* निकाल परिणामाने अस्वस्थता
*  मुंबई निर्देशांकात ६०० अंश व्यवहार आपटी; पतमानांकन संस्थांचा दिलासा
दिवाळीतील पहिल्या व्यवहारात तब्बल ६०० अंश आपटी अनुभवताना मुंबई शेअर बाजारामध्ये सप्ताहारंभीच अस्वस्थता अनुभवली गेली. बिहारमध्ये केंद्रातील सत्ताधारी भाजपा आघाडीला मिळालेल्या अपयशाने दिवसअखेरही गुंतवणूकदारांनी समभागांची विक्री केल्याने सेन्सेक्स १४३.८४ अंश घसरणीसह २६,१२१.४० तर निफ्टी ३९.१० अंश घसरणीसह ७,९१५.२० वर थांबला. अर्थव्यवस्थेबाबत खुद्द देशाचे अर्थमंत्री तसेच विविध पतमानांकन संस्थांनी काहीसा दिलासा व्यक्त केल्याने बाजारातील मोठी घसरण दिवसअखेर थांबली.
दिवाळसणाला गेल्या शनिवारीच खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. मात्र सण कालावधीतील बाजारातील व्यवहाराचा सोमवारचा दिवस पहिला होता. त्यातच रविवारी बिहार विधानसभेतील अनपेक्षित निकालाचे पडसाद बाजारात उमटणे स्वाभाविकच होते.
शुक्रवारच्या किरकोळ घसरणीनंतर सोमवारच्या मुंबई शेअर बाजाराचे व्यवहार सुरुवातीलाच ६०८ अंश घसरण नोंदवित होते. तर निफ्टीचा स्तरही यावेळी जवळपास २०० अंश घसरणीमुळे थेट ७,८०० पर्यंत येऊन ठेपला. सेन्सेक्सने यामुळे २६ हजाराच्याही खाली प्रवास नोंदविला. मुंबई निर्देशांकातील यापूर्वीची सलग तीन व्यवहारातील आपटी ही ३२५.३५ अंशांची होती. सोमवारच्या व्यवहारात सेन्सेक्स २५,६५६.९० पर्यंत तळात तर २६,१९३.१७ पर्यंत सावरला. मुंबई निर्देशांक आता महिन्याच्या खोलात आहे. सत्रात ७,८०० चा स्तर सोडणारा निफ्टी व्यवहारा दरम्यान ७,७७१.७० पर्यंत घसरला. तर ७,९३७.७५ पर्यंत मजल मारल्यानंतर तो ७,९०० च्या वर राहण्यात यशस्वी ठरला.
बाजारात दिवसभर असे मोठय़ा घसरणीचे चित्र कायम होते. राजकीय घडामोडींचे पडसाद देशाच्या अर्थव्यवस्थेवर होण्याबाबत पतमानांकन संस्थांनी साशंकता व्यक्त केल्याने बाजारातील मोठी घसरण दिवसअखेर काहीशी थांबली. मात्र सलग चौथ्या व्यवहारातील घसरण बाजारात कायम राहिली. डॉलरच्या तुलनते ७७ पैशांनी घसरणाऱ्या रुपयाचाही बाजारावर नकारात्मक परिणाम नोंदला गेला. अर्थमंत्री अरुण जेटली यांनीही, भारतीतील ठोस आर्थिक सुधारणा कायम असतील, ही दिलेली ग्वाही बाजाराला मोठय़ा घसरणीपासून थोपवू शकली.
सेन्सेक्समधील ३० पैकी दिवसअखेर १९ समभागांचे मूल्य घसरले. यात सन फार्मा, भेल, डॉ. रेड्डीज, गेल, विप्रो, सिप्ला, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, एचडीएफसी, लार्सन अ‍ॅन्ड टुब्रो, कोल इंडिया, ओएनजीसी, हिंदाल्को, एनटीपीसी, भारती एअरटेल, टीसीएस, बजाज ऑटो हे आघाडीवर राहिले. तर टाटा मोटर्स, मारुती सुझुकी, वेदांता, आयटीसी, स्टेट बँक, ल्युपिन, रिलायन्स, टाटा स्टील, महिंद्र अ‍ॅन्ड महिंद्र, अ‍ॅक्सिस बँक हे तेजीच्या यादीत राहिले. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये स्थावर मालमत्ता क्षेत्राला सर्वाधिक घसरणीला सामोरे जावे लागले. निर्देशांक २.२० टक्क्य़ांनी खाली आला. तर आरोग्यनिग, पायाभूस सेवा, भांडवली वस्तू, ऊर्जा, माहिती तंत्रज्ञान, बँक निर्देशांकही घसरले. मुंबई शेअर बाजारातील स्मॉल व मिड कॅप निर्देशांकांमध्ये मात्र वाढ नोंदली गेली.

