महागाई आणि विकास यात समतोल साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या रिझव्‍‌र्ह बँकेने व्याजदर आणखी कमी करायला हवेत, अशी इच्छा व्यक्त करतानाच पतधोरणाबाबत मध्यवर्ती बँक व सरकारमध्ये मतभेद नसल्याचा पुनरूच्चार केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मंगळवारी केला.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत रिझव्‍‌र्ह बँकेच्या ‘कर्मठ’तेवर बोट ठेवत जेटली म्हणाले की, रिझव्‍‌र्ह बँकेच्या गव्हर्नरांनी यापूर्वी दोन वेळा दर कपात केली. वाढती महागाई लक्षात ठेवून विकासाला बाधा होणार नाही, याबाबत वेळोवेळी त्यांनी सावधगिरी बाळगली. व्याजदर कमी करण्याबाबत बँक अतिसावध व काहीशी कर्मठ असली तरी माझ्या मते आणखी व्याजदर कमी व्हायला हवेत.
विशेषत: सार्वजनिक बँकांच्या कर्ज व्यवस्थापनाबाबत स्वतंत्र यंत्रणा स्थापन केल्यानंतर रिझव्‍‌र्ह बँक व अर्थ खाते यांच्यात मतभेद असल्याची चर्चा सुरू झाली होती. याबाबत अर्थमंत्री म्हणाले की, महागाई वाढू नये म्हणून या दोन्ही यंत्रणा कार्यरत असतात. मात्र विकासाला चालना देण्यासाठी व्याजदर कमी असावेत, असे दोहोंनाही वाटते. त्याबाबत आमच्यात मतभेद आहेत, असे मुळीच नव्हे. उलट दोन संस्थांमध्ये मतभेद असणे हे चांगल्या अर्थव्यवस्थेचे द्योतकच असते.
जेटली म्हणाले की, मध्यवर्ती बँकेच्या भूमिकेबाबत त्या त्या देशांची निरनिराळी मते असतात. आपल्याबाबत सांगायचे झाले तर रिझव्‍‌र्ह बँक तिची भूमिका व्यवस्थित पार पाडते आहे. मात्र पतधोरण कसे ठरवावे यासाठी सरकारबरोबर चर्चा करणारी एखादी समिती आहे काय, असा सवालही अर्थमंत्र्यांनी उपस्थित केला.
गव्हर्नर राजन यांनी २०१५ मध्ये आतापर्यंत दोन वेळा पतधोरण बाह्य़ दर कपात केली आहे. चालू आर्थिक वर्षांचे धोरण जाहीर करताना मात्र स्थिर व्याजदर होते. आता मात्र विविध व्यापारी बँका त्यांचे गृह कर्ज स्वस्त करू लागल्या आहेत.

दरकपात हवीच, पण राजन यांचा सावध पवित्रा योग्यच : पी. चिदम्बरम
मुंबई : व्याजाचे दर चढे असणे हा गुंतवणुकीतील सर्वात मोठा अडसर असून ते दर कमी व्हायलाच हवेत. तथापि रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांचा दरकपातीबाबत सावध पवित्राही योग्यच असल्याचा निर्वाळा अर्थमंत्री अरुण जेटली यांचे पूर्वसुरी पी. चिदम्बरम यांनी दिला.
चिदम्बरम यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नजीकच्या काळात राजन यांच्याकडून आणखी रेपो दरकपातीची शक्यता नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. राजन यांना ठोस आकडेवारीची प्रतीक्षा असून, यंदा देशात होणाऱ्या पावसावर त्यांची भिस्त असेल, असे चिदम्बरम यांनी सांगितले. खरिपाच्या हंगामात पेरण्या कशा होतात हे पाहूनच ते निर्णय घेतील, असे त्यांनी सूचित केले.
तरी पुढे जाऊन गव्हर्नर राजन यांना व्याजाचे दर आणखी खाली आणावे लागणे भागच असल्याचे चिदम्बरम यांनी स्पष्ट केले. आर्थिक विकासदराने ८ टक्क्यांच्या पल्याड मजल मारणे अशक्य आहे. मात्र सरकारने ओढूनताणून आठ टक्क्यांचा ध्यास धरल्यास, ते चलनवाढ आणि किंमतवाढीत भर घालणारे ठरू शकेल, असा इशारा त्यांनी दिला.