एकाच वेळी १०४ उपग्रह अवकाशात सोडून इस्रोने मिळवलेले यश सगळीकडेच निराशेचे मळभ दाखवणाऱ्या आजच्या वातावरणात झळाळून उठणारे आहे..

संसदेच्या समितीने इस्रोला वार्षिक तरतूद ५० टक्के वाढवून द्यावी अशी शिफारस केली. परंतु अर्थसंकल्पात त्याच्या निम्मीही वाढ झाली नाही . सरकारकडे पुतळे आदींसाठी खर्च करावयास मुबलक पैसा आहे. विज्ञानासाठी तो नाही. आजची जागतिक अवकाश बाजारपेठ ज्या वेगाने वाढते आहे ते बघता अशी तरतूद मान्य केल्यास इस्रो त्याचे सोने करील यात शंका नाही.

एकाच वेळी १०४ उपग्रह अवकाशात सोडण्याची कामगिरी साध्य केल्याबद्दल इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, इस्रो या संघटनेचे मन:पूर्वक अभिनंदन. हा विक्रमासाठी केलेला विक्रम नाही. तर एका आवश्यक गरजेतून साध्य केलेली ही क्षमता आहे. ही गरज आहे निधी संकलनाची. इतके उपग्रह एकाच यानातून अवकाशात सोडणे आपल्याला शक्य झाल्यामुळे हे काम आपणास आता व्यवसाय म्हणून करता येईल आणि त्यातून निधी मिळू शकेल. अशा पद्धतीने इतरांचे उपग्रह सोडताना आपण आपला उपग्रह सोडण्याचा खर्चही निम्म्याने कमी केला आहे. त्याचमुळे सामान्यांच्या दृष्टीने हा विक्रम आहे हे खरे असले तरी इस्रोसाठी हा विक्रम म्हणण्यापेक्षा उपग्रह सोडण्याच्या क्षमतेचे वर्धन आहे असे अध्यक्ष किरणकुमार यांचे प्रतिपादन हे वास्तववादी ठरते. यात जोखीम जरूर होती. काही मोठे तर काही छोटे असे १०४ उपग्रह एकाच वेळी अवकाशात सोडताना त्यांच्यात अंतर राखणे फार महत्त्वाचे होते. ते जमले नसते तर अवकाश उद्योगात भारताची विश्वासार्हता होत्याची नव्हती झाली असती व भारत अनेक वर्षे मागे गेला असता. तसे होणे आपल्याला परवडणारे नाही. कारण एकाच वेळी मंगळयान आदी मोहिमा काढणारे आपण दुसरीकडे अजूनही मंगळाची शांत, गोमूत्रयुक्त पंचगव्य आदी भाकड कल्पना तितक्याच कवटाळत असून अशा अर्धविज्ञानवादी वातावरणात विज्ञानाची हार होणे दुर्दैवी ठरले असते.