अर्थव्यवस्थेबाबत उवाच..
बिहार विधानसभेत केंद्रातील सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मिळालेल्या सुमार अपयशामुळे आता देशाच्या अर्थव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या निकालाचा आर्थिक सुधारणांवर परिणाम होणार नाही, अशी ग्वाही खुद्द केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना द्यावी लागली. तर विविध पतमानांनक संस्था, दलाल पेढय़ा यांनीही या राजकीय घटनेचा देशाच्या अर्थव्यवस्थेवरील परिणाम हा अल्प कालावधीसाठी अशी पावती दिली.
बिहार विधासभेतील भाजपाच्या बाजुने लागलेले निकाल हे देशाच्या अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम करणार नाहीत. उलट ठोस आर्थिक सुधारणा राबविण्याचा केंद्र सरकारचा कार्यक्रम कायम असेल. वस्तू व सेवा कर विधेयक तसेच अन्य सुधारणा या येणाऱ्या अर्थसंकल्पात निश्चितच राबविल्या जातील.
– अरुण जेटली, केंद्रीय अर्थमंत्री.
बिहार विधानसभेतील भाजपाचा पराभव हा आर्थिक बाबतीत विपरित परिणाम करेल, असे वाटत नाही. ही घटना राजकीय मर्यादेपुरतीच आहे. देशाच्या मध्यम कालावधीच्या पतमानांकनातही त्यादृष्टीने काही बदल करावेसे सध्या तरी आवश्यक वाटत नाही. राजकीय निकाल हे विदेशी गुंतवणूकदारांनाही चिंतेत टाकणारे ठरणार नाहीत. वस्तू व सेवा करसारख्या आर्थिक सुधारणांची मात्र अर्थव्यवस्थेला अपेक्षा कायम आहे.
– फिच.
बिहारमधील पराभव हा भाजपासाठी तसेच भांडवली बाजारासाठी काही कालावधीकरिता जाणवेल. मात्र यामुळे आवश्यक कायदेशीर सुधारणांमध्ये अडथळा येऊ शकतो. आर्थिक बाबतीत मात्र सकारात्मक वातावरणाची आम्ही अपेक्षा करतो.
– सिटीग्रुप.
बिहारमधील पराभव हे भाजपासाठी मोठी बिकट परिस्थिती निर्माण करणारी घटना ठरली आहे. केंद्रातील सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला संसदेच्या वरिष्ठ सभागृहात कमी संख्याबळ मिळणार असल्याने कदाचित आर्थिक सुधारणांना कायदेशीर वलय प्राप्त करून देण्यात अडचणी येऊ शकतात.
– नोमुरा.
आर्थिक सुधारणांना पुन्हा प्रगतीच्या पथावर आणायचे असेल तर त्यांना अटकाव करून चालणार नाही. सुधारणांचा कार्यक्रम राबवावा लागेल, व्याजदर कमी करावे लागतील; तसेच बिहार विधानसभेचा निकाल काही क्षेत्रांवर मात्र निश्चित विपरित परिणाम करू शकतो.
– बँक ऑफ अमेरिका मेरिल लिंच.
बिहारमधील विधानसभेच्या निकालामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या राज्यसभेतील वर्चस्वाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तेथील जागांबाबत बिहार हे १६ जागांचे प्रतिनिधित्व करते. पैकी ५ जागा या राज्यात सत्तेवर येणाऱ्या जनता दल यूनायटेडकडे असतील.
– डीबीएस.
बिहारमध्ये येऊ घातलेले नवे नितीशकुमार यांचे सरकार हे विकासावर भर देणारे असेल व यामार्फत देशाच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीत हिस्सा राखला जाईल. केंद्रातील आघाडी सरकारला आर्थिक सुधारणांबाबतचे सहकार्य याद्वारे मिळेल.
– भारतीय औद्योगिक महासंघ (सीआयआय).