‘छोटा हाथी’ म्हणून तमाम वाहतुकदारांचा साथी बनलेल्या टाटा एसने गेल्या साडेसात वर्षांत १० लाख वाहनविक्रीचा अनोखा टप्पा पार केला आहे.
मे २००५ मध्ये टाटा मोटर्सने टाटा एस हे छोटेखानी वाणिज्य वापरासाठीचे चारचाकी वाहन भारतीय बाजारपेठेत आणले होते. एक टन वजन वहन क्षमतेच्या वाहन विक्री क्षेत्रात त्याने कडवी स्पर्धा निर्माण केली. यानंतर दोन वर्षांनी कंपनीने याच ब्रॅण्डखाली चार चाकी प्रवासी वाहनही सादर केले. या दोन्हीची संख्या ऑक्टोबर २०१२ अखेर १०,५९,१३५ झाली आहे. यामध्ये देशात विकले गेलेल्या एसची संख्या ९,९७,१३३ आहे. विविध २४ देशात हे वाहन निर्यात होते. १० विविध प्रकारात हे वाहन उपलब्ध आहे. कंपनीचा आता या क्षेत्रात ८० टक्क्यांपर्यंतचा बाजारहिस्सा आहे.
एक लाख माल वाहतूक वाहनाचा विक्रमही एसने २०१० मध्ये नोंदविला होता. तर अवघ्या दोन वर्षांत ५ लाख वाहन विक्री पार केली गेली. कंपनीच्या पंतनगर (उत्तराखंड) येथील या वाहनाची निर्मिती क्षमता आता वार्षिक ५ लाख आहे.