जगातील सर्व लोकशाही देशांतील भांडवली बाजार सध्या चढे असून हा निर्देशांक वृद्धीचा दर थक्क करणारा, आणि म्हणून काळजी वाढवणारा आहे..

सेन्सेक्सची घोडदौड आहे, पण अर्थव्यवस्था जोमात आहे असे नाही. या वातावरणात, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा अहवाल पुढील धोक्याची जाणीव करून देणारा आहे..

वेदना वा दु:ख यांचे मूळ शोधून ते दूर करता आल्यास त्यावर मात करता येते. तसेच आनंद वा सुख यामागील कारण शोधून ते सुदृढ केल्यास ही भावना टिकविता येते. याचा अर्थ असा की भावना दु:खाची असो की सुखाची. तीमागील कारणांचे विश्लेषण करणे महत्त्वाचे. कारणाशिवाय आनंद उचंबळून येत असेल तर ती व्यक्ती वा समाज, अध्यात्मिक वा अज्ञानी यापैकी एक काही असू शकतो. अर्थसंकल्प सादर झाल्यापासून भांडवली बाजारास जे काही उधाण आले आहे ते पाहता वरील वैज्ञानिक सत्याचे स्मरण होते. अर्थसंकल्प सादर होता होताच भांडवली बाजाराचा निर्देशांक जवळपास २३०० अंकांनी उसळला. अर्थमंत्र्यांनी काही वाईट केले नाही, याचा तो आनंद म्हणून समजून घेता आला. पण दुसऱ्या दिवशीही तेच. हे सदा सर्वकाळ आनंदात थुईथुई नाचणारे डोके उठवतात. येथे प्रश्न बाजाराचा आणि त्यातील लाखो गुंतवणुकीदारांचा असल्याने डोके उठण्यापेक्षा काळजीची भावना अधिक. बाजारात जे काही सुरू आहे ते पाहता दावोस येथील ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या वतीने प्रसृत करण्यात आलेल्या जागतिक धोका अहवालास पुन्हा एकदा भेट देणे आवश्यक. सोमवारी या स्तंभात (‘अज्ञानी आनंद’) या अहवालाचा परिचय करून देण्यात आला. त्यातील दुसरा भाग अधिक उल्लेखनीय आणि सद्य:स्थितीत चपखल ठरतो. या अहवालाने जगासमोरील तातडीचे आणि दीर्घकालीन धोके यांचे स्वतंत्र वर्गीकरण केले आहे.

अकारण फुगणारा भांडवली बाजार हा पुढील तीन ते पाच वर्षांत जगास भेडसावणारा मोठा धोका, असे हा अहवाल नमूद करतो तेव्हा झरझर वर जाणारा सेन्सेक्स डोळ्यासमोर आल्याखेरीज रहात नाही. ‘इम्परफेक्ट मार्केट्स : अ डिसऑर्डरली इंडस्ट्रियल शेकआऊट’ अशा प्रकरणातून हा अहवाल आगामी धोक्याची जाणीव करून देतो. वास्तविक भांडवली बाजार आणि आर्थिक वास्तव यांचा काहीही थेट संबंध नाही. म्हणजे सेन्सेक्सची घोडदौड आहे म्हणून अर्थव्यवस्था जोमाने पळत आहे असे काही नाही. बाजार हा बुद्धीपेक्षा भावनेवर चालत असतो आणि या भावनेचे नियंत्रण जे बुद्धिपुरस्सर करू शकतात ते या वाहात्या गंगेचा ओघ आपल्या तिजोरीकडे वळवू शकतात. अन्यांना उलट या वास्तवाचा फटकाच बसतो. बाजारपेठेतील यशकथांवर भाळून हा वर्ग बाजाराकडे आकृष्ट होतो आणि हात पोळून घेतो. परत यामुळे बाजाराची बदनामी. हे दोन्ही टाळायचे असेल तर सध्या बाजारात जे काही सुरू आहे त्याचा अन्वयार्थ लावणे आवश्यक ठरते.

करोनोत्तर काळाची मांडणी करताना सध्या देशोदेशींच्या सरकारांनी आपला हात मोठय़ा प्रमाणावर सैल सोडला आहे. आपल्याकडेही निर्मला सीतारामन यांच्या ताज्या अर्थसंकल्पात हे दिसले. सरकारी खर्चास पैसे उपलब्ध व्हावेत म्हणून त्यांनी वित्तीय तूट ९.५ टक्क्यांपर्यंत वाढू देण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेसारख्या अतिश्रीमंत देशात तर ही तूट आताच १५ टक्क्यांच्या आसपास आहे. काही अपवादात्मक परिस्थितीत असे करणे काही गैर नाही. तथापि अशा पद्धतीच्या अर्थस्थितीत मोठय़ा प्रमाणावर रोखता वाढते. पैसा दुथडी भरून वाहू लागतो. त्यास कुठे ठेवू आणि कुठे नको अशी परिस्थिती होते. सध्या नेमके हेच झाले आहे. अशा परिस्थितीत मुबलक पैसा हाती खेळणाऱ्या वित्तसंस्थांना त्याच्या हंगामी गुंतवणुकीसाठी एखादी बरी जागा लागते.

