गेल्या काही दिवसांत दूरचित्रवाणीवर कुलभूषण जाधव खटल्याच्या थेट प्रक्षेपणाच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय न्यायालयाची, म्हणजेच पीस पॅलेसची, देखणी वास्तू पाहताना, या ऐतिहासिक वास्तूच्या निर्मितीत जिचा महत्त्वाचा सहभाग होता, त्या बेर्था स्यूट्नेरच्या शब्दांची आठवण झाली. या न्यायालयाच्या उद्घाटन समारंभप्रसंगी ती म्हणाली होती, ‘‘शांतता चळवळ हे काहींना भाबडं स्वप्न वाटतं. पण ते तसं नाही. मानवी संस्कृतीला तगून राहण्यासाठी ते आवश्यक आहे. पीस पॅलेससारख्या वास्तू अमूर्त शांततेचं मूर्त रूप असतात, ती प्रतीकं असतात. हजारो र्वष युद्धांनीच आमच्यावर वर्चस्व प्रस्थापित केलंय. त्यामुळे आमच्याकडे स्मारकांना आणि महालांना काय तोटा! शांततेला मात्र युरोपात आता प्रथमच एक देखणी वास्तू मिळाली आहे -ती म्हणजे पीस पॅलेस!’’ ते न्यायालय व तेथील ग्रंथालय याबद्दल वाचलेलं असल्यानं, हेगला गेल्यावर मी प्रत्यक्षात ते बघायला गेले होते. बेर्था स्यूट्नेरच्या (इी१३ँं र४३३ल्ली१) स्मृतिशताब्दीनिमित्ताने त्याच वेळी तिथं व्याख्यान होतं. दुग्धशर्करा योग! तिच्या कामाबद्दल ऐकल्यावर, तिचं लेखन मिळवून वाचलं आणि तिच्या विचारदर्शनानं चकितच झाले. बॅरोनेस बेर्था वॉन स्यूट्नेर (१८४३-१९१४) ही झेक-ऑस्ट्रियन लेखिका, शांततेसाठीचा नोबेल मिळालेली पहिली स्त्री आणि युरोपातील शांतता चळवळीतील अग्रणी. तिच्या कादंबरी लेखनाने तोपर्यंतचे विक्रीचे सगळे उच्चांक मोडले, लोकांच्या मनावर अक्षरश: तिने गारूड केलं होतं असं दिसतं. त्याआधी गुलामगिरीचं उच्चाटन झालं नव्हतं त्या काळात हॅरिएट बीचर स्टो हिच्या ‘अंकल टॉम्स केबिन’ (१८५२) या कादंबरीनं असं गारूड केलं होतं. बेर्थानं कादंबरी लेखनाप्रमाणेच, वैचारिक लेखनही केलं होतं. तिच्या आठवणींचे- आत्मचरित्राचे दोन खंडही प्रकाशित झालेले आहेत. एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात, १८४३ मध्ये जन्मलेल्या बेर्था किन्स्कीच्या जन्माआधी तीन महिने, सैन्यात अधिकारी असणारे तिचे वडील मृत्यू पावले होते. ती जहागीरदारपुत्री म्हणून जन्मली. आई अत्यंत देखणी, मात्र स्वभाव उधळ्या. त्यामुळे आर्थिक परिस्थिती जेमतेम. बडे घर पोकळ वासा. त्या काळात युरोपमधील छोटय़ा छोटय़ा शेजारी राष्ट्रांमध्ये सतत कुठे ना कुठे युद्धे चालू असत. त्यामुळे पुरुषांनी सैन्यात असणे, युद्धांवर जाणे ही साऱ्यांच्या सवयीची गोष्ट होती. सैन्यातील लोकांभोवती पराक्रमाचे वलय असे, मुलींना सैन्यातील अधिकारी पती म्हणून हवा असे. पण जी माणसे तरुणपणीच युद्धात मारली जात, त्यांच्या कुटुंबांचे मात्र हाल होत असत. घरात एकूणच सैनिकी वातावरण, शिस्त, परंपरा होत्या. तिच्या स्वप्नातील राजकुमारदेखील असाच होता. ती ऑस्ट्रियात-व्हिएन्नाला राहात असे. त्यामुळे तेथील राजपुत्राशी आपलं लग्न व्हावं असं तिला वाटे. आपलं र्अध आयुष्य तिने