तिमाहीत मोबाइलधारक १४ कोटींनजीक

वर्षभरापूर्वी देशातील दूरसंचार क्षेत्रात शिरकाव करणाऱ्या रिलायन्स जिओला गेल्या तिमाहीअखेर २७०.५९ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. मात्र कंपनीचे ग्राहक या दरम्यान १३.८६ कोटी झाले आहेत.

रिलायन्स जिओला सप्टेंबरअखेरच्या तिमाहीत ६,१४७ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. मात्र कंपनीचा तोटा एप्रिलअखेर तिमाहीतील २२.५ कोटी रुपयांवरून विस्तारत २७०.५९ कोटी रुपयांवर गेला आहे. रिलायन्स जिओने पदार्पणातच १७० दिवासांमध्ये १० कोटी मोबाइलग्राहकांचा टप्पा गाठला होता.

गेल्या तिमाहीत कंपनीने १.५३ कोटी नवे मोबाइल ग्राहक मिळविले. कंपनीची डाटा वाहतूक ३७८ कोटी जीबी तर सरासरी व्हॉइस वाहतूक २६७ कोटी मिनिट प्रति दिन नोंदली गेली आहे. दूरसंचार व्यवसायाच्या प्रतिसादाचे मापक असलेल्या प्रति वापरकर्ते सरासरी महसूल (आरपू) १५६.४० रुपये राहिले आहे.

रिलायन्स जिओची मुख्य प्रवर्तक रिलायन्स इंडस्ट्रीजचा गेल्या तिमाहीतील नफा १२.५ टक्क्यांनी वाढला आहे. सप्टेंबरअखेरच्या तिमाहीत तो ८,१०९ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

धन धना धन सुरूच

दूरसंचार नियामक आयोगाने नवागत रिलायन्स जिओसाठी उपकारक ठरेल, अशा इंटरकनेक्ट शुल्कात कपात केल्यानंतर, जिओने स्पर्धक कंपन्यांसमोर आणखी एक मोठे आव्हान ठेवले आहे. आधीच्या ‘धन धना धन’ या ‘फुकटय़ा’ योजनेला भारती एअरटेलने हरकत घेत दूरसंचार नियामकांकडे (ट्राय) धाव घेतली आणि या योजनेला पाचर बसली. दिवाळीच्या मुहूर्तावर जिओने पुन्हा ‘दिवाळी धन-धना-धन ऑफर’ नव्या रूपात आणली आहे. यामध्ये ३९९ रुपयांच्या रिचार्जवर १०० टक्के परतावा अर्थात कॅशबॅक मिळणार आहे. १८ ऑक्टोबपर्यंत या योजनेचा लाभ घेता येणार आहे. ग्राहकांना ५० रुपयांचे आठ डिजिटल व्हाऊचर मिळतील, जे माय जिओ अ‍ॅपमध्ये उपलब्ध असतील. भविष्यात (१५ नोव्हेंबरनंतर) ३०९ रुपये किंवा ९१ रुपये आणि त्यापेक्षा जास्तीचा डेटा रिचार्ज करताना या व्हाऊचर्सचा विनिमय ग्राहकांना करता येणार आहे.