बा मोरू, आज दसरा.. साडेतीन मुहूर्तापैकीएक. सीमोल्लंघनाचा दिवस.. प्रगतिपथावर देशाची इतकी घोडदौड सुरू आहे, जीडीपी नवनवे आकडे मोडत आहे, जगाच्या बाजारात आपली मान इतकी ताठ झाली आहे, परदेशात किती कौतुक आहे भारताचे.. वत्सा, आजच्या शुभदिनी तरी यात आनंद मान.. नेमेचि येणाऱ्या पावसाळ्यानंतर श्रावण, भाद्रपद गेले. शौर्यपदके देणाऱ्या दहीहंडय़ा गेल्या आणि वाहतूक कोंडी करणारे गणेशोत्सवही पार पडले, गरबा संपला आणि आश्विन शुद्ध दशमी उजाडली. नेमेच्याच रिवाजानुसार मोरूचा बाप मोरूस म्हणता झाला, मोरू ऊठ. आज विजयादशमी. सीमोल्लंघनाचा दिवस. शारदापूजेचा दिवस. ते ऐकून मोरूने तोंड फिरविले आणि कूस बदलून पुन्हा झोपी गेला. कसे होणार या मोरूचे? तीर्थरूपांस चिंता लागून राहिली. या मोरूस ना शारीरिक कष्टाची आवड ना बौद्धिक. हा ना लवकर निजे ना लवकर उठे. मोरूच्या बापाने मनसे सांगून पाहिले. पुत्रा, आता राज ठाकरेदेखील लवकर उठतात. तेव्हा त्यांच्याकडे पाहून तरी आपली सवय बदल. मोरूने त्याकडेही दुर्लक्ष केले. मोरूचे तीर्थरूप दिवस उजाडल्यानंतरही अस्ताव्यस्त पसरलेल्या आपल्या पोटच्या गोळ्याकडे पाहात मनात म्हणाले : यास अभ्यासाची आवड नाही ना कष्टाची. हा ना बुद्धिजीवी होऊ शकतो ना राजकारणी. बरे बिल्डर होईल म्हणून त्याकडे पाहावे तर तो फारच भोळसट. इतका सरळमार्गी असेल तर घरबांधणी व्यवसायात तरी कसा जाणार? मोरूच्या वडिलांस राहवले नाही. आज विजयादशमीस तरी याने लवकर उठोन, आन्हिके आटोपून काही कामधाम करावे इतकीच त्यांची इच्छा. ती पुन्हा उफाळून आल्याने ते मोरूस म्हणाले : बा मोरू, आज दसरा. साडेतीन मुहूर्तापैकीएक. सीमोल्लंघनाचा दिवस.. ते पुन्हा ऐकताच मोरू म्हणाला, मी सीमोल्लंघन टाळतो. तीर्थरूप पुसते झाले, ते का बरे? त्यावर, टोल द्यावा लागतो, असे मोरूचे उत्तर. आपल्या गावाच्या सीमांवरील पायवाटेचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर झाल्याने त्या खर्चाच्या वसुलीसाठी टोल सुरू झाल्याचे वडिलांना माहीतही नसावे, याचे मोरूस अतीव दु:ख झाले. त्याकडे दुर्लक्ष करून तीर्थरूप म्हणाले, अरे रस्तेबांधणी ही सरकारची जबाबदारी. खासगी टोल कंपन्यांची धन सरकार का बरे करेल? मोरू वदला, अहो तीर्थरूप.. सरकारची जबाबदारी फक्त कर्मचाऱ्यांना वेतन देण्याची आणि निवृत्त झाल्यावर वर्षांनुवर्षेत्यांना पोसण्याची. या शेवटच्या वाक्याने मोरूच्या तीर्थरूपांच्या मनास वेदना झाल्या. निवृत्त होऊन दोन दशके लोटली तरी आपण निवृत्तिवेतन खातो याचा आपल्या चिरंजीवास इतका राग का असावा, हे काही त्यांना उमगले नाही. आपल्या पोटचा गोळाच तो, काहीबाही बोलला म्हणून आपण राग कशाला करून घ्या, असा विचार करून ते पुन्हा म्हणाले, अरे चिरंजीवा, टोल द्यावा लागतो म्हणून काही कोणी सीमोल्लंघन करण्याचे, शिलंगणाचे सोने लुटण्याचे टाळतो काय? काय म्हणावे तुझ्या या विचारास? आपले पिताश्री कावलेले पाहून मोरूच्या विवेकाचा बांधच फुटला. अहो, माझ्या एकाच्या सीमोल्लंघनाने काय होणार? आपणास किती सीमा ओलांडायच्या आहेत हे ठावकी आहे काय? आज शबरीमला मंदिरात प्रवेश मिळण्यापासून महिलांना रोखण्याचा प्रयत्न झाला. कोणता देव सांगतो, महिलांना प्रवेश नाही? इतकी वर्षेत्यासाठी झगडल्यानंतर आपल्या सरकारने नाही तरी सर्वोच्च न्यायालयाने योग्य दिशेने सीमोल्लंघन केले आणि महिलांना प्रवेशाचा हक्क दिला. पण म्हणून ओलांडता आली का मंदिरप्रवेशाची वेस स्त्रियांना? या देवळात प्रवेश करू पाहणाऱ्या महिलांना महिला आणि पुरुष दोघेही अडवताना दिसतात. नवरात्रात दुर्गा, सरस्वती अशा देवतांना हेच पुजणार आणि रस्त्यावर त्यांच्यावरच हात टाकणार! झाले आहे यांचे सीमोल्लंघन? पुरुष त्या महिलांना माता म्हणणार.. