येत्या रविवारी १८ ऑक्टोबरला पुण्याची जनता सहकारी बँक आपला ६६ वा वर्धापन दिन साजरा करणार असून, त्या दिवशी राज्यात नाशिक, जालना, मुंबई (मुलुंड पश्चिम), कोल्हापूर (गांधीनगर) आणि रत्नागिरी (लांजा) अशा सहा ठिकाणी बँकेच्या नवीन शाखांचा शुभारंभ होत आहे. वर्धापन दिनाचे औचित्य साधून बँकेकडून रा. स्व. संघप्रणीत जनकल्याण समितीच्या माध्यमातून मराठवाडय़ातील जालना, लातूर आणि उद्गीर परिसरातील गावांना पाण्याच्या टाक्या आणि चारा उपलब्ध करून दिला जाणार आहे. जालना येथील बँकेच्या शाखा उद्घाटनप्रसंगी वरील कामासाठी जनकल्याण समितीला १५ लाख रुपयांचा निधी भाजपचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल. मुलुंड (प.) शाखेचे उद्घाटन रविवारी सकाळी भाजपचे मुंबई प्रदेश अध्यक्ष आशीष शेलार यांच्या हस्ते होईल, अशी माहिती जनता सहकारी बँक, पुणेचे अध्यक्ष अरविंद खळदकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. या सहा नवीन शाखांमुळे बँकेच्या महाराष्ट्र व गुजरातमधील शाखांची संख्या ५४ होणार आहे.