विज्ञानाच्या पलीकडचे हे विज्ञान आहे असे बाबाजी म्हणतात.. त्यामुळे या विज्ञानाच्या अलीकडे असणाऱ्यांनी ते तपासून पाहण्याचा प्रश्नच नाही!

सापडला रे सापडला! शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा मार्ग सापडला. तोदेखील बिनखर्चाचा. बिनपाण्याचा आणि बिनखताचा. आता ना हमी किमतीची चिंता ना बाजारभावाची काळजी. या मार्गाचा अवलंब झाला की झाले.. पिके कशी भराभर वाढणार. त्यांच्या घाटाघाटात उभारी धरली जाणार, मातीतून चैतन्य गाणार आणि पेरापेरात साखर भरणार. मग प्रत्येक शेतकऱ्याला एवढे एकच काम काय ते उरणार.. महेंद्र कपूरचे, ‘मेरे देश की धरती सोना उगले, उगले हिरेमोती’ म्हणायचे. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यांवर हास्य फुलवणारा हा क्रांतिकारी मार्ग शोधून काढला आहे गुरुग्रामवधील डॉ. अवधूत शिवानंद ऊर्फ बाबाजी यांनी. या बाबांना शोधून काढले उषा सरदेसाई यांनी. आणि या उषा सरदेसाई साक्षात मा. विजय सरदेसाई यांच्या अर्धागी. काही मूढमती विचारू शकतात, हे विजय सरदेसाई कोण. हे सरदेसाई म्हणजे गोव्याचे तरुण तडफदार सारस्वत ज्यांच्या मध्यरात्रीच्या पाठिंब्यामुळे मनोहर पर्रिकर त्या राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकले. या सरदेसाई यांच्यावर त्यांच्या मंगळसूत्रीय मार्गाने आणि पर्तगाळ जीवोत्तम मठाधिपतींच्या कृपेने अनुग्रह झाला असून त्यामुळे आपल्या देशातील शेतीचा कायापालटच होणार आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याचा इतका परिणामकारक मार्ग शोधल्याबद्दल देशाचे आगामी कृषिमंत्री म्हणून सरदेसाई यांची नेमणूक व्हावी आणि त्यांना हा अद्भुत मार्ग दाखवणाऱ्या बाबाजी यांना थेट संयुक्त राष्ट्रांचे जागतिक कृषिदूत म्हणून नेमले जावे यासाठी भाजपचे दोन कुलबाबा (कुलदैवत तसे कुलबाबा)- जे की रामदेव आणि श्री श्री रविशंकर – यांनीच प्रयत्न सुरू केल्याचे समजते.

तर काय हा मार्ग? काहीही नाही. शेतकऱ्यांनी आपली जमीन रापायची. योग्य वेळी कसायची.  पेरणी करायची आणि आपल्या शेतात फक्त २० मिनिटे दररोज ‘ओम रोम जुम साहा’ या मंत्राचा जप करायचा. की काम फत्ते. पाऊस कमी पडो की जास्त. खत असो वा नसो. आणि कीटकनाशकांची तर गरजच नाही. इमानेइतबारे, ध्यानधारणेद्वारे हा मंत्र तेवढा जपायचा. तोदेखील बी रुजेपर्यंत. की झाले. पीक कसे भराभर वाढणार. साक्षात बाबाजींनीच प्रयोगाद्वारे या मंत्राचा चमत्कार अनुभवलेला आहे. येथे बुद्धिवान म्हणवून घेणाऱ्या काहींना प्रश्न पडू शकतो की होते काय या मंत्राने. तर बाबाजी सांगतात की या मंत्राच्या उच्चाराने विश्वाच्या पसाऱ्यात, आसमंतात दडलेली सकारात्मक ऊर्जा पिकाकडे वळते. जसे की शंकराने तिसरा नेत्र उघडल्यावर ज्याप्रमाणे दुष्टशक्तींचा विनाश होऊन सुष्ट शक्तींना ऊर्जा प्राप्त होते तद्वत या मंत्राच्या उच्चाराने अशा लहरी पृथ्वीच्या गाभ्यातून तयार होतात की त्यामुळे समोरच्या रोपाच्या वाढीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होते. मग काय? पीक हां हां म्हणता –  किंवा न म्हणताही –   भराभर मोठे होते. मंत्रपठण दररोज करायचे. म्हणजे दररोजच अनुकूल स्थिती. या बाबाजींनी या सगळ्याचा स्वत: प्रत्यय घेतला आहे. यातील तृतीय नेत्र सिद्धांतांवर त्यांचा दृढ विश्वास. विज्ञानाच्या पलीकडचे विज्ञान म्हणजे हा तृतीय नेत्र असे ते म्हणतात. त्यामुळे या विज्ञानाच्या अलीकडे असणाऱ्यांनी तो तपासून पाहण्याचा प्रश्नच नाही. तेव्हा या बाबाजींनी स्वत: सिद्ध केलेली ही पीकपद्धती अनेक ठिकाणी स्वत: तपासून पाहिली. त्याचे निष्कर्ष मोठे उत्साहवर्धक आले. ओम मंत्रसिद्ध पिके ही चांगली धष्टपुष्ट निपजली तर  आणि या मंत्राने पावन न झालेली पिके मात्र रोडावलेली असे दिसून आले. ओमसिद्ध पिकांतील दाणा चांगला भरलेला आढळला आणि त्यांची वाढही विनासायास झाली. तेव्हा या यशाने उत्साहित होऊन बाबाजींनी हे विज्ञान अखिल भारतीय कृषक समाजाच्या भल्यासाठी सर्वसामान्यांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला.

