देशाचे सेवा क्षेत्र मरगळ झटकून ऑगस्ट महिन्यात लक्षणीय स्वरूपात सक्रिय झाल्याचे मासिक सर्वेक्षणातून आढळून आले आहे. करोना टाळेबंदीतील शिथिलतेसह बहुतांश व्यवसायांवरील प्रतिबंध दूर झाल्याचा सुपरिणाम सेवा क्षेत्राबाबत या महिन्यासाठी जाहीर झालेल्या अधिकृत आकडेवारीने दाखवून दिले आहे.

भारतातील सेवा व्यवसायातील खरेदी व्यवस्थापकांचा कल दर्शविणाऱ्या ‘आयएचएस मार्किट इंडिया सर्व्हिसेस पीएमआय’ ऑगस्टमध्ये सलग सहाव्या महिन्यात आकुंचन पावला असला, तरी मार्चच्या तुलनेत त्यात लक्षणीय प्रमाणात सुधार दिसून आला आहे. मार्च महिन्यात हा निर्देशांक ३४.२ गुणांवर होता, तोच ऑगस्टमध्ये ४१.८ असा सहामाही उच्चांक स्तरावर नोंदला गेला आहे. हा निर्देशांक ५० गुणांच्या वर राहिल्यास अर्थव्यवहारातील विस्तार दर्शविला जातो, तर ५०च्या खाली गुणांक आकुंचनाचे निदर्शक मानले जाते. अनेक सेवा व्यवसायांच्या कार्यान्वयनाची परिस्थिती आजही आव्हानात्मक असून, वेगवेगळ्या प्रकारचे प्रतिबंध अद्याप सुरू राहिल्याने एकूण सेवा उद्योगाचा घात केला असल्याचे दिसते, असे हे सर्वेक्षण करणाऱ्या आयएचएस मार्किट या संस्थेच्या अर्थतज्ज्ञ श्रीया पटेल यांनी सांगितले.

तथापि, निर्बंधाचे पाश सैल होऊन, अनेक सेवा व्यवसाय सक्रिय झाल्याचे ऑगस्टची आकडेवारी दर्शविते, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

..मात्र नोकर कपात सुरूच!

सर्वेक्षण आणि माहिती-संकलनाची प्रथा सुरू झाल्यापासून, म्हणजे मागील १५ वर्षांच्या काळात सेवा उद्योगामध्ये प्रकल्पांच्या पूर्ततेत असमर्थता, हाती घेतलेल्या कामांचा अनुशेष यांचे प्रमाण अभूतपूर्व स्तर गाठणारे आहे. स्थापित क्षमतेच्या किती तरी कमी प्रमाणात कामे होत असल्याचा विपरीत परिणाम सेवा क्षेत्रातील रोजगारावर झाला असून, सलग सहाव्या महिन्यात मोठय़ा प्रमाणात नोकर कपात करण्यात आली आहे, असे सर्वेक्षण करणाऱ्या आयएचएस मार्किट या संस्थेच्या अर्थतज्ज्ञ श्रीया पटेल यांनी सांगितले.