मकरंद जोशी किर्लोस्कर ब्रदर्सच्या काही प्रवर्तकांनी ६ ऑक्टोबर २०१० रोजी त्या कंपनीमधील त्यांचे सुमारे एक कोटी शेअर्स त्यांच्याच ग्रुपमधील किर्लोस्कर इंडस्ट्रीज या कंपनीला २७५ कोटी रुपयांना विकले. डिसेंबर २०१९ मध्ये सेबीने या व्यवहाराबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करून या व्यवहारामुळे किर्लोस्कर इंडस्ट्रीजला प्रचंड आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले असा आरोप करत प्रवर्तकांना नोटीस पाठवली आहे. वैयक्तिक हितसंबंध आणि आपल्या उद्योगाचे हितसंबंध या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत आणि असे द्वंद्व जेव्हा जेव्हा निर्माण होईल तेव्हा उद्योगाचे हितसंबंधांना कंपनीच्या संचालकांनी प्राधान्य देणे अपेक्षित असते. या प्रकरणामधील सत्य/असत्य कायदेशीर प्रक्रियेत समोर येईलच. पण या निमित्ताने एका मूलभूत प्रश्नाविषयी चर्चा करणार आहे. लालच तो करुंगाही! काही वर्षांपूर्वी एका उद्योजकांशी या विषयी चर्चा करत असताना तो उद्योजक म्हणाला ‘धंदा कर रहा हूं लालच तो करुंगाही!’ कृतिशील माणसाला आपण केलेल्या कामाचा मिळणारा मोबदला ही सर्वात सहज प्रेरणा देणारी गोष्ट असते. कधी कधी तो मोबदला कायदेशीर आणि नीतिमत्तेला धरून आहे का नाही हा निर्णय खूप क्लिष्ट होऊन जातो. किंबहुना फळाची अपेक्षाच नसेल तर काम करायचेच कशासाठी, असाही प्रश्न उपस्थित होतो. जर पैशाबद्दल लालच/आसक्ती नसेल तर तो माणूस उद्योग/धंदा करेलच कशासाठी, असा प्रश्न माझ्या ग्राहकाने मला विचारून मला विचार करायला भाग पाडलं. ‘पण मी बघतोय!’ एकदा स्टीव्ह जॉब्स त्याच्या सहकाऱ्याबरोबर काम करत होता आणि एका उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या वस्तूंच्या रंगसंगती आणि डिझाइनबद्दल स्टीव्हने नापसंती व्यक्त केली. स्टीव्हच्या सहकाऱ्याने त्याला विचारले की, ही वस्तू आपल्या उत्पादनाच्या आत असणार आहे आणि ती बाहेर दिसणार नाहीय. मग त्याच्या डिझाइनने काय फरक पडतो? स्टीव्ह म्हणाला, ‘ते कोणालाही दिसत नाहीय, पण मला तर दिसतंय आणि उत्कृष्टतेची कास धरणारा माणूस कुठलीही निकृष्ट गोष्ट स्वीकारू शकत नाही.’ पैशाच्या आसक्तीपेक्षा उत्कृष्टतेची कास नेहमीच श्रेयस्कर! यापुढे जाऊन एखादा उद्योजक उत्कृष्टतेची कास धरून समाजासाठीचा प्रश्न सोडवत असेल तर त्याच्या उद्योगाची कीर्ती जागतिक स्तरावर पसरते. एलन मस्क, बिल गेट्स, स्टीव्ह जॉब्स, रतन टाटा हे अशाच प्रकारचे उद्योजक. लालच/आसक्ती अनिवार्य असली तरीही ती जर असा एखादा प्रश्न सोडवण्याबद्दल असेल/समाजोपयोगी कामाबद्दल असेल/उत्कृष्टतेबद्दल असेल तर ती आसक्ती अधिक परिणामकारक आणि प्रभावी ठरते. भारतात कॅप्टन अमोल यादव यांनी भारतीय बनावटीचे विमान बनवण्याचं स्वप्न पाहिलं आणि तसं करून दाखविलं देखील.. जर त्यांना यश मिळालं तर तो जागतिक दर्जाचा उद्योग बनू शकतो. ‘हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा!’ हे प्रसिद्ध वाक्य शिवाजी महाराजांच्या विचारांचं द्योतक आहे. ‘जनतेचे भले व्हावे’ ही शिवाजी महाराजांची स्वराज्य स्थापनेमागची प्रेरणा होती, वैयक्तिक महत्त्वाकांक्षा ही त्यांची प्रेरणा नव्हती. वैयक्तिक पैसा/संपत्ती/ प्रतिष्ठा/ प्रसिद्धी याला मर्यादा आहेत. मागील आठवडय़ात याच लेखमालेत आपण लोकमान्यांचे विचार पहिले. ‘गीतारहस्य’ या ग्रंथामधून लोकमान्य आपल्याला सांगतात ‘जीवनात कर्म टळत नसल्याने कोणते कर्म आचारल्याने स्व-पर कल्याण साधेल याचा विचार करावा लागतो.’ ‘गीतारहस्य’ आपल्याला असेही सांगते की - ‘निष्काम बुद्धीने, कर्तृत्वाचा अहंकार व फळाची आसक्ती सोडून ईश्वरार्पण बुद्धीने कर्म केले तर त्याचे बंधकत्व नष्ट होते.’ अशाप्रकारचे कर्म ज्ञानप्राप्तीनंतरही लोकसंग्रह आणि जनकल्याणासाठी करण्यातच मनुष्य जीवनाची इतिकर्तव्यता आहे. अशा प्रकारचे कर्म केले तर मोक्षप्राप्ती होईलच, पण शिवाय सामान्य लोकांसाठी ते कर्म कित्ता म्हणून अनुकरणीय ठरते. शिवाजी महाराज गीता प्रत्यक्ष जगत होते. वैयक्तिक आर्थिक उन्नतीच्या आसक्तीच्या पुढे जाऊन सर्व भागधारकांची आर्थिक उन्नती, सर्व संबंधित (उदा. ग्राहक, पुरवठादार, कामगार, सरकार, पर्यावरण) यांची उन्नती, समाजासमोरील काही प्रश्नांची उत्तरं अशा प्रवासातून जाताना उद्योजकाची देखील उत्क्रांती होत असते आणि ती करताना अहंकार आणि आसक्ती यातून मुक्त राहून जर उद्योजक काम करू शकला तर त्याचे काम अत्यंत अनुकरणीय ठरते असं आपल्याला गीतारहस्य वाचताना जाणवतं.