नवी दिल्ली : देशातील बँकांच्या अनुत्पादक मालमत्तेला (एनपीए) उतरती कळा लागली असून, थकीत कर्जाच्या वसुलीने वेग घेतला आहे, असा दावा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मंगळवारी केला. अनेक बडय़ा कर्जदारांनी बँकांची कोटय़वधी रुपयांची कर्जे थकवून देशातून पळ काढला आहे. बँकांनी अशा पद्धतीचे थकीत कर्ज हे अनुत्पादक मालमत्ता (एनपीए) म्हणून दाखवले होते. त्यावरून देशात राजकीय रणही माजले असतानाच जेटली यांनी आर्थिक भविष्याचे आशादायी चित्र रंगविले आहे. जेटली यांच्या अध्यक्षतेखाली येथे देशातील २१ सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या प्रमुखांची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत जेटली यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसाठी गेली काही वर्षे आव्हानात्मक राहिली असून, आता मात्र थकीत कर्जाच्या वसुलीने वेग पकडला आहे. हा ‘नादारी आणि दिवाळखोरी संहिता प्रक्रिया’ अनुसरण्याचा सुपरिणाम आहे. अलीकडेच बुडीत कर्जासंबंधाने संसदीय समितीपुढे टिपण सादर करणारे रिझव्र्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्यावरही त्यांनी जोरदार टीका केली. सहेतुक कर्जबुडव्यांना (विल्फुल डिफॉल्टर्स) या संहिता प्रक्रियेनुसार चाप लावण्यात आला आहे. आता दिवाळखोर कंपन्यांच्या अधिग्रहण प्रक्रियेत सहभागाची संधी मिळावी यासाठी हे कर्जबुडवे स्वत:हून परतफेडीसाठी पुढे येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सरकारी बँकांनी कर्ज घोटाळे, सहेतुक कर्जबुडवी प्रवृत्ती यांचा कठोर मुकाबला करावा, असेही त्यांनी बँकप्रमुखांना बजावले. एकंदर बँकिंग व्यवसाय जोम पकडत असून, कर्ज वितरणातील उत्साहवर्धक वाढ अर्थव्यवस्थेला ८ टक्क्यांचा वृद्धीदर गाठण्यास पूरक ठरेल. प्रवाही अर्थव्यवस्थेचा बँकांच्या वाढीसाठी उपकारक लाभ दिसून येईल, असा आशावादही जेटली यांनी व्यक्त केला. वसुली एक लाख कोटींची चालू आर्थिक वर्षांत नादारी व दिवाळखोरी प्रक्रिया आणि अन्य मार्गातून बँका एकूण १.८ लाख कोटी रुपयांची वसुली करू शकतील, असा विश्वास वित्तीय सेवा सचिव राजीव कुमार यांनी व्यक्त केला. विशेष म्हणजे मार्च २०१८च्या आकडेवारीनुसार थकित कर्जाचे प्रमाण १०.२५ लाख कोटी रुपयांचे असल्याने वसुलीचे हे प्रमाण ‘उतरती कळा’ म्हणण्याएवढे मोठे आहे का, असा प्रश्न विचारला जात आहे. वसुली केवळ १ लाख कोटींची चालू आर्थिक वर्षांत नादारी व दिवाळखोरी प्रक्रिया आणि अन्य मार्गातून बँका एकूण १.८ लाख कोटी रुपयांची वसुली करू शकतील, असा विश्वास वित्तीय सेवा सचिव राजीव कुमार यांनी व्यक्त केला. विशेष म्हणजे मार्च २०१८च्या आकडेवारीनुसार थकित कर्जाचे प्रमाण १०.२५ लाख कोटी रुपयांचे असल्याने वसुलीचे हे प्रमाण ‘उतरती कळा’ म्हणण्याएवढे मोठे आहे का, असा प्रश्न विचारला जात आहे. आकडेमोड.. ३६,५५१ कोटी.. आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत बँकांकडून थकीत कर्जाची वसुली. ४९ टक्के.. गेल्या वर्षीपेक्षा अधिक वसुली. ७४,५६२ कोटी.. २०१७-१८ या वित्तीय वर्षांतील बँकांची अन्य कर्जवसूली. १८,००० कोटी.. बँकांच्या बिनगरजेच्या मालमत्ता विकून मिळणारी अपेक्षित रक्कम