‘इंडिया पल्सेस अॅण्ड ग्रेन्स असोसिएशन’तर्फे फेब्रुवारीत व्यापार परिषद दोन वर्षांत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे सरकारचे ध्येय साध्य होण्यासाठी भारतातील कडधान्य उत्पादन क्षेत्रात आधुनिक व्यापार दृष्टिकोन अंगीकारला जाणे गरजेचे असून या क्षेत्रात मोठय़ा गुंतवणुकीचे उद्दिष्ट राखणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे. भारतीय अर्थव्यवस्था २०२३ अखेर ५ लाख कोटी डॉलपर्यंत नेण्यासाठी येथील कडधान्य व्यापाराचे पाठबळ मिळण्यासाठी कडधान्य उत्पादक, व्यापाऱ्यांची पुण्यानजीकच्या लोणावळा येथे परिषद होत आहे. ‘इंडिया पल्सेस अॅण्ड ग्रेन्स असोसिएशन’ने (आयपीजीए) आयोजित केलेल्या या परिषदेत भारतासह विविध देशांतील १,५०० व्यापारी, व्यावसायिक, भागीदार सहभागी होणार आहेत. परिषदेच्या पाचव्या सत्राची घोषणा संघटनेने बुधवारी मुंबईत केली. अॅम्बी व्हॅली सिटी येथे १२ ते १४ फेब्रुवारी २०२० यादरम्यान होणाऱ्या या परिषदेत कडधान्यांच्या स्थानिक उत्पादन व वापराबाबत विविध मुद्दे चर्चेत घेण्यात येणार असून प्रक्रिया क्षमतेचा विकास, वापरातील वाढ, निर्यात, मूल्यवर्धन, प्रथिने शोषण, कापणी-उत्तर पीक व्यवस्थापन आदींवरही विचारमंथन होणार असल्याची माहिती देण्यात आली. ‘आयपीजीए’चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप घोरपडे यांनी सांगितले की, जागतिक व स्थानिक कडधान्य उत्पादन प्रमाण, स्थानिक व जागतिक किमती, पुरवठा व मागणीचे गुणोत्तर या अनुषंगाने परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. संघटनेचे अध्यक्ष जितू भेडा या समयी उपस्थित होते. ‘आयपीजीए’ ही भारतातील कडधान्ये व डाळींच्या व्यापार उद्योगातील संघटना असून तिचे ४०० हून अधिक प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सदस्य आहेत. देशभरातील १०,००० हून अधिक भागीदारांची प्रादेशिक कडधान्य व्यापारी व प्रक्रियाकार संघटनाही तिचा एक भाग आहे. उत्पादनात वाढ.. २०१३-१४ पासून भारतात कडधान्यांचे उत्पादन १.९० दशलक्ष टनांवरून २०१८-१९ मध्ये २.३० कोटी टनांवर पोहोचले. २०१९-२० मध्ये कडधान्यांचे उत्पादन २.६३ कोटींवर पोहोचले आहे.