मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने गुरूवारी ऐतिहासिक उच्चांकावर मजल मारली आहे. दिवसभरातल्या उलाढालीदरम्यान सेन्सेक्सने 36,699.53 ही पातळी गाठली होती. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी या निर्देशांकानं 11 हजारांचा पल्ला आज पार केला. याआधी निफ्टीनं एक फेब्रुवारी रोजी हा पल्ला गाठला होता.
निफ्टीच्या 50 शेअर्समधील 35 शेअर्सच्या भावात वधारणा झाली होती तर 15 शेअर्सच्या भावांमध्ये घसरण झाली होती. जवळपास 300 अंशांची उसळी आज सेन्सेक्सने मारली असून बाजारामध्ये तेजीचे वातावरण आहे. अर्थात, सेन्सेक्सच्या या रॅलीमध्ये सिंहाचा वाटा रिलायन्स इंडस्ट्रीजचा होता. अकरा वर्षांनंतर पुन्हा रिलायन्सने भांडवली मूल्याच्या बाबतीत 100 अब्ज डॉलर्सचा टप्पा पार केला. मुंबई शेअर बाजारात रिलायन्सच्या शेअरने 1,090 रुपये प्रति समभाग ही विक्रमी उंची गाठली.
बराच काळ आहे त्याच टप्प्यामध्ये घोटाळणाऱ्या शेअर बाजारानं विक्रमी उंची गाठली असून त्यामागची ही आहेत मुख्य कारणं

1. बाजारातील तेजीमागे कंपन्यांची उत्कृष्ट अपेक्षित कामगिरी हे कारण असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. एका तज्ज्ञाच्या सांगण्यानुसार कंपन्यांचे निकाल लवकरच जाहीर होणार असून बहुतेक कंपन्या जोमाने वाढ नोंदवणार असल्याचे कंपन्यांच्या वाढलेल्या नफ्यामुळे शेअर बाजारात चालना मिळत असल्याचे सांगण्यात येत आहे.

2. या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत उद्योगक्षेत्राची कामगिरी दमदार झाल्याचा अंदाज आहे आणि त्याचेच प्रतिबिंब बाजारात पडत आहे. टीसीएस या आयटी क्षेत्रातल्या कंपनीने गेल्या वर्षीच्या तुलनेत या तिमाहीतीस नफ्यात तब्बल 24 टक्क्यांची वाढ नोंदवली असून त्यामुळे आयटी कंपन्यांच्या शेअर्सकडे गुंतवणूकदारांचे विशेष लक्ष गेले आहे. टीसीएसचा भाव एकाच दिवसात पाच टक्क्यांनी वधारला आहे.

3. भारताने जीडीपीच्या बाबतीत फ्रान्सला मागे टाकत पाचव्या स्थानावर घेतलेल्या झेपेमुळेही बाजारात चैतन्य बघायला मिळत आहे. अमेरिकेमध्ये रोजगारामध्ये झालेली वाढही भारतीय बाजाराच्या पथ्यावर पडली आहे. यामुळे जागतिक बाजारात उत्साह निर्माण झाला असून त्याचे पडसाद भारतातही उमटले आहेत.

4. तसेच देशभरात समाधानकारक पाऊस पडत असून यंदाचे वर्ष दुष्काळी नसेल याची जवळपास खात्री झाल्यामुळेही गुंतवणूकदारांमध्ये एकूणात उत्साहाचे वातावरण आहे.