इस्रोने यापूर्वी जून २०१५ मध्ये एकाच वेळी २३ उपग्रह सोडले होते. त्यामुळे यात पुढचा टप्पा गाठला जाणार हे उघडच होते. तो गाठण्यात इस्रोने मिळवलेले हे यश आजच्या सगळीकडेच निराशेचे मळभ दाखवणाऱ्या वातावरणात झळाळून उठणारे आहे यात शंका नाही. यातून उठून दिसते ती आपल्याकडील संस्थात्मक उभारणीच्या कामाची महती. इस्रो, आयआयटी, आयआयएम्स अशा या स्वातंत्र्योत्तर कालावधीत जन्माला आलेल्या संस्थाच आजही आपणास इतर देशांपेक्षा आघाडीवर ठेवत असून त्यानंतर मात्र अशा संस्थांची निर्मिती आपल्याकडे थांबल्यात जमा आहे. या पापाचा सर्वात मोठा वाटा इंदिरा गांधी यांच्याकडे जातो. पण इतरांनीही काही वेगळे केले असे नाही. आणि अलीकडे तर व्यवस्थेपेक्षा व्यक्तीलाच महत्त्व देण्याची प्रथा पडल्याने संस्थात्मक उभारणी आपण जणू विसरूनच गेलो आहोत. सतीश धवन व विक्रम साराभाई यांनी भारताच्या अवकाश कार्यक्रमाची जी स्वप्ने पाहिली ती अशी वेगाने पूर्ण होत असताना अशा घटनांनी साफल्याचे समाधान निश्चितच वैज्ञानिक व देशवासीयांना मिळत असते. या प्रक्षेपणातील एक योगायोग महत्त्वाचा आहे. ज्या अमेरिकेने आपल्याला १९९८ मधील दुसऱ्या अणुस्फोटानंतर तंत्रज्ञान नाकारले होते त्याच अमेरिकेचे ९७ उपग्रह आपण या उड्डाणात अवकाशात सोडले. एरवी मध्यपूर्वेत एकमेकांच्या जिवावर उठलेल्या इस्रायल व संयुक्त अरब अमिरातीचे उपग्रहही यातून बरोबरच अवकाशस्थ झाले. इस्रोने सातत्याने क्षमता सुधारण्याचे ध्येय जोपासलेले आहे. उड्डाण अपयशी ठरले अथवा यशस्वी झाले तरीही त्याचे विश्लेषण तेथे केले जाते. त्यामुळे कुठल्याही यशाने भारावून असे काही तेथे घडत नसते. अन्यथा इस्रोची एवढी प्रगती कधीच झाली नसती. इस्रोसमोर आता आव्हान आहे ते विक्रमांच्या पलीकडचे. रशियाने २०१४ मध्ये एकाच वेळी ३७ उपग्रह अवकाशात सोडले होते. त्याआधी अमेरिकेच्या नासाने २०१३ मध्ये एकाच वेळी २९ उपग्रह सोडले होते. हे दोन्ही देश अवकाश क्षेत्रात महाशक्ती आहेत. त्यामुळे भारतासारख्या विकसनशील देशाने ही कामगिरी करणे याला वेगळे महत्त्व आहे. याआधी अमेरिकावगळता अनेक देशांच्या मंगळ मोहिमा अपयशी ठरत असताना आपण ती यशस्वी केली होती. तो चीनला मोठा धक्का होता. तरी अन्य अनेक बाबतीत चीन आपल्या पुढे आहे ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. चीनची मजल स्वत:चे अवकाशस्थानक बांधण्यापर्यंत गेली आहे. मंगळानंतर इस्रोचे लक्ष्य आता शुक्रावर आहे व त्यासाठी मोहीम आखली जात आहे.

