आणखी १३० कोटींची गुंतवणूक; विक्री दालने ५०वर नेण्याचे लक्ष्य आलिशान कार निर्मितीतील जर्मन नाममुद्रा बीएमडब्ल्यूने भारतातील या बाजारवर्गावरील आपले अधिराज्य आणखी मजबूत करण्याच्या मानसातून जागतिक स्तरावरील सर्वाधिक खपाची ‘५ सिरीज’ची संपूर्ण नवीन आवृत्तीचे गुरुवारी मुंबईत अनावरण केले. मुंबईत विक्री दालनांत या श्रीमंती गाडय़ांची (जीएसटीपश्चात) किंमत ४९.९ लाख रुपये आणि सर्वोच्च श्रेणीसाठी ६१.३ लाख रुपये निर्धारित करण्यात आली आहे. डिझेल आणि पेट्रोल अशा दोन्ही इंधन प्रकारात उपलब्ध ५ सीरिज श्रेणीतील गाडय़ांना जगभरात सर्वाधिक मागणी आहे. बीएमडब्ल्यूने गत वर्षी आपल्या स्थापनेची १०० वर्षे साजरी केली. या इतक्या वर्षांत जागतिक स्तरावर कंपनीने तब्बल ८० लाख गाडय़ांची निर्मिती केली, त्यात मोठा वाटा हा ‘५ सीरिज’ श्रेणीतील गाडय़ांचा आहे. भारतातही १० वर्षांच्या कार्यान्वयनात, विकल्या गेलेल्या ६६,००० बीएमडब्ल्यू गाडय़ांपैकी, जवळपास ३० टक्के म्हणजे १९,००० गाडय़ा या ५ सीरिज श्रेणीतील आहेत, असे बीएमडब्ल्यू इंडियाचे अध्यक्ष विक्रम पाहवा यांनी सांगितले. पाहवा यांनी अध्यक्षपदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर पहिल्यांदाच पत्रकारांशी संवाद साधला. २०१६ साल हे बीएमडब्ल्यूसाठी भारतात सलग सहा वर्षे विक्रीतील विक्रमी वाढीचे राहिले आहे. चालू वर्षांत मेपर्यंत आधीच्या वर्षांच्या तुलनेत ८ टक्क्य़ांच्या वाढीसह ३,५३३ गाडय़ा विकल्या गेल्याची त्यांनी माहिती दिली. नव्या ५ सीरिजच्या समावेशातून हा वाढीचा क्रम पुढेही जोमदार राहण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारतातील विक्री जाळ्यातही विस्ताराचे कंपनीचे नियोजन आहे. सध्या ३० शहरांमध्ये ४१ दालने ही २०१८ पर्यंत ५० वर नेण्याचे व नव्या बाजारपेठांमध्ये प्रवेशाचा आपला मानस असल्याचे पाहवा म्हणाले. नव्याने १३० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. भारतातील कार्यान्वयनावर बीएमडब्ल्यूने आजवर १,१२० कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून, चालू वर्षांत एकूण गुंतवणूक १,२५० कोटी रुपयांवर जाईल.