पुलवामा हल्ल्यामागील आंतरराष्ट्रीय परिमाण आणि या हल्ल्याआधीचे स्थानिक वास्तव पाहिल्यास काय दिसते?

अमेरिकेने अफगाणिस्तानात तालिबान्यांशी बोलणी सुरू करण्याचा निर्णय घेणे आणि त्याच तालिबानच्या आधारे फोफावलेल्या जैश ए महंमद संघटनेने काश्मिरात उत्पात घडवून आणणे यांत थेट संबंध आहे. काश्मिरातील ताज्या दहशतवादी हल्ल्याच्या इशाऱ्याची ध्वनिचित्रफीत अफगाणिस्तानात प्रसृत होणे यातून तोच दिसून येतो. तालिबानच्या मुद्दय़ावर अमेरिकेच्या धोरणात बदल होऊन २४ तासही उलटायच्या आत हा दहशतवादी हल्ला झाला ही बाबदेखील हे समीकरण समजून घेण्यासाठी महत्त्वाची. जैश ए महंमद या विषवेलीस तालिबानचा आधार असून या संघटनेचा प्रमुख मसूद अझर याला पाकिस्तानचे पूर्ण संरक्षण आहे. आणि या मुद्दय़ावर पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवर चीनचा उघड पाठिंबा आहे. त्यामुळे या मसूद अझर यास दहशतवादी म्हणून जाहीर करावे यासाठीचे आपले सगळे प्रयत्न अयशस्वी ठरतात. संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात या संदर्भातील आपल्या ठरावात सातत्याने चीनकडून खोडा घातला गेला. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात वुहान येथे उभय देशप्रमुखांत झालेल्या चच्रेनंतर दहशतवादासंदर्भात चीनच्या दृष्टिकोनात बदल झाल्याचे सांगितले गेले. ते खरे असेलही. पण मसूद अझरसंदर्भात चीनच्या धोरणात तसूभरही बदल झालेला नाही. काश्मिरातील ताज्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करणाऱ्यांत आंतरराष्ट्रीय पातळीवर चीन सर्वात शेवटी होता, ही बाबदेखील याच सत्याची जाणीव करून देते.

हे चिनी अभय आणि तालिबानच्या मुद्दय़ावर अमेरिकेचे बदललेले धोरण यामुळे जैश ए महंमद पुन्हा सक्रिय झाली असून त्याचमुळे असा भयानक, निंदनीय आणि घृणास्पद हल्ला ती करू शकली. या हल्ल्याचा निषेध करावा तेवढा थोडाच. गेल्या जवळपास दोन दशकांत जैशच्या कारवाया चढत्या क्रमाने हिंसक होत आल्या आहेत. २००१ साली संसदेवरील हल्ल्यापासून ही संघटना चच्रेत आली. पठाणकोट आणि उरी येथील लष्करी तळांवर दोन वर्षांपूर्वी झालेल्या हल्ल्यांमागेही याच संघटनेचा हात होता. या संघटनेने पाकिस्तानातही असेच उद्योग केले आहेत. त्या देशाचे माजी अध्यक्ष लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांच्यावरही हल्ल्याचा या संघटनेने दोन वेळा प्रयत्न केला. या संघटनेचा प्रमुख मसूद अझर म्हणजे १९९९ साली कंदाहार विमान अपहरण प्रकरणात प्रवाशांच्या सुटकेसाठी आपणास ज्यास सोडून द्यावे लागले होते तो. त्यानंतर त्याचे आपल्याविरोधातील उद्योग वाढतच गेले. पाकिस्तानात नुकतेच सत्तेवर आलेल्या इम्रान खान सरकारमुळे त्यास पुन्हा एकदा मोकाट सुटण्याची संधी मिळाली असून त्यामुळे पाकिस्तानविरोधात आपण दबाव वाढवण्याचे प्रयत्न सुरू केले ते योग्यच. पण त्याच वेळी ते अमेरिका आणि चीन यांच्याही आघाडीवर असायला हवेत. अमेरिका अफगाणिस्तानात तालिबान्यांशी चर्चा करणार आणि आपण काश्मिरात मौन पाळणार हे अयोग्य. हे या प्रश्नाचे आंतरराष्ट्रीय परिमाण. पण स्थानिक पातळीवरील वास्तव काय?

