ग्राहकसंख्येत देशातील पहिल्या क्रमांकाची दूरसंचार कंपनी असलेल्या भारती एअरटेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कपूर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी गोपाल विठ्ठल हे नव्या पदाची सूत्रे १ मार्च २०१३ पासून घेणार आहेत.
भारतासह दक्षिण आशिया विभागाचा कार्यभार पाहणारे कपूर यांचा भारती एअरटेलच्या दक्षिण आफ्रिकेतील दूरसंचार क्षेत्रात प्रवेश मिळवून देण्यात सिंहाचा वाटा होता. यानंतर त्यांच्याकडे कंपनीच्या या भागातील व्यवसायाची जबाबदारीही आली होती. कपूर हे येत्या २८ फेब्रुवारीलाचा कंपनी सोडणार असल्याचे भारती एअरटेलने मंगळवारी स्पष्ट केले.
समूहातील इंडस टॉवर्स आणि भारती ग्लोबलच्या संचालक मंडळावर ते कायम असतील. कपूर यांनी आपल्या कारकिर्दीतील १५ वर्षे भारती समूहात घालविली. तर विठ्ठल हे एप्रिल २०१२ मध्ये समूहात संचालक (विशेष प्रकल्प) म्हणून पुन्हा दाखल झाले होते.