भाज्याच्या किमतीत थेट ५० टक्क्यांनी वाढ

नवी दिल्ली : चालू वर्षांच्या सुरुवातीलाच महागाई दर गेल्या सहा वर्षांच्या वरच्या टप्प्यावर झेपावला आहे. अन्नधान्याच्या वाढत्या किमतीमुळे जानेवारी २०२० मधील किरकोळ ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर ७.५९ टक्क्यांवर पोहोचला आहे.

यापूर्वी मे २०१४ मध्ये महागाई दर ८.३३ टक्के अशा वरच्या टप्प्यावर होता. महागाई निर्देशांकातील अन्नधान्याच्या गटवारीतील महागाई दर १३.६३ टक्के आहे. भाज्या, डाळी तसेच मांसाहारी पदार्थाच्या किमतींचा भार महागाई निर्देशांकावर पडला आहे. वर्षभरापूर्वी अन्नधान्याच्या महागाईचा दर उणे स्थितीत होता. तर भाज्यांच्या किमती यंदाच्या जानेवारीत थेट ५० टक्क्यांनी वाढल्या आहेत. डाळींचे दर १७ टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. प्रथिनेयुक्त खाद्यपदार्थही दुहेरी अंकापर्यंत वाढले आहेत.

एकूण महागाई निर्देशांकातील अन्नधान्याची किंमतवाढ लक्षणीय आहे. गेल्या महिन्यात भाज्यांच्या किमती ५०.१९ टक्क्यांनी तर डाळींचे दर १६.७१ टक्क्यांनी वाढले आहेत.