यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी अर्थव्यवस्था, राजकारण आणि समाजकारणाच्या संकल्पनांबद्दल जाणीव असावी लागते. एक यशस्वी म्युच्युअल फंड गुंतवणूकदार होण्यासाठी बैठक तयार करणारे मासिक सदर महिन्याच्या शेवटच्या सोमवारी.. एखादी वस्तू किंवा सेवा विकत घेण्यासाठी आजच्यापेक्षा अधिक किंमत तीच वस्तू अथवा सेवा खरेदी करण्यासाठी काही काळानंतर मोजावी लागते. त्या सेवा किंवा वस्तूची किंमत वाढण्याची ही प्रक्रिया म्हणजे महागाई होय. एखाद्या वस्तू अथवा सेवेच्या मागील वर्षांच्या तुलनेत सध्याच्या दराच्या वाढीची टक्केवारी म्हणजे महागाईचा दर. महागाई नेहमीच टक्केवारीत मोजली जाते. गरीब अथवा श्रीमंत प्रत्येकाला महागाईचा सामना करावा लागतो. विशेषत: गरिबांना महागाईची झळ अधिक जाणवते. महागाई मुख्यत्वे किरकोळ व ठोक किमतीवर मोजली जाते. महागाई मोजण्यासाठी एका विशिष्ट वस्तू अथवा सेवेच्या किमतीतील चढउतार विचारात न घेता विविध अन्न घटक, उत्पादित वस्तू व सेवा यांच्या किमती विचारात घेतल्या जातात. महागाई मोजण्याचे काम भारतात केंद्र सरकारचे कार्यक्रम अंमलबजावणी व सांख्यिकी मंत्रालय करते. तालुका व जिल्हा पातळीवर वेगवेगळ्या बाजारपेठेत जाऊन वस्तू व सेवांचे भाव नोंदण्याचे काम या मंत्रालयातील सहाय्यक करतात. ही आकडेवारी नित्यनेमाने गोळा केली जाते. मागील महिन्याचा महागाईचा दर पुढील महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी सकाळी ८.३० वाजता या मंत्रालयाच्या संकेत स्थळावर जाहीर केला जातो. किरकोळ किमतींवर आधारित सध्याच्या महागाई निर्देशांकात ४४८ वस्तू व सेवांचा समावेश आहे. एक निश्चित वर्ष प्रमाण मानून त्यावर्षीच्या किमतीवर आधारित महागाईचा निर्देशांक निश्चित केला जातो. हा निर्देशांक १०० समजून त्या निर्देशांकासापेक्ष महागाईची टक्केवारी मोजली जाते. सध्या म्हणजेच जानेवारी २०१५ पासून जानेवारी २०१२ सालच्या किरकोळ किमती आधारभूत मानून त्या प्रमाणात वाढलेली अथवा घटलेली महागाई किती हे मोजले जाते. महागाई गुंतवणूकदाराचा पहिला शत्रू ठरते. एखादी वस्तू या वर्षी १०० रुपये दराने खरेदी केली असेल व महागाईचा दर ५ टक्के असेल तर ती वस्तू पुढील वर्षी १०५ रुपयांना मिळेल. आपली क्रयशक्ती कमी व्हायची नसल्यास बचतीवर म्हणूनच परताव्याचा दर ५ टक्कय़ाहून अधिक हवा. अर्थशास्त्रातील मागणी व पुरवठय़ाचा नियम महागाई दर ठरवीत असतो. मागणी वाढली व पुरवठा घटला किंवा स्थिर राहिला की किमती वाढून महागाई वाढते. महागाई वाढण्यास ऋतुमानसुद्धा कारणीभूत ठरते. पावसाळ्यात मासे महाग असतात, हिवाळ्यात भाजी स्वस्त तर मागणी वाढल्यामुळे अंडी महाग असतात, पावसाळ्यात पुरवठा घटल्यामुळे भाजी महाग होते, नवीन पीक आल्यावर ऑक्टोबर व मे महिन्यात धान्य देखील स्वस्त होते. Inflation is a debtor's best friend and a creditor's worst enemy अशी इंग्रजीत म्हण आहे. कारण महागाई वाढली की व्याजाचे दर वर जातात. महागाईच्या दराशी साधम्र्य राखण्यासाठी रोख्यांच्या किमती खाली जातात, जेणेकरून परताव्याचा दर रोख्याच्या देय व्याजाइतका असेल. अशी महागाई म्हणूनच गुंतवणूकदाराचा पहिला शत्रू ठरते. बचतीची क्रयशक्ती कमी करते. एखादी वस्तू या वर्षी १०० रुपये दराने खरेदी केली असेल व महागाईचा दर ५ टक्के असेल तर ती वस्तू पुढील वर्षी १०५ रुपयांना मिळेल. म्हणून बचतीवरचा परताव्याचा दर ५ टक्कय़ाहून अधिक हवा. महागाई व दीर्घायुष्य हे वित्तीय नियोजनातील शत्रू समजले जातात ते यासाठी. येत्या वर्षभरात गुंतवणूक विश्वातील वेगवेगळ्या संज्ञा उदाहरणाने आपण समजावून घेणार आहोत. या सदरासाठी वाचक सहभाग अपेक्षित आहे. तुमच्या प्रश्नांना (विशिष्ट शिफारशीव्यतिरिक्त) या सदरातून उत्तरे देणार आहे. तेव्हा विनासंकोच प्रश्न पाठवा. अजित प्रभाकर मंजुरे - AjitM@cdslindia.com लेखक सीडीएसएलच्या गुंतवणूक साक्षरता विभागाचे प्रमुख आहेत.