मावळत्या २०१२ मधील भारतीय अर्थव्यवस्था तुलनेने चांगलीच म्हणता येईल; २०१३ मध्ये तर ती यापेक्षा उत्तम असेल, असा निर्वाळा भारतीयांनी आगामी वर्षांसाठी दिला आहे. रोजगाराविषयकही समाधान व्यक्त करणाऱ्या ‘रॅन्डस्टॅड’च्या या चौथ्या सर्वेक्षणात जागतिक तुलनेत भारतीयांनी अर्थव्यवस्थेबद्दल सकारात्मकता व्यक्त केली आहे.
भारतीयांमधून जाणून घेतलेल्या मतांमध्ये ७२ टक्के जणांनी सध्याची भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती केव्हाही चांगलीच आहे, असे म्हणता येईल, असे नमूद करून २०१३ मध्ये ती अधिक वृद्धिंगत होईल, याबाबत आशावाद निर्माण केला आहे. भारतीयांची, भारतीय अर्थव्यवस्थेबद्दलची ही सकारात्मकता जागतिक तुलनेतील ४१ टक्क्यांपेक्षा कितीतरी अधिक आहे.
सर्वेक्षणात सहभागी झालेल्या भारतीयांपैकी ९० टक्के मतप्रदर्शनकत्यार्ंना त्यांच्या कंपनीची, संस्थेची आर्थिक स्थिती चांगली आहे, असे वाटते. कामाचा भार वाढल्याचे सांगणाऱ्यांचे जागतिक पातळीवर हे प्रमाण कमी, ७२ ते ८७ टक्के आहे; मात्र २०१३ मध्ये काम आणि वैयक्तिक आयुष्य यातील समतोल साधला जाईल, या अपेक्षेवर जागतिक स्तरावर सहभागींनी २०१३ साठी ९३ टक्के मते दिली आहेत. सध्याच्या वित्तीय आरोग्याबद्दल समाधान व्यक्त करणाऱ्यांमध्ये भारतच सर्वोच्च स्थानी आहे. जागतिक स्तरावर ५५ टक्के सहभागींना वेतनवाढ पुरेशी मिळाली असे वाटत असताना भारतीयांचे मात्र याबाबतचे चांगले मत नमूद करणे ८३ टक्के इतके आहे.
सर्वेक्षणातील निष्कर्षांबाबत ‘रॅन्डस्टॅड इंडिया’चे मुख्य कार्यकारी अधिकारी ई. बालाजी यांनी म्हटले आहे की, एकूणच २०१२ हे वर्ष कर्मचाऱ्यांसह कंपन्यांसाठीही खूपच   आव्हानात्मक राहिले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना या दरम्यान कामाचा भार अधिक जाणवणे   क्रमप्राप्त आहे. जागतिक सहभागींच्या तुलनेत भारतीयांनी दाखविलेल्या आशादायक चित्रामुळे उद्योग क्षेत्राच्या मनुष्यबळ विकास       विभागातील व्यवस्थापकांनी त्यांची धोरणे    अधिक सक्षमतेने पुढे नेण्यास वाव निर्माण झाला आहे.     

जागतिक आणि भारतीय अर्थव्यवस्थेवरील अस्थिरता २०१२ मध्येही कायम राहिली. संपूर्ण २०१२ मध्ये देशाचा आर्थिक विकासाचा दर ५.५ टक्के राहण्याची शक्यता असून २०१३ मध्ये सरकारच्या धोरणांबाबत बदललेल्या वातावरणामुळे हा दर ६.८ टक्के असेल. औद्योगिक उत्पादन दरही या दरम्यान ५ टक्के तर महागाई दरही पुढील वर्षी ६.५ टक्के असेल.
-डॉ. अरुणसिंह
वरिष्ठ अर्थतज्ज्ञ,
डन अ‍ॅण्ड ब्रॅडस्ट्रीट