सरकारी बँकांमधील राजकीय हस्तक्षेप कमी करण्याबाबत तसेच व्यावसायिकता जोपासताना बँकांना भीती न बाळगता व कुणालाही झुकते मान न देण्याबाबत सरकारने केलेल्या मार्गदर्शनाचे रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी स्वागत केले आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या एका कार्यक्रमात राजन यांनी सरकारचा हा महत्त्वाचा निर्णय असल्याचे नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ मोहिमेवर राजन यांनी तर राजन यांच्या व्याजदर कपातीच्या धोरणावर अर्थमत्र्यांनी नाराजी व्यक्त केली होती. मोदी यांनी पुण्यातील बँक परिषदेच्या ‘ज्ञान संगमा’त बँकांमधील राजकीय हस्तक्षेप कमी करण्याची गरज मांडली होती. तर जेटली यांनी याच व्यासपीठावरून बँकांना स्वायत्तता देण्याचे सुतोवाच केले होते.
दरम्यान, रिझव्र्ह बँकेचे माजी गव्हर्नर व पंतप्रधानांचे माजी आर्थिक सल्लागार सी. रंगराजन यांनी शुक्रवारी कोलकता येथे देशाच्या विकासासाठी बचत व गुंतवणुकीवरील दर वाढायला हवेत, असे मत प्रदर्शित केले. शाश्वत वाढीसाठी हे आवश्यक असून विकासासाठी प्रकल्पांची जलद पूर्णताही हातभार लावू शकते, असेही ते म्हणाले.