देशातील आघाडीच्या काही राष्ट्रीयीकृत बँक आणि ब्रिटनची गुंतवणूक कंपनी यांच्या भागीदारीतून सुरू झालेल्या इंडियाफर्स्ट लाईफ इन्शुरन्सने भारतीय व्यवसायाची तीन वर्षे नुकतीच पूर्ण केली. बँक ऑफ बडोदा, दक्षिणेतील आंध्रा बँक आणि लंडनच्या गुंतवणूक आणि संपत्ती व्यवस्थापन पाहणाऱ्या कंपन्यांच्या भागीदारीने इंडियाफर्स्टने भारतीय आयुर्विमा व्यवसायात नोव्हेंबर २००९ मध्ये सुरुवात केली होती. स्थापनेच्या पहिल्या नऊ महिन्यातच कंपनीने एक लाख विम्याचा टप्पा पार केला होता. ४७५ कोटी भागभांडवलासह कंपनीचे सध्या देशभरातील एक हजार शहरांमध्ये अस्तित्व आहे. मार्च २०१२ अखेर कंपनीचे एक हजार कोटी रुपयांचा व्यवसाय केला असून वार्षिक वाढ ३९ टक्के आहे, असे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. नंदगोपालन यांनी म्हटले आहे. कंपनीमार्फत ३ हजार कोटी रुपयांचे वित्तीय व्यवस्थापन पाहिले जाते. या कालावधीत कंपनी १६ लाख ग्राहकांपर्यंत पोहोचली आहे. येत्या दोन ते तीन वर्षांत कंपनीची व्यवसाय वाढ १० ते २० टक्क्यांनी वाढेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे.