देशाच्या अर्थव्यवस्थेच एप्रिल महिन्याच्या तुलनेत सुधारणा होत असल्याची माहिती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिली. रिझर्व्ह बँकेच्या द्विमासिक पतधोरण आढाव्याबाबतची बैठक गुरुवारी संपली. रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीच्या २४ व्या बैठकीला मंगळवारपासून प्रारंभ झाला. तीन दिवस चाललेल्या बैठकीतील निर्णय रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान सांगितले. दरम्यान, रिझर्व्ह बँकेच्या रेपो आणि रिव्हर्स रेपो दरात कोणताही बदल करण्यात आला नसल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

“एप्रिल महिन्याच्या तुलनेत देशाच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा होता आहे. करोनाच्या प्रादुर्भावामुळे २०२० च्या पहिल्या सहामाहित जागतिक अर्थव्यवस्थेत मोठी घरसण झाली आहे. करोनाच्या प्रादुर्भावामुळे आयातीवरही मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. तसंच जगभरातील उत्पादन आणि सेवा क्षेत्रालाही याचा मोठा फटका बसला आहे. येत्या काळात करोनाची लस आल्यास चित्र बदलण्याची शक्यता आहे,” असं मत शक्तिकांत दास यांनी व्यक्त केलं.

तसंच चांगल्या पावसामुळे खरिपाच्या पेरणीतही वाढ झाली आहे. येत्या काळात देशाचा आर्थिक विकासदर उणेमध्ये राहण्याची शक्यता त्यांनी यावेळी व्यक्त केली. तसंच रेपो दर ४ टक्क्यांवर तर रिव्हर्स रेपो दर ३.३ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आल्याचंही ते म्हणाले. एमपीसीनं सर्वानुमते हा निर्णय घेतल्याचंही दास म्हणाले. “देशात सध्या महागाई दर नियंत्रणात आहे. एकीकडे दुसऱ्या देशांच्या परकीय चलनाच्या साठ्यात घट होत आहे. परंतु आपल्या परकीय चलनाच्या साठ्यातही वाढ होत आहे. जानेवारी ते जून या कालावधीत अर्थव्यवस्थेची स्थिती बिकट होती,” असंही दास यांनी स्पष्ट केलं.

पुढील काळात खाद्यपदार्थांचे दर वाढण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली. “यावर्षी जून महिन्यात वार्षिक महागाई दर मार्चच्या तुलनेत वाढून ५.८४ टक्क्यांवरून ६.०९ टक्क्यांवर आला आहे. रिझर्व्ह बँकेच्या मीडिअम टर्म टार्गेटपेक्षा तो अधिक आहे. रिझर्व्ह बँकेचं हे टार्गेट २ ते ६ टक्क्यांच्या दरम्यान आहे,” असंही यावेळी सांगण्यात आलं.