करोना व्हायरसमुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. त्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी शुक्रवारी सकाळी काही महत्वाच्या घोषणा केल्या.

आरबीआयकडून नाबार्ड, सीआयडीबीआय, एनएचबीला ५० हजार कोटींचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. त्यात नाबार्डला २५ हजार कोटी रुपये मिळणार आहेत. सीआयडीबीआयला १५ हजार कोटी आणि एनएचबीला १० हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. नाबार्डकडून शेती आणि ग्रामीण विकासासाठी कर्ज पुरवठा केला जातो. एसआयडीबीय छोटया उद्योगांशी संबंधित असलेली बँक आहे. तर एनएचबी गृहनिर्माण क्षेत्राशी संबंधित असलेली बँक आहे.

या संस्थांबरोबर झालेल्या चर्चेच्या आधारावर ही आर्थिक मदत जाहीर करण्यात आल्याची माहिती आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी दिली. रिव्हर्स रेपो रेट २५ बेसिक पॉईंटने कमी करण्यात आला आहे. आता रिव्हर्स रेपो रेट ३.७५ टक्के असेल. शक्तीकांत दास यांची पत्रकार परिषद सुरु असताना मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात ८८७ अंकांची तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्ये २७१ अंकांची वाढ झाली.

आणखी वाचा- आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे

जगभरात कच्चा तेलाच्या दरामध्ये घसरण होत आहे. जगामध्ये मोठी मंदी येण्याची शक्यता आहे. अन्य देशांच्या तुलनेत भारतामध्ये चांगली स्थिती आहे. यावर्षी १.९ टक्के विकास दर राहण्याची शक्यता आहे. आयएमएफनुसार करोनाचे संकट संपल्यानंतर विकास दर ७.२ टक्क्यापर्यंत पोहोचू शकतो असे शक्तीकांत दास म्हणाले. सध्या मानवतेसमोर करोना व्हायरसचं संकट आहे. या परिस्थितीत आर्थिक नुकसान कमीत कमी व्हावं यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत असे त्यांनी सांगितले.