भांडवली बाजार हे असे आकर्षक गुंतवणूकस्थळ. त्यामुळे केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील सर्व लोकशाही देशांतील भांडवली बाजार सध्या चढे असून हा निर्देशांक वृद्धीचा दर थक्क करणारा, आणि म्हणून काळजी वाढवणारा आहे. पाश्चात्त्य देशांतील व्याजदर हे नगण्य आहेत. २००८ सालच्या बँकिंग संकटानंतरही अशीच परिस्थिती होती. त्यावेळी बँकांनी व्याजदर शून्यवत केल्याने कर्जे मोठय़ा प्रमाणावर घेतली गेली आणि अशीच परिस्थिती निर्माण झाली. त्यावेळच्या संकटावर मात करण्यासाठी ‘फेड’ने- म्हणजे अमेरिकेच्या फेडरल रिझव्‍‌र्ह या मध्यवर्ती बँकेने ‘क्वान्टिटेटिव्ह ईझिंग’च्या नावाने बाजारात मोठय़ा प्रमाणावर रोकड नियमितपणे सोडली. त्यातून आलेल्या डॉलरच्या पुराचे पाणी प्रत्यक्षात आपल्या भांडवली बाजारात घुसले आणि निर्देशांक असाच चढत गेला. २०१३ नंतर अमेरिकी ‘फेड’ने धोरणाची दिशा बदलली आणि व्याजदर वाढवण्यास सुरुवात केली. त्याबरोबर लगेच वित्तीय संस्थांनी आपल्या बाजारातील गुंतवणूक काढून घेतली आणि मग आपला बाजार गडगडला. हा सर्व तपशील नमूद करण्याचे कारण आताही असेच होईल, हे सूचित करणे हा नाही.

तर भांडवली बाजार निर्देशांकांच्या आकाशस्थ प्रवासाचा जमिनीवरील संबंध समजून घेणे, हा यामागील उद्देश. त्यासाठी ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’चा सदर अहवाल महत्त्वाचा ठरतो. याचे कारण तो करोनोत्तर आर्थिक वास्तवाची जाणीव करून देतो. या संदर्भात या अहवालात धोक्याचे विविध पैलू उलगडून दाखवण्यात आले आहेत. देशांचा स्वत:चा राष्ट्रवादी असा कार्यक्रम आणि हाताबाहेर गेलेले तंत्रज्ञान हे यातील काही महत्त्वाचे मुद्दे. करोनातून बाहेर पडण्यासाठी अनेक राष्ट्रांनी विविध आर्थिक मदत योजना जाहीर केल्या. त्यांच्या उपयुक्ततेच्या यशात अर्थव्यवस्थांचे यश गुंतलेले आहे. या साथीचा सर्वात मोठा फटका बसला लघु आणि मध्यम उद्योजकांना. चीनसारख्या देशात या क्षेत्रात ८० टक्के रोजगार या क्षेत्रात आहेत. पण गेल्या फेब्रुवारी ते मे या काळात यातील १८ टक्के कंपन्या बंद पडल्या. अमेरिकेत हे प्रमाण २० टक्के इतके आहे. ज्या वाचल्या त्या आपले अस्तित्व टिकवण्यासाठी सरकारी दयेवर अवलंबून आहेत. यातही परत अधिक फटका बसला तो महिला आणि अल्पसंख्य-चलित उद्योगांना. या आणि अशा ज्या अन्य देशांना करोना-पूर्व कालीन अवस्थेकडे पोहोचल्याचा भास होतो त्या देशांतील अर्थव्यवस्थांत एक तणाव दिसून येतो. सरकारी आर्थिक मदत या उद्योगांना किती द्यायची आणि आरोग्यावर किती खर्च करायचा हा या सरकारांना पडलेला पेच. तो पडतो याचे कारण मदत देण्यासाठीचा निधी मर्यादित असतो आणि गरजवंत मात्र अमर्यादित. त्याचवेळी सरकारी मदत मिळणाऱ्या बडय़ा कंपन्या अन्यांच्या तुलनेत अधिक सावरतात आणि या काळात ‘गणंग कंपन्या’चे (झाँबी कंपनीज) फावते असा हा अहवाल नमूद करतो. तो किती वास्तववादी आहे हे आसपास नजर टाकल्यास लक्षात येईल. आपल्याकडेही अशा प्रकारच्या कंपन्या मोठय़ा प्रमाणावर उदयास आल्या असून त्यांचा प्रगतीचा वेग स्तिमित करणारा आहे. हे सर्व ठीक. तथापि या वातावरणात मोठय़ा आर्थिक संकटाची बीजे लपलेली आहेत आणि तसे खरोखरच संकट आल्यास त्याचा निम्नस्तरातील जनतेस मोठा फटका बसेल हा या अहवालातील इशारा गांभीर्याने घेण्याची गरज आहे. या काळात तंत्रज्ञान कंपन्यांचे भलतेच फावते, ही अहवालातील प्रतिक्रियाही सूचक ठरते.

या साऱ्याकडे एरवी दुर्लक्ष करता आले असते वा तसे ते झालेही असते. तथापि गेल्या दोन दिवसांतील शेअरबाजाराच्या तेजीने पुन्हा एकदा या अहवालाचा दाखला देणे आवश्यक केले. जमिनीवर सकारात्मक असे काहीच घडलेले नसताना भांडवली बाजारातील तेजी चक्रावून टाकणारी आहे. रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनाही ती तशी वाटली तर सामान्यांची काय कथा. अशावेळी या बुडबुडय़ाची मजा पुरेशी सावधानता बाळगूनच घेणे शहाणपणाचे. तो घेताना बुडबुडा कितीही मोठा झाला तरी त्याचा भरवसा नाही हे भान राहिले तरी पुरे.