असे विचारायचे कारण केंद्रीय राखीव सुरक्षा दलाची झालेली दयनीय अवस्था. ताज्या दहशतवादी हल्ल्यात मारले गेलेले सनिक हे लष्कराचे नाहीत. ते निमलष्करी म्हणून गणल्या जाणाऱ्या केंद्रीय दलांचे आहेत. ही निमलष्करी दले गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत येतात तर लष्करावर नियंत्रण संरक्षणमंत्र्यांचे असते. जनसामान्य गणवेशातील अशा सर्वानाच जवान, सनिक आदींनी संबोधित असले.. आणि ते काही प्रमाणात खरेही असले.. तरी दोहोंतील फरक महत्त्वाचा आहे. लष्कराच्या तुलनेत या निमलष्करी दलांस नेहमीच सापत्न वागणूक मिळते आणि सत्तेवर कोणीही आले तरी त्यांत बदल होत नाही. आपले लष्कर हे या दलांच्या तुलनेत अधिक शस्त्रसज्ज, अधिक प्रशिक्षित आहे आणि त्यांच्याकडील साधनसामग्रीही विपुल आहे. निमलष्करी दले दुर्दैवाने या सर्वापासून वंचित आहेत. याआधी छत्तीसगड आदी प्रांतातील नक्षलवादी हल्ले आणि जम्मू-काश्मिरातील हल्ले यातून तेच अधोरेखित होते. खरे तर या निमलष्करी दलांनी जम्मू-काश्मीरपेक्षा छत्तीसगडच्या नक्षली परिसरात अधिक सनिक गमावले आहेत. त्यामागील कारणदेखील उच्च दर्जाच्या साधनसामग्रीचा अभाव हेच आहे. या साधनसाम्रगीच्या कमतरतेमुळे या दलास तब्बल अडीच हजार जवानांना जम्मूहून श्रीनगरास जाण्यासाठी रस्त्याचा मार्ग निवडावा लागला. त्यात ७८ बसगाडय़ांचा ताफा एकापाठोपाठ एक असा नेण्याची धोरणात्मक चूक या दलांकडून घडली. पण तीमागे या सनिकांना हवाई मार्गाने नेण्याचा पर्याय निमलष्करी दलांस उपलब्ध नसणे हेदेखील एक कारण आहे, हे विसरता येणार नाही. आपल्या लष्कराकडे स्वत:चे हवाई सामथ्र्य (हवाई दलाखेरीज. ते वेगळे) आहे. तसे ते या दलांकडे नाही. तसेच लष्कराप्रमाणे निमलष्करी दलांस स्वतची हेरगिरी यंत्रणा नसते आणि जेथे कारवाई करावयाची आहे तेथे त्यांचे काही स्थानिक जाळेही नसते. लष्कराच्या अनेक यशस्वी मोहिमांमध्ये त्या दलांच्या हेरगिरी यंत्रणेचा मोठा वाटा आहे. मिलिटरी इंटलिजन्स ही तगडी व्यवस्था लष्कराच्या दिमतीस आहे. केंद्रीय राखीव सुरक्षा दलांस तसे काही नाही. त्यामुळे या दलांतील सनिकांवर अशा हल्ल्यांत वारंवार आणि हकनाक बळी जाण्याची वेळ येते.

या ताज्या प्रकरणात तर स्थानिक यंत्रणांचीही विफलता दिसून आली. जम्मू-काश्मिरात राज्यपाल राजवट आहे. राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी या साऱ्यात हेरगिरीतील अपयश मान्य केले. तथापि या अपयशामागील कारण आहे स्थानिक पातळीवर करण्यात आलेल्या केंद्रीय नियुक्त्या. त्यामुळे पोलीस आदी यंत्रणांतून स्थानिक पोलीस अधिकारी मागे फेकले गेले. या स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांचे गावपातळीवर खबऱ्यांचे जाळे होते. ते विस्कटले गेले. त्यामुळे खालून वर जाणाऱ्या माहितीत खंड पडला. तसेच स्थानिक पातळीवरील सरकारी संवादाची व्यवस्थाही विस्कळीत झाली. त्यामुळे तेथे प्रशासनाची नागरिकांशी असलेली नाळ तुटली. ती पुन्हा जोडली जावी यासाठी सध्या प्रयत्नदेखील सुरू नाहीत.

या मानवी वा भौतिक साधनसामग्रीपलीकडे या प्रश्नाच्या मुळाशी आणखी एक मुद्दा आहे. या राज्यातील कोवळ्या, अशिक्षित वा अल्पशिक्षित तसेच अलीकडे सुशिक्षितही, तरुणांना आपले आयुष्य हे असे मरणाच्या दारात फेकावे असे का वाटते, हा तो मुद्दा. या तरुणांच्या मनातील खदखद,

प्रगतीची संधीच नसल्याने येणारे रिकामपण यावर आपल्याकडे काय तोडगा आहे? तो शोधण्यासाठी आपण काही प्रयत्न करीत आहोत का? रिकामे मन आणि बिनकामाचे हात हे दैत्यासाठीचे सुपीक प्रदेश असतात. अशी सुपीक बेटेच्या बेटे काश्मिरात भकास नजरेने हिंडताना आढळतात. जन्नतच्या आशेने ते सहज पाकिस्तानच्या हाती लागतात आणि बघता बघता या सर्वसामान्य तरुणांचे दहशतवाद्यांत रूपांतर होते. तसे ते झाल्यावर लष्करी आयुधांनी त्यांना दूर करणे हा एकमेव पर्याय राहतो. त्यास इलाज नाही. पण हे दहशतवादीकरण होऊच नये यासाठी आपण काय करतो हा खरा प्रश्न आहे. आणि तेथेच या प्रश्नाचे प्रामाणिक आणि कायमस्वरूपी उत्तर दडलेले आहे.

एका बाजूने आपल्याच देशातले हे तरुण दहशतवादी होतात आणि दुसऱ्या बाजूला त्यांचा नायनाट करण्याच्या प्रयत्नात होणाऱ्या हिंसाचारात पुन्हा आपल्याच देशातले तरुण प्राण गमावतात. नुकसान आपलेच. यात कोणाचे काय चुकले वा चुकते याच्या हिशेबाची ही वेळ नव्हे. तथापि या दुहेरी दुर्दैवाची जाणीव करून देण्यासाठी मात्र हीच वेळ आहे. ती साधून पाकिस्तानबरोबरच या शोकांतिकेच्या खऱ्या सूत्रधारापर्यंत पोहोचण्याचा आपला प्रयत्न हवा. महासत्तांतील साठमारी हे जागतिक दहशतवादाचे मूळ आहे. जैश ए महंमद, पाकिस्तान वगरे केवळ फांद्या.