गुंतवणूक लवचीकता अखेर पथ्यावर

मुंबई : भीती, साशंकता यामुळे आजवर समभाग गुंतवणुकीपासून दूर राहिलेल्या अथवा बाजाराला पडलेला दिशाहीन अनिश्चिंततेचा वेढा सैलावला जाईपर्यंत वाट पाहत बसलेल्या गुंतवणूकदारांसाठी मल्टिकॅप फंड हा आकर्षक पर्याय ठरत आहे. या म्युच्युअल फंड प्रकाराकडे वाढत्या कलातून हे दिसून येत आहे.

सर्व प्रकारच्या बाजार मूल्य असलेल्या म्हणजे लार्ज कॅप तसेच मिड व स्मॉल कॅपमध्ये गुंतवणुकीची असलेली लवचीकता हे मल्टिकॅप फंडांचे खास वैशिष्टय़ आहे. गेल्या एक-दीड वर्षांतील मिड आणि स्मॉल कॅपमधील तीव्र स्वरूपाच्या घसरणीपश्चात या फंड वर्गवारीत चांगल्या सुधारणाही दिसून आल्या आहेत.

उदाहरण म्हणून प्रत्यक्ष कामगिरी जोखायची झाल्यास, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल मल्टिकॅप फंडाच्या कामगिरीकडे पाहता येईल. अंतर्गत बाजार भांडवलानुसार वर्गीकरण आणि त्या आधारे गुंतवणूक हे या योजनेचे वेगळेपण आहे. सुस्थापित लार्ज कॅप आणि वाढक्षम समभागांमध्ये गुंतवणुकीला प्राधान्य आणि त्यायोगे भांडवल सुरक्षितता व स्थिरतेची काळजी घेतली जाते. त्या पश्चात पोर्टफोलियोला चांगला परतावा देऊ शकेल अशा मिड आणि स्मॉल कॅप समभागांची चोखंदळ निवड हे या योजनेचे गुंतवणुकीचे तंत्र लाभकारक ठरत आले आहे.

मागील एक आणि पाच वर्षे कालावधीचे व्हॅल्यू रिसर्च आकडेवारीनुसार, या मल्टिकॅप फंडाने सर्वोत्तम कामगिरी करून दाखविली आहे. तर सात आणि दहा वर्षांच्या कालावधीतील परतावा कामगिरीत त्याने सातत्याने संदर्भ निर्देशांकापेक्षा सरस परतावा दिला आहे. बीएसई ५०० टीआरआय या निर्देशांकाचा मागील पाच वर्षांतील परतावा १४.३६ टक्के, तर या फंडाचा परतावा दर १६.०६ टक्के आहे. त्याच प्रकारे सात आणि दहा वर्षे कालावधीत संदर्भ निर्देशांकाचा परतावा दर १४.१० टक्के व १५.३३ टक्के त्या उलट या फंडाचा परतावा अनुक्रमे १६.०५ टक्के आणि १६.६६ टक्के असा आहे.