‘जिओ’च्या धास्तीचा परिणाम * दूरसंचार मनोरे क्षेत्रात महाकाय कंपनीचा उदय नवी दिल्ली : एअरटेल, व्होडाफोन आणि आयडिया या स्पर्धक कंपन्यांनी एकत्र येत भारती इन्फ्राटेल आणि इंडस टॉवर्सचे एकत्रीकरण आणि त्यायोगे देशव्यापी अस्तित्व असलेल्या महाकाय दूरसंचार मनोरे कंपनीच्या उदयाचा मार्ग मोकळा केला आहे. देशातील सर्व २२ परिमंडळांतील १.६३ लाख दूरसंचार मनोऱ्यांसह २५,३६० कोटी रुपयांचा महसूल या एका संयुक्त कंपनीच्या छताखाली येणार आहे. चीननंतर भारतात या रूपाने प्रथमच एक मोठी दूरसंचार मनोरे कंपनी निर्माण होत आहे. विलीनीकरणानंतर एकत्रित कंपनी इंडस टॉवर्स लिमिटेड या नावाने ओळखली जाईल. शिवाय तिची भांडवली बाजारातील सूचिबद्धताही कायम राहणार आहे. विलीनीकरण व्यवहार पूर्ण झाल्याची माहिती बुधवारी भांडवली बाजाराला उभय कंपन्यांकडून कळविण्यात आली. दूरसंचार क्षेत्राच्या आखाडय़ात रिलायन्स जिओच्या सप्टेंबर २०१६ मधील प्रवेशाने भडकलेल्या दरयुद्धाचा व्यावसायिक फटका प्रस्थापित कंपन्यांना बसत असून, त्याचा मुकाबला म्हणून टाकले गेलेले हे पाऊल मानले जात आहे. इंडस टॉवर्समध्ये भारती एंटरप्राईजेसची (४२ टक्के) व्होडाफोनची (४२ टक्के) आणि आयडियाबरोबरची (११.१५ टक्के) भागीदारी आहे. शिवाय प्रोव्हिडन्सचा दूरसंचार मनोरे कंपनीत ४.८५ टक्के हिस्सा आहे. विलीनीकरणानंतर व्होडाफोनचा हिस्सा २९.४ टक्क्यांवर येणार आहे. तर आयडियाला यातून बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विलीनीकरणानंतर प्रोव्हिडन्सचा हिस्साही कमी होत तो ३.३५ टक्क्यांवर येणार आहे. नव्या इंडस टॉवर कंपनीवर आता भारती तसेच व्होडाफोनचे वर्चस्व राहणार आहे. मंगळवारी जिओच्या प्रवेशाने फटका बसल्याने भारती एअरटेलने गेल्या १५ वर्षांतील सर्वात कमी तिमाही नफ्याची नोंद केली आहे. सरलेल्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा आधीच्या वर्षांतील याच तिमाहीच्या तुलनेत ७८ टक्क्यांनी घसरला आहे.