युद्धं, सैन्य यांचा मनोमन स्वीकार केलेला होता आणि उरलेलं र्अध युद्धाला विरोध केला. लहानपणापासून बेर्था आनंदी वृत्तीची, चौकस, तल्लख होती. भाषांमध्ये तिची गती फारच चांगली होती. तिने फ्रेंच, इंग्रजी, स्पॅनिश, इटालियन, जर्मन या बोलीभाषा आत्मसात केल्या होत्या. सामाजिक परंपरांनुसार मुली शाळेत जात नसल्या तरी ज्यांचे आईवडील आपल्या मुलींना शिकवू इच्छित असत, ते शिक्षित स्त्रियांची खास शिकवणी ठेवून घरीच मुलींना तयार करीत. शिवाय संगीत, पियानोवादन या गोष्टीही मुलींना शिकवल्या जात. बेर्थानेही हे सारे शिकून घेतले. आपण ऑपेरात जाऊन गायिका म्हणून नाव मिळवावे अशीही तिची आरंभीची इच्छा होती. मात्र तिला वाचनाची अत्यंत भूक असे. विविध प्रकारची खूप पुस्तके ती वाचत असे. सामाजिक जीवनात सक्रिय भाग घेणेही तिला आवडे. असं सगळं छान छान, चाकोरीप्रमाणेच चालू असताना, तिच्या आयुष्यानं वेगळं वळण घेतलं. तिची आई व मावशी यांना जुगाराचं व्यसन लागलं, कर्ज झालं आणि आपण पैसे मिळवले पाहिजेत, अशी निकड तिला जाणवली. थोडे दिवस तिनं रंगमंचावर काम करून पाहिलं. पण ते काही तिला मानवेना. मग नोकरी मिळवण्याची धडपड सुरू झाली. मध्ये एके ठिकाणी लग्न जमलं, ते मोडलं. शेवटी वयाच्या ३०व्या वर्षी तिला व्हिएन्ना येथील स्यूट्नेर यांच्या घरी, त्यांच्या चार मुलींची सोबतीण, शिक्षिका म्हणून नोकरी मिळाली. त्यांच्या आर्थर या तिच्याहून सात वर्षांनी लहान असणाऱ्या मुलाशी तिचे प्रेमसंबंध जुळले. ते लक्षात आल्यावर तिची तिथून हकालपट्टी झाली. (हे वाचताना साउंड ऑफ म्यूझिक हा प्रसिद्ध चित्रपट आठवला ना? कितीतरी साम्य यात दिसते. तो चित्रपट ऑस्ट्रियात, साल्झबर्गला तयार झाला होता.) पुन्हा नोकरीसाठी वणवण. योगायोगाने उद्योगपती, नोबेल पुरस्कारांचे जनक आल्फ्रेड नोबेल यांची सचिव म्हणून तिला नोकरी मिळाली. या नोकरीने तिचं आयुष्य बदललं. तिने त्यांच्याकडे केवळ दोन आठवडे नोकरी केली, पण तिच्या बहुश्रुतपणाचा, विचारी वृत्तीचा ठसा नोबेल यांच्यावर उमटला. त्यांची व तिची चांगलीच मैत्री जमली व ती त्यांच्या मृत्यूपर्यंत टिकली. तिने आर्थरवरील आपलं प्रेम उघड केलं आणि आर्थरच्या सांगण्यानुसार त्यांची नोकरी सोडली. तिचं माहेर कनिष्ठ दर्जाचं आहे म्हणून आर्थरच्या आईवडिलांनी त्यांना घरातून हाकलून दिलं. त्या दोघांनी पळून जाऊन लग्न केलं. नवपरिणीत जोडपं, जॉर्जिया आणि कॉकेशस पर्वतरांगांच्या पायथ्याशी असणारी गावं येथे जाऊन जगण्याची धडपड करत राहिलं. दोघांनाही वाचन, विचार आणि सेवा याच गोष्टींची आवड होती. त्याच वेळी रशिया विरुद्ध तुर्कस्थान युद्ध सुरू झालं. आर्थर युद्ध-वार्तापत्रं लिही. बेर्था पहिल्यापासून दैनंदिनी लिहीत असे. एक दिवस तिने ‘फॅन्स अॅण्ड एप्रॉन्स’ नावाचा लेख लिहिला आणि तो व्हिएन्नाला एका वृत्तपत्राला पाठवला. उलटटपाली तो लेख स्वीकारल्याचं पत्र आणि लेखाच्या मानधनाचा धनादेश तिच्या हाती आला. हे सारं अनपेक्षित होतं. स्त्रियांचं लेखन स्वीकारलं जात नसल्यानं, तिनं टोपणनावानं तो लेख पाठवला होता. ते नाव होतं, इ.