फोनबरोबरच इंटरनेट, टीव्हीदेखील; जिओच्या तिसऱ्या वर्धापनदिनी समूहाची भेट

देशाच्या स्थिर दूरध्वनी जोडणी क्षेत्रातील सरकारी बीएसएनएल, एमटीएनएलची मात्तबरी मरणपंथाला असतानाच पुन्हा एकदा ‘मोफत अस्त्रा’चा अवलंब करत खासगी उद्योग समूह रिलायन्सने याही क्षेत्रात शिरकाव केला आहे. येऊ घातलेल्या गणेशोत्सवात रिलायन्स जिओच्या तिसऱ्या वर्धापन दिनाला मोफत स्थिर फोन जोडणीसह वेगवान इंटरनेट आणि उच्च तंत्रस्नेही दूरचित्रवाणी संच व सेट टॉप बॉक्सही देऊ करण्यात आला आहे.

रिलायन्स समूहाच्या ४२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी या बहुप्रतिक्षित उपक्रमाची घोषणा केली. सभेला यावेळी अंबानी यांच्या पत्नी नीता, आई कोकिळाबेन, पुत्र अनंत, आकाश व स्नुषा श्लोका अंबानी उपस्थित होते. समूहाने मोफत मोबाईल सेवेद्वारे जिओ हे उत्पादन भारतीय दूरसंचार क्षेत्रात २०१६ मध्ये गणेशोत्सवा दरम्यानच सादर केले होते.

देशात तेल व वायू व्यवसायात मात्तबर असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रिजचा अधिकाधिक रोख आता तंत्रस्नेही सेवा पुरवठा क्षेत्रात असल्याचे स्पष्ट होत आहे. समूहाचे इंधन क्षेत्रातील स्वारस्य विविध विदेशी कंपन्यांना हिस्सा विकून कमी करण्यासह मनोरंजन, माध्यम क्षेत्रातील व्यवसाय विस्ताराची भूमिका अंबानी यांनी सोमवारी मांडली.

रिलान्सच्या जिओचे देशभरात ३४ कोटी मोबाइल ग्राहक आहेत. समूहाने सुरुवातीच्या टप्प्यात मोफत मोबाइल कॉल व इंटरनेटस असलेली ही सेवा सर्वप्रथम तीन वर्षांपूर्वी गणपतीच्या हंगामातच सुरू केली होती. कंपनीने मोबाइल ग्राहक संख्येतील अव्वलतेबाबत सुरुवातीला भारती एअरटेल व नंतर व्होडाफोन आयडियालाही मागे टाकले. समूहाने ४जी तंत्रज्ञानाकरिता ३.५० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

*  समूहाची बहुप्रतिक्षित फायबरवर आधारित फिक्स्ड लाईन ब्रॉडबँण्ड सेवा येत्या ५ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. जिओ फायबरद्वारे फिक्स्ड लाईन दूरध्वनीवरून देशभरात कुठेही केले जाणारे कॉल आजीवन निशुल्क असतील. नव्या क्लाऊड डाटा केंद्रासाठी मायक्रोसॉफ्टसह भागीदारी आहे.

*  जिओ फायबर अंतर्गतच नवीन उत्पादनाद्वारे इंटरनेट वेग किमान १०० ते कमाल १,००० एमबीपीएस असेल. त्याचे दर ७०० ते १०,००० रुपये असतील. शिवाय एचडी किंवा ४के एलईडी दूरचित्रवाणी संच आणि ४के सेट टॉप बॉक्सची जोड देण्यात येणार आहे.