हे बाबाजी स्वत:चा एक पंथ चालवितात. त्यातील पंथीयांना शिवयोगी संबोधले जाते. गोव्यासारख्या राज्याचे भाग्य असे की श्रीमती उषा सरदेसाई यांच्या रूपाने त्या राज्यास एक शिवयोगी मिळाला आणि त्याहूनही, म्हणजे एकावर एक मोफत असावे त्याप्रमाणे, भाग्याची गोष्ट म्हणजे त्यांचे पतीराज हे गोव्याचे कृषिमंत्री बनले. फुलासंगे मातीस वास लागे या उक्तीप्रमाणे श्रीमती उषा यांच्या सहवासामुळे विजय हेदेखील शिवयोगाच्या प्रभावाखाली आले. आणि काय चमत्कार. त्यांचे डोळेच दिपले. घरच्या घरी उभयतांनी या मंत्रोच्चाराचे पठण सुरू केल्याने घरातील शोभिवंत कुंडय़ांतील कॅक्टसे आदी रोपे इतकी वाढली की त्यांना कुंडय़ाच काय, पण घरचे अंगणही पुरेना. हे पाहून विजय सरदेसाई यांच्यातील कर्तव्यदक्ष कृषिमंत्री जागा झाला. असाच प्रयोग आपल्या राज्यातील शेतकऱ्यांनी केल्यास आपल्या राज्याचा किती कायापालट होऊ शकतो हे त्यांच्या चाणाक्ष मनाने हेरले. या मंत्रोच्चारानेच शेती वाढणार असल्याने पाण्याची बचत होईल आणि ते पाणी अन्य काही पेयनिर्मितीसाठी वापरून त्या पेयाद्वारे बिगर शेतकऱ्यांच्या मनात आनंद पिकवता येईल असा दुहेरी फायदा त्यांच्या द्रष्टय़ा दृष्टीस दिसला. लगोलग गोव्याचे कृषीखाते कामास लागले. अधिकारीगण बाबाजींच्या सत्संगाची अनुभूती जातीने घेता झाला. मंत्रीभाय्रेलाच या मंत्राचा साक्षात्कार झाल्याने आपण पामर या प्रयोगाची सत्यासत्यता तपासणारे कोण, असा धूर्त विचार करून अधिकाऱ्यांनी माना डोलावल्या आणि गोव्यातील शेतकऱ्यांच्या मोबाइलवर, संगणकात या प्रयोगाच्या ध्वनिचित्रफिती आदळू लागल्या. सरकारी कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना या मंत्राची दीक्षा देण्यास सुरुवात केली. आणि बघता बघता रा. रा. सरदेसाई यांनी तसा प्रयोग सुरू केलादेखील. शिवयोगी झाला तरी त्यास मतदारसंघ वगरे चुकत नाही. म्हणून आपल्याच मतदारसंघात सरदेसाई यांनी काही शेतांत ही शिवयोग साधना सुरू केली असून लवकरच सरकारतर्फे या ठिकाणी कृषी पर्यटन केंद्र विकसित केले जाणार आहे. हे अद्भुत ज्ञान देशापरदेशांतील शेतकऱ्यांना मिळावे आणि हा देश सुजलाम आहे की नाही याची पर्वा न करता सुफलाम कसा करता येईल या उदात्त हेतूने हा उपक्रम हाती घेतला जाईल. राजस्थान आदी दुष्काळी भागांतील शेतकऱ्यांना यासाठी विशेष सवलती दिल्या जाणार आहेत. तूर्त या मंत्रामुळे पिकाच्या आसपासचे तणदेखील वाढते किंवा काय याचा शोध घेतला जात असून तिसरे नेत्र उघडल्यास तण नष्ट होते काय, हेदेखील तपासून पाहिले जात आहे.

दुर्दैव इतके की या दिव्य पीकवृद्धी मार्गाचा साक्षात्कार आपल्या तितक्याच दिव्य सहकाऱ्यास होत असताना तिकडे दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतमालाची आधारभूत किंमत वाढवण्याचा निर्णय घेऊन टाकला. आता हा निर्णय मोदी यांना बहुधा मागेच घ्यावा लागणार. खरे तर सरदेसाई यांचे चुकलेच. त्यांनी आधी ७-लोक कल्याण मार्ग या पत्त्यावरील योगप्रेमी रहिवाशांस याचे प्रात्यक्षिक दिले असते तर देशाचा हा खर्च टळला असता. या पत्त्यावर पंतप्रधान राहतात. त्यांनी अलौकिक योग प्रात्यक्षिकांद्वारे जसे आपले प्रबोधन केले तसेच शेतकऱ्यांसाठीही त्यांनी कसले तरीआव्हान दिले असते. तथापि फार उशीर झालेला नाही. त्यांनी केंद्रासमोर ही संकल्पना मांडावी. केंद्राचे मंत्रातंत्रावरील प्रेम लक्षात घेता तिचे निश्चित स्वागत होईल. न जाणो शेतकऱ्यांसाठी ‘शिवारातील शिवयोग’ अशी काही चटकदार योजना जाहीर होईलही. भलेच होईल त्यामुळे देशाचे. खेरीज आणखी एक बाबा देशास मिळेल, हा फायदा आहेच.