ड४’३ स्यूटनेर यांच्या घरी तिला इ४’३३ी (जाडू किंवा मोटी) असं म्हणून चिडवीत. तेच नाव तिने घेतलं. ती म्हणते, ‘‘लेख लिहिल्याचं अतीव समाधान आणि त्या छापील लेखाखाली आपलं नाव पाहून अवर्णनीय आनंद झाला. शिवाय मिळालेल्या मानधनामुळे मी लेखक आहे असं जणू शिक्कामोर्तब झालं.’’ बेर्था आर्थरबरोबर पत्रकारिता करू लागली. जॉर्जियन भाषा, जनजीवन यावर आधारित कथा, वार्तापत्रं ती दोघं लिहीत. कॉकेशसमध्ये राहात असतानाच या युद्धामुळे झालेला संहार, उद्ध्वस्त झालेले संसार, देशोधडीला लागलेले शेतकरी यांचं दु:ख त्यांनी प्रत्यक्ष अनुभवलं. त्यांचा कल युद्धविरोधी होऊ लागला. याच वेळी घरच्यांचा विरोध मावळला. त्यांना सन्मानाने घरी बोलावलं गेलं. ती दोघं घरी परतली. मात्र आता ध्येयनिश्चिती झाली होती. कॉकेशसमधील वास्तव्याच्या ९ वर्षांत, तिनं ४ कादंबऱ्या लिहिल्या. स्वत:ची प्रेमकहाणी भावपूर्ण रीतीनं लिहिली ‘व्हेन थॉट्स विल सोअर’. त्याच वेळी एक गंभीर, वैचारिक पुस्तकही तिनं लिहिलं - ‘इनव्हेंटरी ऑफ अ सोल’. यात तिनं आपल्या मनातील विचारांचा धांडोळा घेतला आहे. त्या उभयतांनी मिळून केलेले वाचन, विशेषत: स्पेन्सर, डार्विन यांच्यासारख्यांचे उत्क्रांतीसंबंधित विचार, यावर मनन करून तिनं आपल्या मनातील प्रगत समाजाची कल्पना चितारली आहे. आपण शांततेतूनच प्रगती साधू शकतो असा विश्वास ती प्रकट करते. तिच्या लेखनातलं एक गमतीदार साम्य. आपल्या आत्मचरित्रात आपल्या पतीचा उल्लेख ती नावाने न करता ‘माझा स्वत:चा’ (तो) असं ती म्हणते. पतीपत्नींमधील ही सायुज्यता दाखवणारं संबोधन वाचताना मला सहजच रमाबाई रानडे यांच्या आत्मचरित्राची व त्यातील न्यायमूर्तीसाठी वापरलेल्या ‘स्वत:’ या संबोधनाची आठवण होत होती. बेर्थाची सगळ्यात महत्त्वाची व लोकप्रिय असणारी, तिला नोबेलपर्यंत घेऊन जाणारी कादंबरी म्हणजे ‘ले डाउन युवर आर्म्स’ (१८८९). युद्धाच्या भयानक परिणामांची जाणीव यात विलक्षण रीतीनं करून देण्यात आली आहे. अर्नेस्ट हेमिंग्वेची ‘फेअरवेल टू आर्म्स’ (१९२९), किंवा एरिक रेमार्क यांची ‘ऑल क्विट ऑन द वेस्टर्न फ्रंट’ (१९२९) यासारख्या युद्धसंबंधित प्रभावी कादंबऱ्या व चित्रपट आपल्याला आठवतात. बेर्थानेही आपल्या कादंबरीच्या शीर्षकापासूनच लोकांना शस्त्रं खाली ठेवण्याचं केलेलं आवाहन अत्यंत परिणामकारक ठरलं. पहिल्या महायुद्धानंतर आलेल्या या दोन कादंबऱ्यांआधी बेर्थाच्या कादंबरीने युद्धबंदीबाबत वातावरण निर्माण केलं होतं. १८८९ ते १९०३पर्यंत या मूळ जर्मन कादंबरीचे २० युरोपिय भाषांमध्ये अनुवाद झाले आणि जर्मनमध्ये ३७ आवृत्त्या निघाल्या. बेर्था व आर्थर यांना लंडनमधील आंतरराष्ट्रीय लवाद आणि शांतता यासंबंधी काम करणाऱ्या संघटनेची व