भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) ने योजनाधारकांना त्यांच्या व्यपगत (लॅप्स्ड) विमा पॉलिसी पुनरुज्जीवित करण्याची आणखी एक संधी देऊ केली आहे. ७ जानेवारी ते ६ मार्च २०२१ या कालावधीत एलआयसीकडून पॉलिसी पुनरुज्जीवनासाठी विशेष मोहीम राबविली जाणार आहे.

करोना आजारसाथीमुळे संचारावर आलेले निर्बंध पाहता आणि आजही त्या संबंधी असलेले भीती व दक्षतेचे वातावरण पाहता काही अपरिहार्य कारणामुळे, विम्याचे हप्ते भरणे शक्य न झालेल्या विमाधारकांना दिलाशासाठी हे पाऊल टाकले गेल्याचे एलआयसीने स्पष्ट केले आहे.

अटी व शर्तीच्या अधीन राहून, न भरलेल्या हप्त्याच्या तारखेपासून पाच वर्षे कालावधीपर्यंतच्या विशिष्ट पात्र योजनांचे पुनरुज्जीवन या मोहिमेतून केले जाऊ शकेल.

बहुतांश योजनांचे पुनरुज्जीवन या केवळ चांगल्या आरोग्याच्या लेखी प्रतिज्ञापन आणि कोविड प्रश्नावलीच्या आधारे केले जाईल. शिवाय, विलंब शुल्कात सवलतीचा लाभही पॉलिसीधारकांना या कालावधीत दिला जाईल.