काही बँकांनी १ मार्चपासून नवीन नियमांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. रोकडरहित व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी काही खासगी बँकांकडून बचत खात्यांमधून होणाऱ्या रोकड व्यवहारांवर शुल्क आकारण्यात येणार आहे. सध्या खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय आणि अॅक्सिस बँकेने नवीन नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकांतील व्यवहारांबरोबरच एटीएममधून होणाऱ्या व्यवहारांवरही मर्यादा आणण्याबाबत पुन्हा रिझर्व्ह बँकेकडून नियम लागू करण्यात येणार आहेत.

एचडीएफसी बँकेच्या बचत खातेधारकांना १ मार्चपासून दर महिन्याला आपल्या बँक शाखेत जाऊन चार वेळा पैसे जमा अथवा काढल्यानंतर कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. मात्र, त्यानंतरच्या रोकड व्यवहारांवर शुल्क भरावा लागणार आहे. निश्चित केलेल्या व्यवहारांनंतर होणाऱ्या प्रत्येक व्यवहारावर तब्बल १५० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. आतापर्यंत बँकेत पाच व्यवहार निशुल्क होते. त्यात कपात करून व्यवहारांची संख्या चारवर आणली आहे. एका महिन्यात ग्राहकाला बचत अथवा वेतन खात्यातून होम ब्रांचमधून दररोज दोन लाखांपर्यंत रक्कम काढता येणार आहे. त्याहून अधिक रक्कम काढायची असल्यास प्रत्येकी हजार रुपयांना ५ रुपये किंवा किमान शुल्काच्या रुपात १५० रुपये आकारले जाणार आहेत. यापूर्वी हीच मर्यादा ५० हजार रुपयांपर्यंत होती. तसेच बँकेच्या इतर शाखांमधून दररोज २५००० रुपयांपर्यंतची रक्कम काढल्यास कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. पण त्याहून अधिक रक्कम काढल्यास दरहजारी पाच रुपये किंवा किमान १५० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. त्यातही दिलासादायक बाब म्हणजे ज्येष्ठ नागरीक आणि लहान मुलांच्या बँक खात्यातून होणाऱ्या व्यवहारांवर कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही.

एचडीएफसीप्रमाणेच आयसीआयसीआय बँकेतही महिनाभरात चार वेळा रोकड व्यवहार झाल्यास कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. मात्र, त्याहून अधिक व्यवहार झाल्यास प्रत्येक व्यवहाराला कमीत-कमी १५० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. एक महिनाभरात एक लाख रुपयांपर्यंतची मर्यादा ठेवली जाऊ शकते. तर अॅक्सिस बँकेतही नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. होम ब्रांचमध्ये एक लाखापर्यंतची रक्कम जमा अथवा काढली जाऊ शकते. त्याहून अधिक रक्कम जमा अथवा काढल्यास प्रति हजार रुपयांस पाच रुपये शुल्क किंवा किमान १५० रुपये शुल्क भरावा लागणार आहे.

एटीएमद्वारे होणाऱ्या व्यवहारांवरही शुल्क आकारणार

नोटाबंदीच्या निर्णयापूर्वी आपल्या बँकेच्या एटीएममधून महिन्यात पाचहून अधिक वेळा पैसे काढल्यास केवळ वीस रुपये शुल्क आकारला जात होता. मुंबईसह दिल्ली-एनसीआर, कोलकाता, बेंगळुरू आदी शहरांत इतर बँकांच्या एटीएममधून तीन वेळा पैसे काढले तरी कोणतेही शुल्क आकारले जात नव्हते. ते पूर्णपणे मोफत होते. तर इतर शहरांमध्ये पाच वेळा पैसे काढल्यास शुल्क आकारले जात नव्हते. एक जानेवारीपासून नवीन नियम लागू झाले आहेत. नोटाबंदीपूर्वी एसबीआय, पीएनबी आणि आयसीआयसीआय बँकेकडून पाच वेळा पैसे काढल्यानंतर होणाऱ्या प्रत्येक व्यवहारावर १५ रुपये शुल्क आकारले जात होते. तर अन्य बँकाही पाच व्यवहारांनंतर होणाऱ्या प्रत्येक व्यवहारावर २० रुपये शुल्क आकारले जात होते. नोटाबंदीच्या काळात या शुल्क आकारणीस बंदी घातली होती. मात्र, एटीएमच्या व्यवहारांवर आता पुन्हा शुल्क आकारले जाणार आहे.