अतिजलद ४जी तंत्रज्ञानाचे देशव्यापी परवाने असलेल्या रिलायन्स जिओने गुरुवारी जीटीएल इन्फ्राबरोबर करार करत भविष्यातील आपल्या दूरसंचार सेवेसाठी २७,८०० हून अधिक मनोऱ्यांचे साहाय्य मिळवीत असल्याची घोषणा केली.
मुकेश अंबानी प्रवर्तित रिलायन्स जिओची बहुप्रतीक्षित दूरसंचार सेवा पुढील वर्षांत येऊ घातली आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या दूरसंचार मनोऱ्यासाठी कंपनीने जीटीएल इन्फ्रासह चेन्नई नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चरबरोबर करार केला आहे. उभय कंपन्यांचे देशातील २२ परिमंडळांत २७,८०० मनोरे आहेत.
रिलायन्सने डिसेंबर २०१३ मध्ये पायाभूत सेवा भागीदारीसाठी भारती एअरटेलबरोबरही करार केला आहे. तसेच मुकेश यांचे धाकटे बंधू अनिल धीरूभाई अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन्सबरोबरही फायबर केबलसाठी (एप्रिल २०१३ व २०१४) सहकार्य केले आहे.
नवोदित रिलायन्स जिओची सध्या देशभरातील ५ शहरे व २.१५ लाख गावांमध्ये पायाभूत सुविधा आहे. प्रत्यक्षात दूरसंचार सेवा सुरू होईपर्यंत ती ६ लाख गावांमध्ये पुरविण्याचा कंपनीचा मानस आहे. कंपनीच्या ताफ्यातील मनुष्यबळही वर्षभरापूर्वीच्या ७०० वरून १० हजारांवर गेले आहे.