तत्सम काम करणाऱ्या इतर संस्थांची माहिती मिळाली. या सगळ्यांचं ध्येय होतं- ‘सशस्त्र फौजेऐवजी समझोता व शांतता’. बेर्थानं सर्वस्वानं यात उडी घेतली. आपली सारी शक्ती पणाला लावून तिनं अनेक पातळ्यांवर युद्धविरोधी संघर्ष जारी ठेवला. या काळात तिचं आणखी एक पुस्तक प्रसिद्ध झालं, ‘द एज ऑफ मशिनरी’ (१८८९). या पुस्तकात तिनं आपल्या मनातील खदखदणाऱ्या, युद्ध, संहार इत्यादी वर्तमानातील गोष्टींसंबंधीच्या विचारांना वाट करून दिली आहे. त्यावर लेखक म्हणून आपलं नाव न घालता तिनं ‘अनाम’ असं म्हटलं. कारण होतं की लोकांच्या मते तत्त्वज्ञान, शास्त्रीय संशोधन यातलं स्त्रियांना कळत नाही, त्या काय लिहिणार? पुस्तक खूप गाजलं, नावाजलं गेलं, खुद्द बेर्थाजवळच लोकांनी त्या पुस्तकातील विचारांची स्तुती केली आणि तिनं जेव्हा ते वाचायची इच्छा दाखवली तेव्हा हे समजणं बायकांचं काम नाही असं स्पष्ट सांगितलं गेलं. तिनं आपल्या गुपिताचा मनसोक्त आनंद लुटला. बेर्थानं आता ठिकठिकाणी शांतता संघटना स्थापन करण्याचा विडाच उचलला. युरोपातील वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन व्याख्यानं देत, जनजागृती केली. अशा समविचारी राष्ट्रप्रमुखांची परिषद प्रथम जिनिव्हा येथे, १८६४मध्ये भरली होती. नंतर नेदरलॅण्ड्सची तत्कालीन राणी विल्हेमिया हिनं पुढाकार घेऊन १८९९मध्ये द हेग येथे ही परिषद भरवली. या सगळ्यात बेर्थाचा मोठा वाटा होता. नोबेल यांनी संशोधनासाठी पुरस्कारांच्या रकमेची व्यवस्था करायची म्हटल्यावर जागतिक शांतता हा विषयही यात यावा असा आग्रह तिने धरला. नोबेलने तिच्याजवळून सर्व माहिती घेतली व शेवटी तो पुरस्कार ठेवला गेला. हेग येथील पीस पॅलेसच्या निर्मितीसाठी पैशांची उभारणी करताना बेर्थाने अमेरिकन उद्योगपती अॅण्ड्रय़ू कार्नेजी यांना गळ घातली. कार्नेजी फाउंडेशनच्या घसघशीत देणगीतून ही वास्तू उभी राहिली आहे. १९०७च्या हेग शांतता परिषदेसाठी तिने वीस राष्ट्रांतील दोन लाख स्त्रियांच्या सह्य़ा असणारे युद्धविरोधी निवेदन परिषदेपुढे ठेवले. अनेकांनी शिफारस केल्याने, १९०५ चा शांततेचा नोबेल पुरस्कार तिला दिला गेला. जर्मनी व ऑस्ट्रिया येथील नाणी व नोटा यावर तिची मुद्रा छापली गेली. तिच्या स्मृतिशताब्दीनिमित्ताने तिचा अर्धपुतळा पीस पॅलेसमध्ये बसवला गेला. हा सन्मान मिळालेली ती एकमेव स्त्री आहे. तिचं म्हणणं होतं, ‘राष्ट्राराष्ट्रांमधली तडजोड तलवारीने होऊ नये.’ नोबेल स्वीकाराच्या आपल्या भाषणात तिने म्हटले, ‘‘आपण दोन गोष्टींचे उल्लंघन कधी करू नये. एक -जगणे हा मानवाचा शाश्वत हक्क आहे. तो त्याला मिळाला पाहिजे. दोन- ख्रिश्चन धर्मातील दहा आज्ञांपैकी एक आज्ञा आहे की, तू कोणाचाही वध करणार नाहीस. ती पाळली पाहिजे.’’ आज कुलभूषण जाधव यांच्या संबंधित निकालाने, तिच्या इच्छेचा मान राखला गेला आहे असं म्हणता येईल. डॉ. मीना वैशंपायन meenaulhas@gmail.com