वर्षांतून एकदा कधी कांदे तर कधी बटाटय़ाचे भाव भडकण्याचा गेल्या काही वर्षांत सुरू राहिलेला प्रघात लक्षात घेता, केंद्रीय कृषी मंत्रालयाने या जिनसांसाठी ५०० कोटी रुपयांच्या ‘भाव स्थिरता निधी (पीएसएफ)’ची स्थापना केली असून, ती चालू वर्षांच्या हंगामापासून अमलात आणण्याच्या दृष्टीने नियमावलीचा मसुदा जाहीर केला आहे.
निवडक नाशिवंत शेतमालासाठी हा प्रारंभिक ५०० कोटींची गंगाजळी असलेला निधी वापरात येणार आहे. किरकोळ बाजारात किमती भडकू लागतील, त्या वेळी या निधीमार्फत सांभाळण्यात येणारा त्या त्या जिनसांचा संरक्षित भांडार बाजारात खुला करण्याची योजना आहे. तथापि सुरुवात म्हणून केवळ कांदे, बटाटे या जिनसांपुरताच या निधीचा विनियोग केला जाईल, असे हा मसुदा सूचित करतो. खुल्या बाजारातील हा हस्तक्षेप केंद्र तसेच राज्य  सरकारद्वारे नियुक्त शेतकरी कृषी-व्यावसायिक संघांमार्फत केला जाईल आणि या प्रक्रियेत होणाऱ्या नफा-नुकसानीच्या विभागणीचेही प्रमाण मसुद्यात निश्चित करण्यात आले आहे. एक सात सदस्यांची निधी व्यवस्थापन समितीकडून ‘पीएसएफ’च्या निधीसंबंधी विनियोगावर देखरेख ठेवेल, निधीच्या मागणीच्या प्रस्ताव स्वीकारेल आणि त्याच्या मंजुरीचेही काम करेल. या समितीकडून निधीच्या परतफेडीची मुदत व अटी-शर्ती ठरवेल.