भारतातील उद्योजकतेकडे पाहण्याचा दृष्टीकोन बव्हंशी सकारात्मक असून अधिकतर उद्योजकांना उपजिविकेचा हा सर्वोत्तम मार्ग वाटत असल्याचे एका सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.
अ‍ॅम्वे इंडियाने सर्वेक्षणाअंती तयार केलेल्या उद्यमशीलता अहवालात, दोन तृतियांश उद्योजकांनी या सकारात्मकतेवर शिक्कामोर्तब केले आहे. राज्य पातळीवर ही बाब केरळ (७८ टक्के), पंजाब (७७ टक्के), उत्तराखंड (७६ टक्के) या राज्यांमध्ये ठळकपणे नमूद करण्यात आली आहे. आपापल्या राज्यांत व्यवसाय सुरू करण्याकरिता आवश्यक पर्यावरणामध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये सुधारणा झाली आहे, असे मत ४५ टक्के सहभागींना नोंदविले. तर अपयशाची भीती हा स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेण्यातील सर्वात मोठा अडथळा आहे, असे ६३ टक्के मंडळींना वाटते.
स्वत:चा व्यवसाय करताना उद्योजकांना आíथक सहाय्याची उपलब्धता (४१ टक्के) आणि कुटुंबाचा पाठिंबा (३५ टक्के) या गोष्टी सर्वाधिक महत्त्वाच्या वाटतात. सुयोग्य प्रशिक्षण/शिक्षण घेतल्यास कोणीही उद्योजक बनू शकते असे ७३ टक्के प्रतिसादकर्त्यांंना वाटते. आपण घेतलेले शिक्षण स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याकरिता पुरेसे आहे, असे मत ६२ टक्के उद्योजकांनी सर्वेक्षणात नोंदविले.
या सर्वेक्षणांत अ‍ॅम्वेचा भागीदार असलेल्या निल्सन इंडियाने २१ राज्यांमधील ५० वेगवेगळ्या शहरांमधील २५० कुटुंबांचे सर्वेक्षण केले. २१-६५ वष्रे वयोगटातील एक पुरुष आणि एक महिला अशा मुलाखती घेतल्या गेल्या. अशा रितीने या अहवालाकरिता सर्व मिळून १०,७६८ लोकांकडून प्रतिसाद मिळविला गेला.