चालू, वर्ष २०२१ मध्ये भारतीय अर्थव्यवस्था १२ टक्के वेगाने प्रवास करेल, असा विश्वास मूडीज या अमेरिकी वित्तसंस्थेच्या विश्लेषकांनी व्यक्त केला आहे. देशाच्या वाढत्या अर्थव्यवस्थेसाठी पूरक पतधोरण आणि वित्तीय धोरणे निमित्त ठरतील, असे कारण देण्यात आले आहे. जोडीला रिझव्र्ह बँकेचे रेपो दर ४ टक्क्यांखाली येणार नाहीत, असा दावाही करण्यात आला. गेल्या वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा प्रवास उणे ७.१ टक्के राहिला आहे. मात्र नजीकच्या कालावधीत अर्थव्यवस्थेतील उभारीची चिन्हे दिसत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. आधीच्या (जुलै-सप्टेंबर २०२०) तीन महिन्यांतील उणे ७.५ टक्क्यांच्या तुलनेत ऑक्टोबर ते डिसेंबर २०२० मध्ये भारताचा विकास दर सकारात्मक, ०.४ टक्के राहिल्याकडे मूडीजने लक्ष वेधले आहे. प्राप्तिकरातील कपातीसारख्या सरकारच्या प्रत्यक्ष आर्थिक सुधारणांचा अर्थव्यवस्थेला फारसा हातभार लागणार नाही, अशीही शंका व्यक्त करण्यात आली आहे. भारताच्या देशांतर्गत, बाहेरील मागणीतही सुधार होत असून टाळेबंदी शिथिलीकरणामुळे हे घडल्याचे आंतरराष्ट्रीय वित्तसंस्थेचे विश्लेषक नमूद करतात. गेल्या काही महिन्यांपासून देशातील निर्मिती क्षेत्रातही वाढ होत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.