतेस बोल लावताना दिसतात. पण ही आत्मवंचना ठरेल. याचे कारण निवडणूकपूर्व भाषणबाजीत अपसव्य ठरलेले सर्व काही जिंकून आल्यावर कसे सव्य ठरते हे खुद्द मोदी यांनी बारामतीत दाखवून दिले आहेच. म्हणजे भाजपस भ्रष्टाचाराचे दाखवले जाते तितके वावडे आहे, असे नाही. दुसरे असे की भाजपनेच अनेक भ्रष्ट आणि वादग्रस्तांना उमेदवारी दिली होती. तेव्हा बिहारी जनतेस बोल लावण्याचे काहीही कारण नाही. भाजपच्या या लज्जास्पद पराभवास एकच घटक जबाबदार आहे.
तो म्हणजे भाजप. ते पाप मोदी-शहा यांचेच. या दोघांनी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा दिला नाही. सुशीलकुमार मोदी हे भाजपचे त्या राज्यातील संयत आणि समंजस नेतृत्व. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून त्यांची कामगिरी उत्तम होती. अखिल भारतीय वस्तू व सेवा कर समितीचे प्रमुख म्हणूनही ते प्रभावशाली ठरले. तेव्हा ते सर्वार्थाने बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचे नसíगक वारसदार होते. परंतु या मोदींचे कौतुक करणे त्या मोदींना जमले नाही. कारण काय? तर उपमुख्यमंत्री म्हणून या सुशीलकुमार मोदी यांनी नितीश कुमार यांना कधीकाळी पंतप्रधानपदासाठी लायक म्हटले होते. त्याचा राग त्या मोदींना होता. देशाच्या सर्वोच्च पदी बसल्यानंतरही या असल्या क्षुल्लक चुका ते मोदी माफ करू शकले नाहीत. त्यामुळे भाजपने ही निवडणूक मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोरा ठेवून लढली. साहजिकच प्रचाराची सर्व धुरा नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी सांभाळली. वास्तविक देशाच्या सर्वोच्च पदावरील व्यक्तीस आपण कशासाठी काय पणास लावीत आहोत, याचेही भान असणे अत्यावश्यक असते. ते आपल्याला नाही असे मोदी यांनी दाखवून दिले आणि अकारण ही निवडणूक नरेंद्र मोदी विरुद्ध नितीश कुमार अशी केली. एखाद्या राज्याच्या निवडणुकांत पंतप्रधानाने इतका रस घ्यावयाचा नसतो. ही झाली एक चूक. प्रामाणिकपणा असेल तर दुसऱ्याचे खापर भाजपने सरसंघचालक मोहन भागवत यांच्या माथी फोडावयास हवे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर सरसंघचालकांनी आरक्षण धोरणाच्या फेरतपासणीची मागणी करून भाजपच्या तोंडचे पाणी पळवले. सरसंघचालकांनी हे वक्तव्य संघाच्याच मुखपत्रास दिलेल्या मुलाखतीत केले. म्हणजे पत्रकारांनी विधानाचा विपर्यास केला असेही म्हणावयाची सोय नाही. या संदर्भात लक्षात घ्यावीच अशी बाब म्हणजे सरसंघचालकपदावरील व्यक्ती अनवधानाने काही बोलत नाही. ते म्हणजे कोणी सांस्कृतिकमंत्री बेशर्मा महेश वा कोणी व्हीके सिंग वा आचार्य गिरीरीज किशोर नव्हेत. तेव्हा सरसंघचालक जे काही बोलले ते निश्चित हेतूनेच. तो काय हे समजून घेण्याची िहमत भाजपने दाखवली नाही. त्या क्षणापासून भाजपची गाडी घसरली ती घसरलीच. ही बाब अनेक प्रसारमाध्यमे आणि अन्यांनीही दाखवून दिली होती. तिकडेही भाजपने दुर्लक्ष केले आणि माध्यमांच्या हेतूंवर संशय घेतला. एव्हाना दादरी आणि अन्य प्रकरणे घडली होती आणि त्यामुळे भाजपमधील अतिरेक्यांच्या जिभांना चांगलीच धार चढली होती. त्यांना वठणीवर आणण्याचे साधे कर्तव्यही मोदी-शहा दुकलीने पार पाडले नाही. याचाच परिणाम म्हणून पुरस्कारवापसीची नाटके सुरू