अलीकडे हे उपग्रह मोठय़ा प्रमाणात सोडण्याचे प्रमाण वाढण्यामागे दळणवळणाचा वाढता वेग हे महत्त्वाचे आर्थिक कारण. मोबाइल, इंटरनेट यांचा प्रसार एवढा झाला आहे की, कंपन्यांना चांगली सेवा देण्यासाठी छोटे पण जास्त उपग्रह सोडण्याची गरज भासते. आताच्या उड्डाणात एकटय़ा अमेरिकेतील सानफ्रान्स्किोच्या प्लॅनेट इन्कार्पोरेशनचे किमान ९० उपग्रह आहेत. हे असे इतरांचे उपग्रह सोडण्याचे काम करून इस्रोने सुमारे १० कोटी डॉलरची कमाई केली आहे. उपग्रह सोडण्याची बाजारपेठ पुढील तीन वर्षांत तीनशे कोटी डॉलरची उलाढाल नोंदवेल. सॅटेलाइट इंडस्ट्री असोसिएशन या संस्थेच्या २०१५ मधील अहवालानुसार उपग्रहबांधणी व तत्संबंधी सेवा क्षेत्राची वाढ २०१४-१५ मध्ये १६६० कोटी डॉलर होती ती आता १२,७०० कोटी डॉलर झाली आहे. म्हणजे अवकाश क्षेत्रातील या उपक्रमातून आपल्याला आर्थिक प्रगतीचीही संधी आहे. तीच लक्षात घेऊन संसदेच्या विज्ञान तंत्रज्ञानविषयक स्थायी समितीने इस्रोला वार्षिक तरतूद ५० टक्के वाढवून द्यावी अशी शिफारस केली. परंतु अर्थसंकल्पात इस्रोसाठी त्याच्या निम्मीही वाढ नाही हे वास्तव आहे. सरकारकडे पुतळे आदींसाठी खर्च करावयास मुबलक पैसा आहे. विज्ञानासाठी तो नाही. आजची जागतिक अवकाश बाजारपेठ ज्या वेगाने वाढते आहे ते बघता अशी तरतूद मान्य केल्यास इस्रो त्याचे सोने करील यात शंका नाही. व्हर्जिन गॅलक्टिक, स्पेस एक्स यासारख्या खासगी अवकाश कंपन्यांशी स्पर्धा करण्याची ताकद इस्रोत आहे. फक्त त्यासाठी आणखी पाठबळ हवे. इस्रो त्यांच्या प्रक्षेपणासाठी उपयुक्त सुटे भाग इतर कंपन्यांकडून तयार करून घेत असते. त्यामुळे रोजगार उपलब्धता व बुद्धिमत्तेला संधी अशा दोन्ही गोष्टी त्यात साध्य होत आहेत. अशा वेळी उपग्रह कशासाठी सोडायचे, त्याचा आपल्या जीवनाशी काय संबंध असा अजागळ प्रश्न नेहमी केला जातो. हे आपल्याला जमले नसते तर उच्च तंत्रज्ञानासाठी आपल्याला आजही इतर देशांच्या मेहेरबानीवर अवलंबून राहावे लागले असते. उपग्रहातून हवामानाची तर माहिती मिळतेच. पण आजच्या मोहिमेत जो काटरेसॅट २ ए उपग्रह सोडला आहे, त्याच्या मदतीने शहरे, खेडी, सागरी किनारे, शेतजमीन यांच्या वापरावर लक्ष ठेवता येणार आहे, भूखंडाच्या भ्रष्टाचारावर लक्ष ठेवतानाच शहर नियोजनासाठी मदत करणारा हा आधुनिक नेत्र आहे. एवढेच काय देशातील रस्ते व जलस्रोत यांचे नियोजन त्यामुळे करता येणार आहे. आजच्या काळात उपग्रहाच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीच्या आधारे पाणी कुठे लागेल हेदेखील निश्चित सांगता येते. शत्रूच्या हालचालीही टिपता येतात. त्याच्या जोडीला परकीय चलन मिळून आर्थिक स्वयंपूर्णताही येते.

परंतु खंत ही की अवकाश क्षेत्रातील असे यश साजरे करण्यापुरते आपण इस्रो आदी संस्थांचे स्मरण करतो. एरवी विज्ञानप्रसार आणि विज्ञानवाद आपल्या खिजगणतीतही नाही. त्यातल्या त्यात इस्रो तरी भाग्यवान. तिचे कधी तरी का असेना, कौतुक होते. पण तेवढे कौतुक इतर क्षेत्रातील संशोधनाच्या वाटय़ास येत नाही. खेळांमध्ये क्रिकेटला जे वलय लाभले ते विज्ञान क्षेत्रात इस्रोला लाभले आहे. ते एक वेळ ठीक. पण विज्ञानातील इतर संशोधन क्षेत्रांनाही असेच उत्तेजन दिले तर त्यातून गुरुत्वीय लहरी क्षेत्रात काम करणाऱ्या पुण्याच्या ‘आयुका’प्रमाणे इतर भारतीय संस्थाही तसे चांगले काम मूलभूत संशोधन क्षेत्रात करू शकतील. इस्रोच्या उपग्रह यशाचे उपाख्यान म्हणून महत्त्वाचे आहे.