मुंबई : महामार्ग पायाभूत सुविधा निर्मितीतील अग्रणी कंपनी आयआरबी इन्फ्रोस्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेडची विशेष हेतू उपकंपनी उदयपूर टोलवे प्रा. लिमिटेडने उदयपूर ते गुजरात सीमेपर्यंतच्या महामार्गाच्या सहा पदरीकरणाचा बांधा, वापरा, हस्तांतरित (बीओटी) तत्त्वावरील प्रकल्प मिळवला आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक २०८८ कोटी रुपयांच्या अर्थ पाठबळाची पूर्तता करण्यात आली असल्याचे गुरुवारी जाहीर करण्यात आहे. या एकूण ११३.८ किमी लांबीच्या राष्ट्रीय महामार्ग- ८ वरील रस्त्याच्या सहा पदरीकरणाच्या प्रकल्पाची एकूण किंमत २०८८ कोटी रुपये आहे. हा निधी कंपनीच्या ६२७ कोटी रुपये भांडवली योगदानातून, तर उर्वरित १,४६१ कोटी रुपये हे सरासरी द. सा. १०.६५ टक्के व्याजदराने कॅनरा बँकेच्या नेतृत्वाखाली बँक समुच्चयाकडून मंजूर प्रकल्प कर्जातून उभा केला जाणार आहे. प्रकल्पासाठी २१ वर्षांपर्यंत पथकर गोळा करण्याचा सवलत कालावधी कंपनीला बहाल केला गेला असून, ९१० दिवसांचा बांधकाम कालावधी निश्चित करण्यात आला आहे. हा प्रकल्प आरआरबी इन्फ्रोने गेल्या वर्षी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून १६३.८० कोटी रुपयांचे अधिमूल्य मोजून मिळविला आहे. आता या प्रकल्पाने आर्थिक पाठबळाची पूर्तता केल्यानंतर त्याच्या कामाला सुरुवात होईल. तथापि ही बाब कंपनीला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अन्य प्रकल्पांसाठी यशस्वी बोली लावण्यास खूपच उपयुक्त ठरेल, अशी प्रतिक्रिया कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक वीरेंद्र म्हैसकर यांनी व्यक्त केली. आर्थिक वर्षांत आरआरबी इन्फ्राने तीन रस्ते प्रकल्प मिळवले आहेत. त्यापैकी एका प्रकल्पासाठी आर्थिक तजवीज पूर्ण करण्यात आली आहे. अन्य दोन प्रकल्पांसाठी आर्थिक पाठबळ लवकरच मिळविले जाईल व त्याबाबतीत धनकोंशी चर्चा सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.