झाली. त्यातील अनेक दांभिक होत वा आहेत हे मान्य. परंतु त्यातील काही सत्शील आणि प्रामाणिकांच्या भावनांची कदर तरी भाजपने राखावयास हवी होती. सत्ताधाऱ्यांनी तेही केले नाही. त्याचाही परिणाम मतदारांवर निश्चितच झाला आणि भाजपची प्रतिमा अधिकाधिक असहिष्णू होत गेली. ते समजून घेण्याची गरजही भाजपस वाटली नाही. उलट नितीश कुमार कसे तांत्रिकाचे मार्गदर्शन घेतात हे सांगण्यात मोदी यांनी धन्यता मानली. हे प्रचाराची पातळी सुटल्याचे लक्षण होते. तांत्रिकमांत्रिकाकडे जाणे ही नितीश कुमार यांची चूकच. परंतु ती दाखवून देण्याइतके बुद्धिवादी मोदी कधी झाले? स्वतच्या हातात गंडेदोरे बांधून प्रचार करणारे पंतप्रधान कोणत्याही भगव्या कफनीवाल्यांसमोर वाकतात, ते कसे? तेव्हा मोदी यांचे चुकलेच. ती चूक-परंपरा अमित शहा यांनी पाकिस्तान वक्तव्याने एक पाऊल पुढे नेली. नितीश कुमार, लालू जिंकले तर पाकिस्तानात आनंदोत्सव साजरा होईल हे निर्लज्ज वक्तव्य म्हणजे समस्त बिहारी जनतेचा अपमान होता. त्याची कोणतीही खंत या दोघांनी कधी व्यक्त केली नाही. पंतप्रधान मोदी त्यानंतर आणखी पुढे गेले. एरवी विकास राजकारणाचा दावा करणाऱ्या मोदी यांनी नितीश कुमार हे मुसलमानांना आरक्षण देणार असल्याची पुडी सोडली आणि प्रचाराची पातळी आणखी खाली गेली. पंतप्रधानपदावरील व्यक्तीने पदाची उंची साभाळायची असते. या वक्तव्याने मोदी यांनी ती कमी केली. यातील आक्षेपार्ह भाग असा की अन्यांनी केलेल्या या आणि अशाच विधानास निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला. परंतु पंतप्रधानांबाबत आयोगाने मौन पाळले. ही बाब घटनादत्त पदाची उंची वाढवणारी नाही. तोच मुद्दा ऐन मतदानाच्या दिवशी गाईच्या प्रतिमांच्या जाहिरातींबाबत. नितीश कुमार, लालू सत्तेवर आले तर गाई वाचणार नाहीत, असा अर्थ त्यातून निघत होता आणि त्यासही आयोगाने फक्त आक्षेप घेण्याखेरीज काहीही केले नाही.
अखेर ते काम मतदारांनीच केले. मतदारांची ही नाराजी इतकी तीव्र की काँग्रेसचीदेखील या निवडणुकीतील कामगिरी सुधारली. जेमतेम ४० जागा लढवणाऱ्या काँग्रेसने जवळपास निम्म्या जागा पटकावल्या. या सगळ्यांतून एक अर्थ निघतो. तो म्हणजे मतदारांना भाजपची घमेंड आवडलेली नाही. हा अहं कामगिरीतून आला असता, तर एकवेळ क्षम्य. परंतु त्या आघाडीवर सत्ताधारी भाजपची कामगिरी यथातथाच आहे. आíथक सुधारणांची बोंब, प्रशासकीय सुधारणांना सुरुवातही नाही आणि सर्व नुसत्या बोलगप्पाच. हे पुरेसे नाही म्हणून की काय आकाशाकडे निघालेले डाळींचे दर. २०० रुपये प्रतिकिलोवर साध्या तूरडाळीचे दर जात असतील तर मतदार त्यावर नाराज होणार नाहीत, असे मानणे दुधखुळेपणाचे ठरते. वर वागणुकीतला माज. भारतीय मानसिकतेस नम्रता भावते. भले ती दांभिक का असेना. पण भारतीय मातीत नाळ असल्याचा दावा करणाऱ्या भाजपला हे कळले नाही आणि परिणामी तो पक्ष अनेक आघाडय़ांवर लढत बसला. अखेर ढोपर फोडून घेण्याची वेळ त्या पक्षावर आली. अहंतागुणे यातना ते फुकाची असे समर्थ रामदास म्हणतात. त्याकडे दुर्लक्ष झाल्यास.. पुढे अंत येईल तो दैन्यवाणा.. हेही ते बजावतात. मनाचे श्लोक ऐकण्याइतका प्रामाणिकपणा त्या पक्षाने दाखवलेला नाही. आता निदान हे जनाचे श्लोक तरी त्या पक्षाने ऐकावेत. अन्यथा मतदार आहेतच.