प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याच्या बुधवारच्या शेवटच्या दिवशी करदात्यांना दिलासा म्हणून सरकारने ही मुदत आणखी पाच दिवसांनी वाढविण्याच्या निर्णयाची घोषणा केली. आता सोमवार, ५ ऑगस्टपर्यंत करदात्यांना विवरणपत्र भरता येणार आहे. पगारदार करदात्यांना ई-विवरणपत्र अर्थात संकेतस्थळाच्या माध्यमातून ऑनलाइन कर-परतावा भरणे बंधनकारक केले गेले आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या माहितीनुसार मंगळवापर्यंत (३० जुलै) संकेतस्थळाद्वारे ९२ लाख विवरणपत्र दाखल झाले आहेत. गेल्या वर्षांतील याच कालावधीच्या तुलनेत ते तब्बल ४६.८ टक्क्यांनी अधिक आहेत. शेवटच्या काही दिवसांतील संकेतस्थळावरील वाढती वर्दळ पाहता, अद्याप परतावा भरू न शकलेल्या करदात्यांना सोयीसाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे.अर्थमंत्रिपदाचा कार्यभार हाती घेऊन पी. चिदम्बरम यांना गुरुवारी एक वर्ष होत आहे. यानिमित्ताने त्यांनी बुधवारी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत नाना तऱ्हेच्या आव्हानांमुळे चिंताजनक स्थितीला देशाच्या अर्थव्यवस्थेविषयी चिदम्बरम यांनी मात्र आशादायी वक्तव्ये केली.
* २०१३-१४ या आर्थिक वर्षांत देश ६ टक्क्यांपर्यंतचा विकास दर गाठू शकतो.
* चालू आर्थिक वर्षांत वित्तीय तूट सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या ४.८ टक्के राहील.
* कृषी क्षेत्राची प्रगती समाधानकारक असून सरासरीपेक्षा १६% अधिक पाऊस झाला आहे.
* सरकारने १,६०,९०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या १५७ प्रकल्पांना मंजुरी दिली आहे.
* सरकारी मालकीच्या कंपन्यांना परदेशात भांडवल उभारणीस मुभा देण्यात येणार आहे.
* सोन्याची आयात कमी करण्याच्या दृष्टीने सरकारचे प्रयत्न नजीकच्या काळात कायम राहतील.
* ६०च्या खालील रुपया म्हणजे काळ्या दगडावरची रेघ नव्हे. चलन लवकरच ५८-५९ पातळीवर स्थिरावेल.
* थेट विदेशी गुंतवणूक मर्यादा अधिक शिथिल करणार. विमा सुधारणा विधेयकाचाही तिढा सुटेल.
* रोखे विक्री हा सरकारपुढे पर्याय आहे; मात्र तो तातडीने राबविण्याची घाई केली जाणार नाही.
* दीर्घकालीन अनिवासी भारतीय रोख्यांवरील परतावा अधिक आकर्षक करण्यासाठी उपाययोजना केल्या जातील.
* देशातील मोठय़ा उद्योगांकडून सध्या वित्तपुरवठय़ाची मागणी रोडावू लागली आहे.
* होय. सरकारने रिझव्‍‌र्ह बँकेच्या गव्हर्नरपदासाठी नव्या व्यक्तीचा शोध सुरू केला आहे.