रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (आरआयएल) या देशातील आघाडीच्या कंपनीतर्फे प्राथमिक समभाग विक्रीच्या सुरुवातीपासून (आयपीओ) गेल्या ४० वर्षांमध्ये समभागधारकांना २१.०४% वार्षिक सरासरी वृद्धी दर (सीएजीआर) देऊ केला आहे.

आरआयएलने आपल्या पहिल्या आयपीओला ४० वर्षे पूर्ण केली असून त्यावेळी ज्यांनी आयपीओसाठी अर्ज केला होता आणि ज्यांना १,००० रुपयांच्या गुंतवणूक करून १०० समभाग मिळाले होते. त्यांचे मूल्य आता रु. १७,८२,६०५ झाले आहे. यात समीक्षाधीन कालावधीमध्ये रु. १,२७,७१९ संचयी लाभांश समाविष्ट आहे आणि भांडवल वृद्धी रु. १६,५४,८८६ आहे. गेल्या ४० वर्षांंमध्ये आरआयएलच्या आयपीओमधील गुंतवणुकीला २१.१६% इतका वार्षिक सरासरी वृद्धी दर मिळाला आहे.

आरआयएलचे बाजार भांडवल रु. ५,२५,५१३ कोटी असून बाजारमूल्याचा किंवा बाजारी भांडवलीकरणाचा विचार करता ही सर्वात मोठी भारतीय कंपनी ठरली आहे.

आरआयएलची सातत्यातील आर्थिक, प्रचालनाची कामगिरी आणि समभागधारकांचा, गुंतवणूकदारांचा कंपनी व्यवस्थापनावर असलेला विश्वस, कंपनीचे विकास धोरण आणि भविष्यातील उत्तम कामगिरीबद्दलची अपेक्षा याचे हे द्य्ोतक आहे, असल्याचा दावा कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी केला आहे.

अंबानी म्हणतात, निव्वळ नफ्याचा विचार करता आरआयएल ही भारतातील सर्वात मोठी खासगी क्षेत्रातील कंपनी आहे. गेल्या आर्थिक वर्षांमध्ये कंपनीने रु. ३१,४२५ कोटी निव्वळ नफा नोंदवला. २००१४-१५ आणि २०१५-१६ मध्ये कंपनी सर्वात जास्त निव्वळ नफा नोंदविणारी कंपनी ठरली होती.

अंबानी म्हणतात, आरआयएलच्या आयपीओने भारतात समभाग संस्कृती सुरू केली. धीरूभाईंच्या वैशिष्टय़पूर्ण आणि वेगवान वृद्धीसाठीच्या व्यवसाय धोरणामुळे आरआयएलला लवकर विस्तारीकरण करण्यास मदत केली आणि त्याचे प्रतिबिंब या कंपनीच्या समभागांमध्ये दिसून आले. कारण या कंपनीच्या समभागांची मोठय़ा प्रमाणावर भांडवलवृद्धी झाली आणि त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांना भांडवली बाजारात आकर्षित केले.

१९८१ साली मुकेश अंबानी यांनी व्यवसायात पदार्पण केले. कंपनीने शुद्धीकरण व पेट्रोकेमिकल आणि हाय स्पीड डिजिटल सेवांमध्ये प्रवेश करत सर्वात मोठय़ा क्षेत्रात प्रवेश केला आणि या क्षेत्रांमधील शाखांमध्ये विस्तारीकरण केले. त्यासाठी रु.४,००,००० कोटी गुंतवणूक केली.

अंबानी यांनी कंपनीच्या ४०व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत म्हटले होते की, मला सर्वच्या सर्व ४० सभांमध्ये उपस्थित राहण्याचे  भाग्य लाभले आहे. पहिली २५ वर्षे मी माझ्या वडिलांच्या बाजूला बसत असे. त्यांनी मला असीम प्रेम, पूर्ण लक्ष आणि आशेचा किरण दाखवत शिकविले.

मुकेश अंबानी यांनी सप्टेंबर २०१६मध्ये जिओ सेवा सुरू केली.

आयपीओतले १०० आता १,०२४!

४० वर्षांच्या अस्तित्वामध्ये रिलायन्सने भागधारकांना ५ अधिलाभांश भाग देऊ  केले. परिणामी, ज्यांना आयपीओमध्ये १०० समभाग मिळाले होते त्यांच्याकडे आता १,०२४ समभाग आहेत. आरआयएलने १९८९-८० मध्ये पहिला अधिलाभांश भाग ३:५ या प्रमाणात देऊ केला होता. तीन वर्षांनी १९८३ मध्ये आरआयएलने समभागधारकांना दुसरा अधिलाभांश भाग ६:१० या प्रमाणात दिला. आर्थिक वर्ष १९९७, आर्थिक वर्ष २००९ आणि २०१७ साली समभागधारकांना १:१ या प्रमाणात अधिलाभांश भाग देऊ  केला होता.