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते.. असे श्लोक म्हणणार. पण त्यांच्या देहातच त्यांना रस. मी टू मोहिमेत बायकांनी याचा निषेध करायचा प्रयत्न केला तर त्यांच्या वेदनांकडे दुर्लक्ष करून त्यांना आपलीच मन की बात ऐकवणार? एक नव्हे, दोन नव्हे, तीन नव्हे, पाच नव्हे, दहा नव्हे तर तब्बल २० महिला एका पुरुष मंत्र्याविषयी तक्रार करतात पण धर्माभिमानींचे सरकार आठवडाभर त्याकडे पाहण्यास तयार नाही. उलट ९७ वकिलांची फौज या महिलांच्या अंगावर सोडणार. अखेर मंत्री स्वत:हून वगैरे हटले. पण आले करता सीमोल्लंघन या महिलांना? आपल्या देशातील ५० टक्क्यांहून अधिक महिलांना वाटते पतीने हात उगारला तर त्यात काहीही गैर नाही. ४२ टक्के पुरुष म्हणतात पत्नीवर हात टाकणे योग्यच. किमान सभ्यतेच्या क्षेत्रात प्रवेश करता आला आहे काय या पुरुषांना? तेव्हा त्यांचे सीमोल्लंघन कधी होणार? हे झाले दारचे. घरातली परिस्थिती काय? आपण काय खावे, प्यावे हे ठरवण्याचा हक्क आहे का आपणास? तुमच्या मित्रास सवत्स धेनु पाळावयाची इच्छा झाली. जमले का त्यास गायवासरू घरी आणणे? बुद्धिजीवी क्षेत्रातून गोपालनाच्या व्यवसायात त्यास सीमोल्लंघन करावयाचे होते. जमले का ते? आपल्या चिरंजीवाचा हा वाक्प्रपात पाहून हा झोपलेला होता तोच बरा, असे वाटले मोरूच्या वडिलांना. त्याच्यापासून सुटका व्हावी म्हणून त्यास तेथेच सोडून ते गेले चित्रवाणी संच लावावयास. तेवढीच दोन घटका करमणूक. तर पडद्यावर सुरू होती एक मालिका. झगझगीत घरांची आणि चकचकीत स्त्रीपुरुषांची. त्यांकडे पाहात मोरू विचारता झाला.. आता या मालिका. काय बदलले आहे त्यांत? पूर्वी त्या सासूसुनांवर असत. त्या आता तरुण होऊन सुना आणि सासवांवर असतात इतकेच काय ते नवे. म्हणावे काय त्यास मनोरंजनाचे सीमोल्लंघन? आता मोरूच्या तीर्थरूपांस राहवेना. कळवळून ते विचारते झाले, भो पुत्रा.. तुजला काहीच कसे चांगले दिसत नाही आसमंतात? प्रगतिपथावर देशाची इतकी घोडदौड सुरू आहे, जीडीपी नवनवे आकडे मोडत आहे, जगाच्या बाजारात आपली मान इतकी ताठ झाली आहे, परदेशात किती कौतुक आहे भारताचे.. वत्सा, आजच्या शुभदिनी तरी यात आनंद मान.. तीर्थरूप, तुम्हास सरकारी पेन्शन मिळते. त्यामुळे आशावादी राहणे तुम्हास परवडते. आमचे काय? नोकऱ्याच नाहीत आम्हास. पदव्यांचे काय आमच्या? अभियांत्रिकी शिकून ज्यांना चपराशाचे काम करावे लागते, त्या आमचे दु:ख तुम्हास कसे कळणार? व्यवसाय करा म्हणतात सगळे. ‘नोकऱ्या मागू नका, नोकऱ्या देणारे व्हा’, असा सगळ्यांचा उपदेश. पण त्यासाठी भांडवल लागते. ते मागावयास बँकेकडे जावे तर तेच टिऱ्र्या बडवताना दिसतात. आमच्याच तिजोऱ्या रिकाम्या असताना तुम्हास काय द्यावे असे त्यांचे म्हणणे. जीडीपी वाढतो? वाढू द्या. तसे तर काय या देशातील अब्जाधीशांची संख्याही वाढतेच की. प्रश्न या वाढीच्या लाटेतल्यांचा नाही. त्यातल्यांची नेहमीच प्रगती होत असते. ते सारे मेड इन इंडियातील लब्धप्रतिष्ठित. प्रश्न आमच्यासारख्या मोरूंचा आहे. आम्ही मेक इन इंडियाचे कष्टकरी. जगाच्या बाजारात आपल्या कौतुकाचे काय सांगता? आपले कौतुक त्यांनी करायलाच हवे. इतकी मोठी बाजारपेठ आपली आणि इतक्या सगळ्या वस्तूंचे गिऱ्हाईक आपण. ते कशाला आपल्याला बोल लावून संभाव्य ग्राहकास दुखावतील? परदेशांतील कवतिकाची काय ती इतकी मातबरी.. मोरूच्या बापास वाटले, आपला हा पुत्र झोपलेलाच बरा. जागा झाला की प्रश्नच विचारतो. ते त्यास म्हणाले : मोरू, चूक झाली माझी. विजयादशमी म्हणून तुजला जागे करावयास गेलो आणि चुकलो. झोप तू तुला हवा तितका. जागे होऊन आम्ही तरी असे कोणते दिवे लावलेत म्हणा.. झोप तू. ती पडत्या फळाची आज्ञा मानून मोरू उत्साहात नव्याने झोपला.